आधी देशहित; मग राजकारण! राष्ट्रीय सुरक्षेवर 'लोकमत'च्या वाचकांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 04:06 AM2019-03-10T04:06:00+5:302019-03-10T07:01:16+5:30

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करणे योग्य नाही, यावर सर्व वाचकांनी एकमताने मोहोर उठविली आहे.

Half landed; Then politics! The sentiments of the readers of 'Lokmat' | आधी देशहित; मग राजकारण! राष्ट्रीय सुरक्षेवर 'लोकमत'च्या वाचकांची भावना

आधी देशहित; मग राजकारण! राष्ट्रीय सुरक्षेवर 'लोकमत'च्या वाचकांची भावना

googlenewsNext

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करणे योग्य नाही, यावर सर्व वाचकांनी एकमताने मोहोर उठविली आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या प्रश्नाचे भांडवल करून त्याचा राजकीय वापर करताना दिसतात, त्याबद्दल वाचकांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली आहे. आधी देशहित बघा आणि मगच राजकारण करा, असे देखील काहींनी सुनावले आहे. तर अशा गोष्टींना कायमचा पायबंद घालण्यासाठी निवडणूक आयोगानेच एक आचारसंहिता निर्माण करावी, तसेच सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणे म्हणजे देशद्रोहच असून त्यासाठी तसा कायदा करावा, असेही वाचकांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, मतदार सूज्ञ असून असे करणाऱ्या नेतेमंडळींना ते मतपेटीतून बरोबर धडा शिकवतील, असा विश्वासही अनेकांना वाटतो आहे.

एअर स्ट्राइकवरून राजकारण होणे दुर्दैैवी
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, या हल्ल्यावर अनेक राजकीय पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.
राजकीय फायद्यासाठी अनेक दाखले राजकीय पुढाऱ्यांमार्फत दिले जात आहेत, ही चुकीची गोष्ट आहे. लष्कराच्या कारवाईत अनेक गोष्टी गुप्त ठेवणे गरजेचे असतानाही त्या आपल्याकडे उघडपणे सांगितल्या जातात. पाकिस्तान हा भारताचा प्रमुख शत्रू आहे. ज्याप्रमाणे सीमेपार देशविघातक प्रवृती आहेत, तशाच देशांतर्गतही आहेत. राजकीय लोक अनेक गुप्त गोष्टी जाहीर भाषणात सांगत आहेत. यामुळे आपण सैन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. याचा परिणाम हा सैन्याच्या मनोधैर्यावर होणार आहे. परिणामी, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. सैन्यामधे भरती होणारे हे सामान्य नागरिक आहेत. यामुळे राजकीय फायद्यासाठी सैन्याला मधे घेणे योग्य नाही. सशस्त्र सेना दलातर्फे केली जाणारी कारवाई अतिशय गुप्त असते, यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले. मात्र, त्यांच्या लष्कराने त्यांचे मृतदेह घेण्यास नकार दिला. मात्र, युद्ध थांबल्यावर त्यांनी त्यांच्या सैन्याचे मृतदेह घेतले. यामुळे तेव्हाही पाकिस्तानचा खोटा चेहरा पुढे आला होता. या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले या बाबत आज विचारणा केली जात आहे. हीसुद्धा माहिती पुढे येईलच. कारण या हल्ल्यात जे मारले गेले आहेत, त्यांचे नातेवाईक याबाबत विचारणा करणार आहेत. यामुळे राजकीय हितासाठी सैन्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. हे जर थांबवायचे असेल, तर सामान्य नागरिकांनीच यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल

