जाहीरनाम्याचाच विसर पडला अन् सर्व विरोधकांची अशी झाली फजिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:53 AM2019-04-10T06:53:05+5:302019-04-10T06:53:18+5:30

विरोधकांचा आवाज बंद : जॉर्ज फर्नांडिस यांनी अखेर ‘सोर्स’ केला उघड

The manifesto was forgotten, and all the opponents were like this! | जाहीरनाम्याचाच विसर पडला अन् सर्व विरोधकांची अशी झाली फजिती!

जाहीरनाम्याचाच विसर पडला अन् सर्व विरोधकांची अशी झाली फजिती!

googlenewsNext

- अजित गोगटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने व भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राजकीय पक्ष मोठ्या धुमधडाक्यात जाहीरनामे प्रसिद्ध करत असले तरी सत्तेवर येणाऱ्या पक्षांना त्यांचा नंतर हमखास विसर पडतो. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या जाहीरनाम्यांचा कितपत उपयोग होतो, हाही संशोधनाच विषय ठरावा. पण ज्या पक्षाने जाहीरनामा काढला होता त्यालाच त्याचा विसर पडल्याने संसदेत त्यांच्या नेत्याची फजिती झाल्याचा किस्सा मासलेदार आहे.


अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ‘रालोआ’ने दुसरे सरकार २० मार्च १९९८ रोजी बनवले. त्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर २८ मार्च रोजी लोकसभेत चर्चा सुरू होती. काँग्रेस व डाव्यांसह सर्व विरोधी पक्ष सरकार पाडण्यासाठी एकवटले होते.
सरकारतर्फे मंत्री जॉर्ज फर्नांडिस बोलायला उभे राहिले. हातातील कागदांमध्ये पाहून जॉर्ज यांनी काँग्रेसवर तोफ डागायला सुरुवात केली. त्यांना अडथळे आणण्यात काँग्रेस व माकपचे सदस्य हिरीरीने सहभागी झाले. त्यांचा विरोध न जुमानता फर्नांडिस बोलतच राहिले. काँग्रेसविषयीचे हे आरोप फर्नांडिस कशाच्या आधारे करत आहेत ते उघड केल्याखेरीज त्यांना बोलू देऊ नका, असा विरोधकांचा आक्षेपाचा मुद्दा होता. लोकसभा अध्यक्ष सी.एम. बालयोगी यांनी विनंती करूनही गोंधळ थांबेना.


शेवटी जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या मिश्किल शैलीत ‘सोर्स’ उघड केला व आपण काँग्रेसविषयी जे काही बोललो ते माकपच्या जाहीरनाम्यातील उतारे होते, असे जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेल्या पण वाजपेयी सरकार पाडण्यासाठी एकत्र आलेल्या कम्युनिस्ट व काँग्रेस सदस्यांचे चेहरे ओशाळे झाले. त्यांचा गोंधळ बंद झाला. महिनाभरापूर्वीच्या जाहीरनाम्यात आपण काय लिहिले होते याचा मार्क्सवाद्यांना विसर पडला होता!

त्या दिवशी वाजपेयी सरकार २७४ विरुद्ध २६१ मतांनी तरले. परंतु तेरा महिन्यांनी विरोधी पक्षांनी पुन्हा एकजूट करून वाजपेयी सरकारला घेरले. यावेळी विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव अवघ्या एका मताने मंजूर झाला व वाजपेयी यांचे हे दुसरे सरकारही अल्पजीवी ठरले. त्याआधी १९९६ मध्ये त्यांचे सरकार अवघे १३ दिवस टिकले.

Web Title: The manifesto was forgotten, and all the opponents were like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.