साडीवरून ट्रेंचकोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 03:02 AM2017-11-19T03:02:56+5:302017-11-19T07:22:22+5:30

आदर्श भारतीय स्त्रीचे जे चित्र एरवी उभे केले जाते ते तथाकथित सौभाग्यचिन्हे, गजरे, दागिने यांचा भरपूर वापर, लांबसडक केस अशा गोष्टींशिवाय पूर्ण होत नाही. तरीही जिथे अधिकार आणि कणखरपणा आला तिथे या सगळ्या पारंपरिक गोष्टींना छेद दिला जातोच आहे. हे कुठून आलं?

Trench cut from saree! | साडीवरून ट्रेंचकोट!

साडीवरून ट्रेंचकोट!

Next

- नीरजा पटवर्धन
(कॉस्च्युम डिझायनर)

आदर्श भारतीय स्त्रीचे जे चित्र एरवी उभे केले जाते ते तथाकथित सौभाग्यचिन्हे, गजरे, दागिने यांचा भरपूर वापर, लांबसडक केस अशा गोष्टींशिवाय पूर्ण होत नाही. तरीही जिथे अधिकार आणि कणखरपणा आला तिथे या सगळ्या पारंपरिक गोष्टींना छेद दिला जातोच आहे. हे कुठून आलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधत परंपरेला छेद देणाºया एका स्त्रीपाशी जाऊन पोहोचले. त्या भारताच्या तिसºया पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी.
मी ज्या काळात आणि ज्या वातावरणात वाढले तिथे बहुतेक सर्व बायका साड्याच नेसत. मात्र साडीमधेच असलेल्या पंतप्रधान आजी बातम्यांमध्ये वेगळ्या दिसायच्या. मी सहावीत असताना त्यांचा अत्यंत दुर्दैवी आणि भीषण असा अंत झाला. मग हळूहळू बातम्यांमधूनही त्यांच्या जुन्या क्लिप्स दाखवणं बंद होत गेलं. पण मनामधे अतिशय ग्रेसफुल, कणखर अशी त्यांची छबी कायम राहिली.
काय काय होतं या छबीमध्ये? हे त्यांच्या राहणीतून शोधायचा हा छोटासा प्रयत्न आहे.
राजकीय कार्यकर्ती ते पंतप्रधानपद या सगळ्यातच कामानिमित्ताने प्रवास भरपूर. त्यामुळे अंगावरचे कपडे या सगळ्यासाठी सोयीचे असायला हवेत. तसेच हे काम म्हणजे लोकांशी संपर्क. त्यामुळे परंपरा जपण्यासाठी साडीला पर्याय नाहीच, हेही त्यांनी ताडलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म, जडणघडण आणि वाढणं, वडिलांचं स्वातंत्र्य लढ्याच्या अगदी केंद्रस्थानी असणं या सगळ्यामुळे इंदिराजींनी आपल्या कपड्यांमधे खादीचा मुबलक वापर करणं हे तर ओघाने आलंच. पंडित नेहरू तुरुंगात असताना त्यांनी विणलेली खादीची गुलाबी साडी लेऊन इंदिराजी विवाहबद्ध झाल्या होत्या.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पारंपरिक कला, हस्तकला यांना उत्तेजन मिळावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले गेले. इंदिराजींच्या कारकिर्दीत त्यांनी या पारंपरिक हस्तकला व हातमागाच्या उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घातले. खादीच्या बरोबरीने पारंपरिक हातमागावर, पारंपरिक विणकरांनी विणलेल्या साड्या हा त्यांच्या कपड्यांचा एक महत्त्वाचा भाग होता. शक्यतो सुतीच पण कधी कधी विशेष निमित्ताने त्या रेशमी साड्याही वापरत. इतकेच नव्हे तर एखाद्या ठिकाणी जाताना ज्या राज्याला, ज्या गावाला भेट द्यायची त्या राज्याची परंपरा असलेली साडी नेसणे, तिथली परंपरा असलेल्या वस्तूंचा वापर त्या कटाक्षाने करत.
रंग वा नक्षी या सर्वांत साधेपणा आणि श्रीमंतीचे प्रदर्शन न करताही अभिरूची जपणे या निकषांवर साड्यांची निवड केली जात असे. जिथल्या तिथल्या जनतेला ही ‘आपली’ पंतप्रधान आहे हे वाटू देण्यात या गोष्टीचा मोठा वाटा होता.