सरकारला श्रेय हवे, अपयश का नको?
पुलवामा हल्ला व एअर स्ट्राइक यांच्यावरून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने राजकारण करणे हे चुकीचेच आहे. मात्र, मोदी सरकारने उरी सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेतले. त्यामुळे पुलवामा हल्ला झाल्यानंतर त्याचे अपश्रेय, अपयश मात्र सरकारला का नको, असा मुद्दा होता.
वास्तविक पाहता सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही झाले होते. मात्र, तेव्हाच्या सरकारने त्याची वाच्यता करुन श्रेय मिळविण्याचा खटाटोप केला नाही. उरी सर्जिकल स्ट्राईकचे मोदी सरकारने स्वत:चे काम म्हणून भांडवल करण्यास सुरुवात केली. एअर स्ट्राईकबाबत कोणत्याही पक्ष वा संघटनेने लष्कराच्या कर्तृत्वावर शंका घेतल्या नाहीत. मात्र, सरकारमधील मंत्री किंवा भाजपाच्या नेत्यांकडून मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या संख्येबद्दल जे दावे केले जातात ते चुकीचे आहे. राजकीय लाभ घेण्याची भूमिका यातून दिसून येते. परदेशी माध्यमांनी आता एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या संख्येबाबत दिलेल्या माहितीमुळे सरकारमधील बोलघेवडे लोक तोंडावर पडले आहेत. विशेषत: पंतप्रधान मोदींनी असे दावे करण्याबाबत स्वपक्षातील लोकांना समजावणे आवश्यक होते. मात्र, त्यांनीही विरोधकांवर टीका करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण सत्ताधाऱ्यांनीच चालू केले. मग विरोधकांकडून प्रश्न विचारले जाणे स्वाभाविकच होते.
दुसरी गोष्ट मोदींनी सैन्याला सर्व कारवाईचे अधिकार दिल्याचे सांगणेही चुकीचेच आहे. राज्यघटनेनुसार सरकारला तो अधिकार नाही. सैन्य सरकारला व सरकार जनतेला जबाबदार आहे. मात्र, सैन्य कारवाईबाबत काही विचारणे हा देशद्रोहीपणा ठरविणे घातक आहे. सैन्याला सन्मान देणे ही चांगली बाब आहे. पण, सैन्य सरकारपेक्षा वरचढ होणेही घातक आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते, पुणे

सजग राहण्याची गरज
राष्ट्रीय संकटाच्या वेळी आपापसातील मतभेद विसरून देशासाठी एकसंध उभे राहणे ही राजकारण्यांसह सर्वांचीच जबाबदारी आहे. त्याचे राजकारण करणे सर्वथा चूकच आहे, तसेच आपल्यातील घरभेदी ओळखण्यासाठी एक नागरिक म्हणून देखील प्रत्येकाने सजग राहायला हवे आणि सध्या तर त्याचीच जास्त गरज आहे.
- भूषण दिलीप पाटील, भुजबळ अभियांत्रिकी कॉलेज, नाशिक.

राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च
सत्ता टिकविण्यासाठी सत्ताधारी तसेच मिळविण्यासाठी विरोधी पक्ष सध्या कोणत्याही थराला जातात. राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वोच्च असायला पाहिजे. पाकिस्तानवर केलेला हवाई हल्ल्याचा फायदा कसा होईल, हे सत्ताधारी पाहत आहेत तर विरोधक संशयी नजरेने बघत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय संदेश जाईल, याचे भान दोघांनाही नाही.
- युवराज वाकडे, टाकळी अंबड, ता. पैठण, जि.औरंगाबाद.

लष्करावर अविश्वास कशासाठी?
भारताने बदला घेण्यासाठी केलेल्या हल्याचे पुरावे मागून एकप्रकारे भारतीय लष्करावर अविश्वास दाखविला जातोय. देशाचा सैनिक होणे हे राजकीय पुढारी होण्याइतके सहजसोपे नसते. अविश्वास दाखविणाºयांनी सिमेवर जाऊन सैन्यासोबत तेथे आठवडाभर राहून दाखवावे.
- सुनील रामदास कन्नोर, निमशेवडी, मालेगाव - नाशिक

देशविरोधी कृत्य समजावे
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करणे, हे देशविरोधी कृत्य समजायला हवे. लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च स्थान असायलाच हवे, त्यासाठी केल्या जाणाºया एअर स्ट्राईकसारख्या तातडीच्या कारवायांबाबत विरोधी पक्षांनी संयमाची भूमिका घ्यायला हवी.
-राजेश जगन्नाथ नंदनवरे, सातारा परिसर, औरंगाबाद.


