लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ!

By बाळकृष्ण परब | Published: January 30, 2019 03:48 PM2019-01-30T15:48:21+5:302019-01-30T15:51:02+5:30

विविध ओपिनियन पोलमधील सध्याचा कल पाहिला तर तो निश्चितपणे सत्ताधारी भाजपाविरोधात आहे. मात्र त्याचवेळी भाजपाचा निर्णायक पराभव आणि काँग्रेसचा स्पष्ट विजय होण्याची शक्यताही हे ओपिनियन पोल नाकारत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक कमालीची गुंतागुंतीची ठरणार आहे. 

Hunger for Loksabha, BJP may suffer setback; Advantage to UPA | लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ!

लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ!

ठळक मुद्देविविध ओपिनियन पोलमधील सध्याचा कल पाहिला तर तो निश्चितपणे सत्ताधारी भाजपाविरोधात भाजपाचा निर्णायक पराभव आणि काँग्रेसचा स्पष्ट विजय होण्याची शक्यताही हे ओपिनियन पोल नाकारत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक कमालीची गुंतागुंतीची ठरणारसध्यातरी त्रिशंकू स्थितीमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए या दोन्ही आघाड्यांना सारखीच संधी आहे

- बाळकृष्ण परब

सतराव्या लोकसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आघाड्या, युतींची समीकरणे बनवली जात आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवून असलेल्या विविध सर्वेक्षण संस्थांच्या कल चाचण्या अर्थातच ओपिनियन पोल दर आठवड्याला प्रसिद्ध होत आहेत. त्यातून मतदारांचा कल स्पष्ट होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तवाहिन्यांच्या ओपिनियन पोलवर नजर टाकली तर मतदारांच्या सध्याच्या कलानुसार देशात त्रिशंकू लोकसभेची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. बहुमताने सत्तेवर असलेल्या भाजपाला जबरदस्त झळ बसण्याची तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची कामगिरी सुधारण्याची शक्यता दिसत आहे. 

साधारणपणे असे ओपिनियन पोल आले की त्यांच्या सत्यतेवर शंका घेतल्या जातात. विशेषतः त्या पोलमध्ये ज्यांना नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते, असे पक्ष आणि त्यांचे नेते यात आघाडीवर असतात. त्यात अगदीच तथ्य नसते असे नाही. पण हल्लीच्या वर्षांत बहुतांश पोलमधील अंदाज बऱ्यापैकी वास्तवाच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. त्यातही अशा ओपिनियन पोलमधील आकडेवारीपेक्षा त्यातील कल विचारात घ्यायचा असतो आणि तोच महत्त्वाचा असतो. आता या विविध ओपिनियन पोलमधील सध्याचा कल पाहिला तर तो निश्चितपणे सत्ताधारी भाजपाविरोधात आहे. मात्र त्याचवेळी भाजपाचा निर्णायक पराभव आणि काँग्रेसचा स्पष्ट विजय होण्याची शक्यताही हे ओपिनियन पोल नाकारत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक कमालीची गुंतागुंतीची ठरणार आहे. 

2014 साली झालेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमध्ये काँग्रेससह बरेच विरोधी पक्ष वाहून गेले होते. मात्र आता मोदी लाटेतील बरेच पाणी माघारी गेले आहे आणि मोदींच्या जादुई करिश्म्यालाही ओहोटी लागली आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभा  निवडणुकीत 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. त्यातच उत्तर प्रदेशसारख्या राज्यात झालेली सपा-बसपा यांच्यातील महाआघाडी, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होऊ घातलेली आघाडी आणि इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत जुळवून घेण्याची काँग्रेसने घेतलेली भूमिका यामुळे यंदाच्या निवडणुकीपूर्वी यूपीए मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या विविध ओपिनियन पोलमधून त्याचे प्रतिबिंब दिसले आहे. तसेच 2014 च्या तुलनेत यूपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत आणि जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

त्यातही उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडी ही यंदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. या महाआघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसिद्ध झालेल्या ओपिनियन पोलच्या सर्व्हेंमध्ये यावेळी अखिलेश-मायावती उत्तर प्रदेशात दणदणीत यश मिळवणार असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. 
ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका आटोपलेल्या मध्य प्रदेश, राजस्थानसह गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नसल्याचे जवळपास सर्वच सर्व्हेमध्ये दाखवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात सेना-भाजपा युती झाली नाही तरच काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज विविध सर्व्हेंमधून वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात पंजाब वगळता इतर ठिकाणी काँग्रेसला फारसा लाभ होण्याची शक्यता नाही.  तसेच दररोज नवनवी राजकीय नाट्ये रंगत असलेल्या कर्नाटकमध्येही भाजपाला रोखताना काँग्रेस-जेडीएस आघाडीला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल, असेही विविध सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे. केरळमध्ये काँग्रेस यशस्वी ठरू शकते. तर तामिळनाडूत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या डीएमकेला चांगले यश मिळू शकते, असेही विविध सर्व्हे सांगतात. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसला थेट फारसा लाभ होणार नसला तरी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये काँग्रेसच्या असलेल्या स्वीकारार्हतेमुळे यूपीए भक्कम होण्याची शक्यता आहे. मात्र त्यात काँग्रेसला किती जागा मिळतील हा प्रश्न कायम आहे. 

दुसरीकडे गत निवडणुकीप्रमाणे यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणे जवळपास अशक्य आहे, यावर बहुतांश सर्व्हेंमधून एकमत झालेले आहे. इतकेच नाही तर सध्या भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएतील घटक पक्षांची गोळाबेरीजही 272 चा जादुई आकडा गाठण्यात अपयशी ठरणार असल्याचेही बहुतांश सर्व्हे सांगतात. त्यामुळे आहेत ते पक्ष टिकवणे आणि नवे मित्र जोडण्याचे काम भाजपाला करावे लागणार आहे. मात्र सध्या ही बाब काहीशी कठीण दिसत आहे. 

उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तर महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजपाचे गणित बिघडणार आहे. इतर छोट्या राज्यांमध्येही 2014 प्रमाणे पैकीच्या पैकी जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाजही विविध सर्व्हेंमधून वर्तवण्यात आला आहे. तसेच दक्षिण भारताही कर्नाटक वगळता इतर ठिकाणी भाजपाच्या हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि पूर्वोत्तर भारत याच ठिकाणी भाजपाला 2014 पेक्षा चांगले यश मिळण्याचा अंदाज आहे.

 असे असले तरी निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता 2014 च्या तुलनेत काहीशी कमी झाली असली तरी त्यांच्या प्रभाव अद्याप ओसरलेला नाही. तसेच सरकारविरोधातील अँटी इन्कम्बन्सी तितकीशी तीव्र नाही. नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात उतरले की मतदानाचे चित्र बदलते, असे गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. गतवर्षी झालेली कर्नाटकमधील निवडणूक, तसेच मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले होते. त्यामुळे आज ओपिनियन पोलमध्ये दर्शवण्यात आलेल्या कलानुसारच आगामी लोकसभेचे चित्र राहील, असे म्हणणे घाईचे ठरेल. सध्यातरी त्रिशंकू स्थितीमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए या दोन्ही आघाड्यांना सारखीच संधी आहे, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Hunger for Loksabha, BJP may suffer setback; Advantage to UPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.