एनएमएमटीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:52 AM2018-06-14T04:52:39+5:302018-06-14T04:52:39+5:30

  महानगरपालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळू लागले आहे. पहिल्याच पावसामध्ये वायपर बसविले नसल्याने २८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. सद्यस्थितीमध्ये दहा वर्षे जुन्या तब्बल ५६ बसेस रस्त्यावर धावत असून त्यामधील एका बसचा मंगळवारी अपघात झाला आहे.

 NMMT game with passenger life | एनएमएमटीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

एनएमएमटीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई -  महानगरपालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळू लागले आहे. पहिल्याच पावसामध्ये वायपर बसविले नसल्याने २८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. सद्यस्थितीमध्ये दहा वर्षे जुन्या तब्बल ५६ बसेस रस्त्यावर धावत असून त्यामधील एका बसचा मंगळवारी अपघात झाला आहे. या बसेसमधील किलोमीटर व वेग दर्शविणारी यंत्रणाही बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेला चांगली परिवहन यंत्रणा उभारण्यात अपयश आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये एनएमएमटीपेक्षा बेस्ट अधिक चांगली सुविधा देत आहे. पालिकेच्या ताफ्यात सद्यस्थितीमध्ये जवळपास ४५० बसेस असून त्यामधील सरासरी ३८० बसेस रोडवर धावत आहेत. तुर्भे व आसुडगाव डेपोमध्ये पालिकेच्यावतीने बसेसची देखभाल दुरुस्ती केली जात असून घणसोली डेपोमधील बसेसची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी महालक्ष्मी या ठेकेदारावर सोपविण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी विभाग पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे अपेक्षित बसेस नियमित रोडवर धावू शकत नाहीत. पावसाळ्यापूर्वी सर्व बसेसना वायपर बसविणे आवश्यक आहे, परंतु वेळेत काळजी घेतली नसल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये तब्बल २८ एनएमएमटी बसेसच्या फेºया रद्द कराव्या लागल्या. अभियांत्रिकी विभागाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. फेब्रुवारीमध्ये नेरूळमध्ये बसला आग लागली. अचानक बसला आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. उपक्रमाच्या बसेस रोडवर बंद पडण्याच्या घटनाही वाढत असून त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे.
पनवेलमध्ये मंगळवारी एनएमएमटी बसचा ब्रेक फेल झाला व सात वाहनांना धडक बसली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघात झालेल्या रिक्षा व इतर वाहनांच्या चालकांचाही जबाब पोलिसांनी घेतला आहे. रिक्षा चालक अर्शद शेख याने बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले आहे. बस चालकानेही ब्रेक लागला नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले आहे. उपक्रमाच्या सीबीडीमधील नियंत्रण कक्षातील जीपीएस यंत्रणेवरही बसचा अपघात झाला तेव्हाचा वेग ताशी २८ किलोमीटर एवढा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पूर्णपणे फिट नसलेल्या बसेस रोडवर उतरविल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. एनएमएमटी चालक, वाहक व परिवहन सदस्यांशी चर्चा केली असता अपघात झालेल्या बसची २००७ मध्ये खरेदी केली आहे. तेव्हा खरेदी केलेल्या ९५ बसेसपैकी १५ बसेस भंगारमध्ये टाकण्यात आलेल्या असून अजून ९ प्रस्तावित केल्या आहेत. दहा वर्षे झालेल्या तब्बल ५६ बसेस रोडवर धावत असून अपघात झालेली बसही त्यामधीलच आहे. या सर्व बसेसची विशेष फिटनेस चाचणी घेण्याची मागणी केली जावू लागली आहे.

वेग दर्शविणारे उपकरण बंद
पनवेलमध्ये अपघात झालेली बस दहा वर्षांपेक्षा जास्त काळ एनएमएमटीच्या ताफ्यात आहे. बस ७,७५,४४६ किलोमीटर धावल्याची नोंद उपक्रमाकडे आहे. परंतु वास्तवामध्ये बसमधील किलोमीटर व वेग दर्शविणारे यंत्र बंद आहे. यामुळे बसमध्ये टाकलेल्या डिझेलवरून अंदाजे किलोमीटरची नोंद केली जात आहे. अशाप्रकारे अनेक बसेसचे वेग व किलोमीटर दर्शविणारे यंत्र बंद आहे. यामुळे बसेस नक्की किती किलोमीटर धावल्या याची अचूक माहितीच उपलब्ध नाही. दोन्ही यंत्र बंद असताना आरटीओने या बसेसचे पासिंग कसे केले असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेग व किलोमीटरच्या यंत्राच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याचेही खासगीत सांगितले जात असून ही गोष्ट श्रीमंत महापालिकेला शोभा देणारी नाही.

आग लागल्याचा अहवाल गुलदस्त्यात
एनएमएमटीच्या एमएच ४३ एच ५४४८ या बसला २ फेब्रुवारीला नेरूळ तेरणा शाळेसमोर आग लागली होती. बसमध्ये ६० प्रवासी होते. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. बसला आग कशामुळे लागली याचा अहवाल परिवहन सदस्यांनी मागितला होता. परंतु चार महिन्यानंतरही परिवहन समितीला व सदस्यांना याविषयी अहवाल देण्यात आलेला नाही.

दहा वर्षे जुन्या बसेस
उपक्रमाच्या ताफ्यातील दहा वर्षे झालेल्या किंवा ८ लाख किलोमीटर चाललेल्या बसेस निर्लेखित करण्याचे धोरण आहे. सद्यस्थितीमध्ये एच सिरीलच्या ५०२८ ते ५०३१, ५०३३ ते ५०४१, ५०४३ ते ५०५६, ५०५८ ते ५०६४, ५०७० ते ५०७२, ५०७४ ते ५०७६, ५०७८ ते ५०९५ या ५६ बसेस दहा वर्षे झाल्यानंतरही रोडवर धावत असून त्यांचे विशेष फिटनेस परीक्षण करण्याची गरज आहे.
आयुक्तांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यापूर्वी सीबीडीमधील परिवहनच्या मुख्यालयास भेट दिली होती. तेव्हा पूर्ण क्षमतेने व वेळेवर बसेस धावत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचे आदेश दिले होते. पावसात वायपर नसल्याने फेºया रद्द कराव्या लागल्याबद्दलही प्रशासनाला धारेवर धरले होते.

परिवहन उपक्रमातील दहा वर्षे झालेल्या सर्व बसेस निर्लेखित केल्या पाहिजेत. पनवेलमध्ये अपघात झालेल्या बससला किलोमीटर व वेग दर्शविणारे उपकरण बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात बसेसना वायपर नसल्याने २८ बसेसच्या फेºया रद्द कराव्या लागल्या. नेरूळमधील बसच्या आगीचा अहवाल गुलदस्यात असून या सर्व गोष्टी गंभीर आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- समीर बागवान, परिवहन सदस्य

Web Title:  NMMT game with passenger life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.