अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील आठ वसाहतींना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:35 AM2018-07-11T02:35:20+5:302018-07-11T02:35:36+5:30

चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Due to heavy rain, eight colonies in Navi Mumbai are in danger | अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील आठ वसाहतींना धोका

अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील आठ वसाहतींना धोका

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई  - चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील आठ वसाहतींमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, ३७८ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे इंदिरानगर परिसरातील गणपती पाडा येथे झोपडी पडली असून, जवळपास १५ घरेही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरात कोणी नसताना ही दुर्घटना घडल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मंगळवारी चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील इतर ठिकाणीही भूस्खलन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन विभागाने यापूर्वीच आठ झोपडपट्ट्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असून, रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ३७८ इमारती धोकादायक घोषित केल्या असून, त्यामधील ५८ इमारती अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना घरांचा वापर थांबविण्यात यावा, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी प्रशासनाने सूचना दिलेल्या असून, काही ठिकाणी सूचना फलकही लावले आहेत. गणपतीपाडा येथील दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबईमध्ये २६ जुलै २००५च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत मनपाक्षेत्रामध्ये ८०९ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी पावसाने नवीन विक्रम प्रस्थापित केला असून, १६०५ मि. मी. नोंद झाली आहे. मोरबे धरण परिसरामध्येही १६०१ मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली असून, धरण ८२.७० मीटरपर्यंत भरले आहे. महापालिकेने आठ विभाग कार्यालय, अग्निशमन केंद्र व मुख्यालयामधील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उरण फाट्यावर टँकरला अपघात

सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे एच.पी. कंपनीचा टँकर रोडच्या कठड्यावरून खाली कोसळला. एकता विहार सोसायटीला लागून असलेल्या पॉवर हाउसवर पडला. टँकर रोडपासून जवळपास १०० फूट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला व परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

पामबीच रोडवर ट्रेलरचा अपघात
पामबीच रोडवर अवजड वाहनांना बंदी घातली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवून रात्री अवजड वाहने या रोडवरून जात आहेत. सोमवारी मध्यरात्री बेलापूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर नेरुळ-उरण रेल्वे ब्रिजच्या खाली अडकला, यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. उंची मर्यादेसाठीचे गेट तोडून कंटेनर पुलाला धडकला. या घटनेमुळे पामबीच रोडवर अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आवक घसरली

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावरही झाला आहे. सोमवारी ५ मार्केटमध्ये १८७४ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. मंगळवारी फक्त १३०१ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. पावसामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली होती.

Web Title: Due to heavy rain, eight colonies in Navi Mumbai are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.