फैसला जनतेच्या दरबारात
इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला करून चोख उत्तर दिले होते. ४८ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिणामांची फिकीर न करता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. सत्ताधाऱ्यांचा श्रेयवादासाठी प्रयत्न व विरोधी पक्षांचा कांगावा, याचा योग्य तो फैसला जनतेच्या दरबारात होईल.
-शिरीष आठल्ये, ४९३, नारायण पेठ, पुणे.

आश्वासने पूर्ण झाली का?
सैन्य देशासाठी प्राण पणाला लावून लढत असते. त्यांच्या असीम त्यागाचे, शौर्याचे राजकारण अजिबात होता कामा नये. सर्व नेत्यांना सुचवावेसे वाटते की, जनतेला दिलेली आश्वासने जसे काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई, इंधन दर, शिवस्मारक, बेरोजगारी, पर्यावरण, शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न संपलेत का? संपले असतील तर त्यांचे अभिनंदन!
- प्रदीप वि. पावसकर, ताडदेव, मुंबई.

मतपेटीतून उत्तर द्या
राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी मृतांच्या टाळूवरचे लोणी देखील खातात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करणे साहजिकच नाही का? मुळात आपण राजकीय पक्षांनी काय करणे योग्य आहे आणि काय अयोग्य हे ठरवत बसण्यापेक्षा जनतेने या सगळ्यांचे उत्तर मतपेटीतून कसे द्यायचे, हे बघावे.
- प्रियंका प्रमोद लाठी,
हसनाबाद, भोकरदन - जालना.

वायुदलावर प्रश्न नको
‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे विरोधक सरकारवर आरोप करीत आहेत, तर सत्ताधारी ‘एअर स्ट्राईक हम ही कर सकते है’ अशा आविर्भावात आहेत. परंतु वायुदलाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करून राजकारण करू नये. दहशदवादी कृत्यांचा विरोधात एक अखंड देश म्हणून सर्वसामान्य जनता उभी आहे, याचे भान ठेवावे.
- आशिष मोहिते,
आनंद नगर, सिडको, नाशिक.

जवानांचाच अधिकार
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी त्याचे राजकारण करणे, हे अत्यंत घातक आहे. जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर फक्त आणि फक्त जवानांचाच अधिकार असतो. राजकीय पक्षांनी जवानांच्या नावावर पोळ्या भाजणे योग्य नाही. सीमेवर लढणाºया जवानांना पाठबळ देण,े प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे.
- नागेश चव्हाण, कृषी महाविद्यालय, नागपूर.

जनता भोळीभाबडी नाही
राष्ट्रीय सुरक्षा हा राजकारणाचा विषय नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील तसेच गोपनियदेखील असणाºया मुद्द्यांवर माध्यमांवर ज्या पद्धतीने चर्चा होते आहे, ती देखील चुकीची आहे. जनतेला भोळीभाबडी समजू नये. देशहितासाठी जो चांगले कार्य करेल त्याला जनता नक्कीच डोक्यावर घेईल. त्यासाठी डंका पिटून मार्केटींग करण्याची गरज नाही.
-फयाज अहमद दलमीर खान, भुसावळ, जि. जळगाव.

लक्ष विचलित केले
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. देशात मुद्दे काय कमी आहेत का? बेरोजगारी, नोटबंदी, काळा पैसा, महागाई, आरक्षण, बुलेट ट्रेन,अंबानी व अडाणींचाच होत असलेला विकास, सतत घसरत चाललेला रुपया, मनुवाद, गंगेची सफाई, गोरक्षणाखाली वाढत चाललेला हिंसाचार, दाऊद, जय शाह,विजय माल्या, निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोकसी, संदेसरा ब्रदर्स सारखे भारताला लुटून परदेशात गमजा मारत असलेले उद्योगपती...पाकिस्तानवर टाकलेल्या बाँबने या सर्वं गोष्टींकडचे लक्ष संपवले.
- राहुल प्रल्हाद घोटकर, भिवधानोरा, औरंगाबाद.