त्यांच्या साडीची नेसण हा त्यांच्या ग्रेसफुल आणि कणखर दिसण्यातला दुसरा महत्त्वाचा भाग. स्टार्च केलेली सुती साडी. निºया व्यवस्थित इस्त्री केल्यासारख्या जुळवलेल्या. सभासंमेलनांमध्ये डोक्यावरून घेतलेला पदर तर कामकाजाच्या वेळेस हालचालींच्या आड येणार नाही असा एका खांद्यावर असलेला पदर. ही काही त्यांच्या नेसणीची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
कुठूनही शरीर दिसायला वाव नाही असे पूर्ण गळाबंद आणि कमरेपर्यंत येणारे ब्लाऊज ही त्यांच्या कपड्यांमधली एक महत्वाची गोष्ट आहे. अंगभर कपडे, व्यवस्थित सर्व बाजूंनी झाकलेले शरीर म्हणजे आदरच आदर हे बालिश व्हिक्टोरियन समीकरण आजही आपल्या मानसिकतेत घट्ट रूतून बसलेले आहे. त्यांच्या काळात तर या समीकरणाचा पगडा भरपूर असणार. त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या काळात त्यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून हेटाळले गेले होते, स्त्रियांचे म्हणणे गंभीरपणे घ्यायची परंपरा जगात कुठेच नव्हती तशी आपल्याकडेही नव्हतीच. याचा सामना त्यांनी केला होता त्यामुळे त्यांच्या कापड, चोपड, आभूषणे यातल्या प्रत्येक निवडीच्या मागे जनमानसातल्या आदरणीय गोष्टी कुठल्या याचे भान जाणवते.
त्यांचे दागिने व आभूषणे यात एक रूद्राक्षाची माळ व एक मनगटी घड्याळ या दोनच वस्तूंचा समावेश होता. बाकी सोन्यामोत्याचे हार, कर्णफुलं, बांगड्या वगैरे गोष्टींना पूर्णपणे फाटा दिलेला होता. यामध्ये स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी याबरोबरच उपयुक्तता, सोय याचाही भाग होता. सुरुवातीपासूनच त्यांनी दागिन्यांना बराचसा फाटाच दिलेला होता. मात्र १९६० साली त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे काहीच दागिने न घालणे हे मात्र जनतेच्या दृष्टीने आदरणीय ठरून गेले असावे.
साडीवरून ट्रेंच कोट असे भारतीय व पाश्चात्त्य फॅशनचे एकत्रीकरण त्यांनी बरेचदा केले. अतिशय ग्रेसफुली केले. परंपरा व आधुनिकता यांचा संगम असा एक घासून गुळगुळीत झालेला पण तरीही चपखल वाक्प्रचार इथे वापरता येईल. व्यवस्थित बसवलेले छोटे केस आणि त्यात एक पांढºया केसांची बट ही खास त्यांची ओळख म्हणता यावी अशी गोष्ट. १९६० च्या दशकाच्या शेवटी त्यांनी आपले केस कापून लहान केले आणि एक पांढरी बट सोडून देऊन बाकी सर्व काळे ठेवले. नंतर वेळोवेळी ते तसेच ठेवण्यासाठी हेअरड्रेसरकडून टचप करून घेतले जात असत.
हवी तशी साडी शोधणे, त्यावर हव्या त्या रंगाचा ब्लाऊजपीस मिळवणे, टेलरच्या मागे लागून वेळच्या वेळेला ब्लाऊज शिवून घेणे आणि कपड्यांची बाकी सगळी उस्तवार करायला पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला वेळ असण्याची शक्यता नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मदतनीस हा त्यांच्या राहणीचा अविभाज्य भाग होता. साधेपणा राखायचा तरी त्याला वेगळे कष्ट असतात हे खरे असले तरीही पूर्ण गेटप ही त्यांची डोळसपणे केलेली निवड होती हे नक्कीच
पारंपरिक हस्तकलांचे महत्त्व ओळखून त्यांच्यामागे उभे राहतानाच इंदिराजींनी अनेक कुचकामी परंपरांना छेद दिला. बायकांनी मान खाली घालून गरीब गायीसारखे असावे, विधवा स्त्रीने एकभुक्त राहावे, जाडेभरडे ल्यावे, जगासमोर तोंड दाखवू नये वगैरे मूर्ख समजुतींना तर त्यांनी कचºयासारखे उडवून लावले. परंपरा, पारंपरिक गोष्टी यातले काय निवडायचे, काय टाकायचे याबाबत प्रत्येक भारतीय स्त्रियांसाठी त्यांनी एक अप्रत्यक्षरीत्या वस्तुपाठच घालून दिला आहे.

Web Title: Trench cut from saree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.