Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, 41 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:33 AM2019-05-09T09:33:45+5:302019-05-09T09:41:44+5:30

फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला. या चक्रीवादळात आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत.

Number Of Deaths In Odisha Due To Cyclone Fani Rises To 41 | Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, 41 जणांचा मृत्यू

Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, 41 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देफनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला. चक्रीवादळात आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत.

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला. या चक्रीवादळात आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. वीज पूरवठा खंडीत झाला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने बुधवारी (8 मे) फनी चक्रीवादळातील मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केला आहे.  

फनी या चक्रीवादळाचा फटका 1 कोटी 50 लाख नागरिकांना बसला आहे. तसेच ओडिशातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत आहे. सरकारकडून 12 मे पर्यंत वीजपूरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पुरी, अंगुल, मयूरगंज, केंद्रपाडा या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. 


फनी वादळाच्या आपदग्रस्त भागांना केंद्राची 1 हजार कोटींची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (6 मे) फनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. फनी वादळामुळे तडाखा बसलेल्या जागांची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून केली. फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वादळाचा सामाना करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली आहे. केंद्र सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारसोबत आहे.


फनी वादळाचा तडाखा ओडिशा येथील 11 जिल्ह्यातील 14, 835 गावांना बसला आहे. मागील 24 तासात 13.41 लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती पाहता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रभावित झालेल्या लोकांना विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे. तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी  95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.


12 लाख लोक सुरक्षित ठिकाणी

प्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी 8 वाजता पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने 12 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी 175 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे 200 किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.


Cyclone Fani : मी मदत केली, तुम्हीही करा; बिग बीचं देशवासीयांना आवाहन

अमिताभ बच्चन यांनी ओडिशातील लोकांना मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. फनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना त्यांनी मदत केली आहे. तसेच 'मी मदत केली, तुम्हीही करा' असं सांगून देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. 'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान, हर तूफ़ान से लड़ेंगे हम, न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम, जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम' असं बिग बींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याआधीही अमिताभ बच्चन यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत केली होती. ओडिशामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता फनी हे वादळ पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टीला जाऊन धडकलं आहे.

पंतप्रधान मोदींचा कॉल घेण्यास ममता बॅनर्जींचा नकार, प. बंगालमध्ये राजकीय 'वादळ'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन संवाद साधण्याचे टाळल्याचे वृत्त होते. त्यानंतर, नवीन माहिती पुढे आली. ममता बॅनर्जी यांनीच पीएमओमधून आलेला कॉल घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. फनी वादळासंदर्भात ममता यांना पीएमओकडून फोन करण्यात आला होता. मात्र, ममतांनी बोलण्यास नकार दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील फोनी वादळासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममत यांनीच फोन घेण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली. 

 

Web Title: Number Of Deaths In Odisha Due To Cyclone Fani Rises To 41

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.