अनिष्ट पायंडा थांबवा
भारतीय हवाई दलाने बदला म्हणून पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या जोरात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी पक्ष स्वत:चे उदो-उदो करून घेत आहे तर विरोधी पक्ष कारवाईबद्दल साशंकता निर्माण करीत आहे. शत्रु राष्ट्रावरील कारवाईची सखोल माहिती पुराव्यासह मागणे म्हणजे आपल्या लष्कराचे मनोबल खच्चीकरण करणारेच आहे. प्रसारमाध्यमेदेखील दिवसभर अनावश्यक चर्चा सुरू ठेवून त्यामध्ये विषयच कालवतात. राजकारण्यांनी सुरू केलेला हा अनिष्ट पायंडा वेळीच थांबविणे हेच देशहितासाठी अत्यंत गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. देवकिसन बाहेती, आदर्श कॉलनी, अकोला.

प्रचाराचा भाग बनतोय
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा निवडणुकीत कसा फायदा होईल, यादृष्टीने त्याचा प्रचार सुरू आहे. सैनिकांच्या पराक्रमावर मते मिळवण्याचा हा खटाटोप सर्वसामान्य जनतेला कळत नाही, असे नव्हे. वायूदलाने हल्ल्यातील मृतांची आकडेवारी जाहीर केली नसताना मंत्री मात्र रोज वेगवेगळी आकडेवारी जाहीर करीत आहेत. ‘‘सौगंध मुझे इस मिट्टी की, देश मिटने नही दुँगा’’ किंवा ‘‘मोदी है तो मुमकीन है’’ अशी वाक्य प्रचाराचा भाग बनू पाहत आहेत. विरोधी पक्षांनीही भान ठेऊन बेजबाबदार विधाने करु नयेत.
- गोपाळ जाधव, कोपर खैरणे, सेक्टर १९, नवी मुंबई

राजकारण्यांनी विचारमंथन करावे
काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या ४४ शूरवीर जवानांना वीरमरण आले. या वेळेस अवघा देश जात, धर्म, राजकारण बाजूला ठेऊन एकवटला व सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. परंतु त्यानंतर मात्र या हल्ल्याचे व भारताने दिलेल्या सडेतोड उत्तराचे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण सुरू झाले. हे खूप वाईट व अशोभनीय आहे. सर्वांनी यावर विचारमंथन करायला हवे.
- जावेद इब्राहिम शाह,
शिर्डी, ता.राहाता जि.अहमदनगर

भावनिक मुद्दा आयताच मिळाला
राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी, आपण कोणत्या मुद्याचा वापर करतो आहोत हे, राजकारण्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे़. कारण भारत सरकारने सर्जिकल स्टाइक केली आणि त्याचा गवगवा भाजप पक्षाने सर्रास केला. पंतप्रधान मोदी हे तर इतरांपेक्षा आपण किती जास्त देशभक्त आहोत, हे पटवून सांगायची कोणतीच कसर सोडत नाहीत. राजकीय पक्षांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक भावनिक मुद्दा आयताच मिळाला, असे दिसते.
- अमोल दिनकर भालेराव, बुलडाणा.

राजकारण नको
पाकिस्तानने आतापर्यंत भारतात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जनता होरपळून निघालेली आहे. त्यामुळेच बदल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याचे चोख उत्तर दिल्याने त्यामुळेच जनसामान्यांना देशप्रेमाचे भरते आले. भरतीयांच्या चेहºयावर विजयस्मीत झळकले. अशा गोष्टींचा राजकारणासाठी वापर होणार असेल तर जनताच त्यांना योग्य तो धडा शिकवेल.
- अशोक गुडवार, यवतमाळ.

पुढाऱ्यांनो सावधान
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवाद्यांच्या तळावर हल्ला केला आणि देशात राजकारण तापू लागले. परंतु आरोप प्रत्यारोपांमुळे सैनिकांचे मनोबल खच्चीकरण होता कामा नये याची काळजी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनीही घ्यायला हवी. मीडियाने सुद्धा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जनता आता मुर्ख राहिली नाही. ती विचार करते. तेव्हा अविचार करणाºया पुढाºयांनो सावधान..!
- जयेश अ.माधव, डोंबिवली, ठाणे.

लोकशाही
कुठे नमो, कुठे रागा
कुठे प्रेम, कुठे त्रागा
वेगवेगळ्या झेड्यांची
वेगवेगळी छबी आहे
जात घेऊन निवडणूक
लक्ष्मीच्या दारात उभी आहे
- रामदास फुटाणे

Web Title: Half landed; Then politics! The sentiments of the readers of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.