सीमाप्रश्नी लोकसभेत सेना-भाजपात जुंपली
By admin | Published: July 31, 2014 03:31 AM2014-07-31T03:31:23+5:302014-07-31T03:31:23+5:30
शून्य तासात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी अतिशय आक्रमकरीत्या हा मुद्दा लावून धरला़ कर्नाटक सरकारविरुद्ध शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली़ कर्नाटकच्या भाजपा खासदारांनी याला विरोध केला़
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज बुधवारी लोकसभेत शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसले़ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव जिल्ह्याच्या येळ्ळूर गावात कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीच्या मुद्यावर शिवसेना खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत, सभागृह डोक्यावर घेतले़ या गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास बाधित झाला आणि सभागृहाचे कामकाज सुमारे ५० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले़
शून्य तासात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी अतिशय आक्रमकरीत्या हा मुद्दा लावून धरला़ कर्नाटक सरकारविरुद्ध शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली़ कर्नाटकच्या भाजपा खासदारांनी याला विरोध केला़ यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले़
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक गत रविवारी कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला होता़ या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला़ पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. हे गंभीर असल्याचे सावंत म्हणाले़ कर्नाटक राज्यात मराठी लोकांवर पोलीस अत्याचार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़
यावर कर्नाटकचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप नोंदवला़ बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे ते म्हणाले़
येळ्ळूर गावात काही उपद्रवींनी एक फलक लावला आणि हे गाव महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला़ प्रत्यक्षात हे गाव कर्नाटकचे आहे़ हे फलक हटवण्यात आले़ मात्र काही लोकांनी ते पुन्हा लावले़ यामुळेच पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, अशी भूमिका त्यांनी घेतली़ यामुळे शिवसेना खासदार संतापले आणि त्यांनी कर्नाटक सरकार हाय हायची घोषणाबाजी सुरू केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)