Atal Bihari Vajpayee : ...आणि बुद्ध पुन्हा हसलाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:38 AM2018-08-17T04:38:46+5:302018-08-17T04:39:04+5:30

अटलजींनी जेव्हा तेरा दिवसांसाठी शपथ घेतली होती, शपथविधी झाल्यानंतर मावळते पंतप्रधान नरसिंह राव अटलजींना थोडेसे बाजूला घेऊन एकांतात म्हणाले होते, ‘‘अटलजी, आता आमचे अपुरे काम जरूर, लवकरात लवकर पुरे करा...’’

Atal Bihari Vajpayee: ... and Buddha laugh again! | Atal Bihari Vajpayee : ...आणि बुद्ध पुन्हा हसलाच!

Atal Bihari Vajpayee : ...आणि बुद्ध पुन्हा हसलाच!

अटलजींनी जेव्हा तेरा दिवसांसाठी शपथ घेतली होती, शपथविधी झाल्यानंतर मावळते पंतप्रधान नरसिंह राव अटलजींना थोडेसे बाजूला घेऊन एकांतात म्हणाले होते, ‘‘अटलजी, आता आमचे अपुरे काम जरूर, लवकरात लवकर पुरे करा...’’ अटलजींनी हलकेच मान डोलवून नरसिंह राव यांचे हात हातात घेतले होते. दोघांनाही ‘कोणते काम’ हे माहीत होते. दोनच दिवसांनी नरसिंह राव अटलजींच्या घरी गेले आणि म्हणाले, ‘‘सामग्री तयार है!’’
राव सरकारने १९९५ मध्येच भूमिगत अणुचाचणीचा निर्णय घेतला होता. तेव्हा खबर सीआयएपर्यंत पोहोचली. अमेरिकेने टोकाचा राजनैतिक दबाव आणला. कालांतराने १५ डिसेंबर १९९५ रोजी न्यूयॉर्क टाइम्सने पोखरण भागात वेगवान हालचाली चालू असल्याच्या बातम्या छापल्या. राव सरकार कायम अस्थिर होते. प्रसंगी सीआयएने ते पाडायला कमी केले नसते. अमेरिकेचे राजदूत फँक विस्नर यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन सज्जड इशारा दिला. राव यांनी अणुचाचणी योजना निमूटपणे आणि जड मनाने शीतपेटीत टाकून दिली. हा इतिहास अलटजींना अवगत होता. इतकेच नाही, तर १९९६ मध्ये शपथ घेतल्यावर ज्येष्ठ अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर अटलजींना भेटले होते. अटलजींंनी चौथ्याच दिवशी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘असतील तेथून तातडीने’ बोलावून घेतले. त्यानंतर आठ-नऊ दिवसांतच अटलजींना राजीनामा द्यावा लागला होता. पुन्हा शपथ घेतल्यावर १८ मार्चला अटलजींनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम यांच्यासहित बोलावले. भारतात अणुचाचणी केवळ राजस्थानातच शक्य होती आणि पाकिस्तानने अणुचाचणीसाठी राखून ठेवलेल्या विशाल व तुरळक वस्तीच्या बलुचिस्तानपेक्षा राजस्थानातील हालचाली टिपणे सोपे होते. त्यामुळे अधिक काळजी आवश्यक होती.
पोखरणच्या वाळवंटात होणाऱ्या चाचण्यांच्या प्रकल्पाचे नाव ठरले होते : शक्ती! प्रत्यक्ष चाचण्यांना म्हणावयाचे होते : ‘स्मायलिंग बुद्ध!’ पोखरण क्षेत्रात ज्या तीन नेमक्या जागांवर चाचणी होणार होती, त्यातले एक नाव होते : ‘ताजमहाल’. दुसरे : ‘व्हाइट हाऊस’, तर तिसरे : ‘कुंभकर्ण!’ या तीनही ठिकाणी १६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८२ मध्ये खंदक खणून तयार करण्यात आले होते. ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन’चे प्रमुख या नात्याने डॉ. कलाम हे या साºया योजनेचे प्रमुख होते. कलाम यांना नाव देण्यात आले : मेजर जनरल पृथ्वीराज. अणुस्फोटाच्या साधनांची प्र्रत्यक्ष जुळवाजुळव अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली होत होती. त्यांचे नाव होते : मेजर जनरल नटराज. पृथ्वीराज आणि नटराज यांना त्यांच्या नाव आणि हुद्द्याप्रमाणे गणवेशही मिळाले आणि ते घालूनच थर वाळवंटातील पोखरण क्षेत्रात त्यांना जावे लागत असे.
अटलजींनी ९ एप्रिल रोजी मेजर जनरल पृथ्वीराज आणि मेजर जनरल नटराज यांना बोलावून घेतले. विचारले, ‘‘निर्णय झाल्यापासून प्रत्यक्ष चाचणी करायला किती दिवस लागतील?’’ मेजर जनरल पृथ्वीराज म्हणजे डॉ. कलाम म्हणाले, सर केवळ तीस दिवस पुरेत. अटलजी म्हणाले, हरकत नाही. मग तुम्हीच आता तारीख ठरवा. समन्वयाचे काम ब्रजेश मिश्र करतील. हा निर्णय अटलजींनी एकट्याने एका क्षणात घेतला! डॉ. कलाम यांचा कालावधीचा अंदाज अचूक होता. आता १0 मे १९९८ ही तारीख ठरविण्यात अडचण नव्हती. मग लक्षात आले की, राष्ट्रपती के.आर. नारायणन २६ एप्रिल ते १0 मे लॅटिन अमेरिकेतील देशांच्या दौ-यावर आहेत. अटलजींनी राष्ट्रपतींना विश्वासात घेतले नव्हते. राष्ट्रपतींना अणुचाचणी केल्याचे परक्या देशात समजणे हे शोभून दिसले नसते. कलाम यांनी मग २६ एप्रिलच्या अलीकडे आणण्याचे ठरवले. पण ‘मेजर जनरल नटराज’ यांच्या कन्येचा विवाह २७ एप्रिलला ठरला होता. चिदंबरम या कामासाठी आधीच सगळे विधी चुकवायला तयार होते. पण मुहूर्ताच्या आधी लग्नघरी ते दिसले नसते, तर ‘ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ देशात असूनही मुलीच्या लग्नाच्या पूर्वविधींना मात्र गैरहजर,’ याचा योग्य तो अर्थ देशभर पाळत असणा-या परकीय गुप्तचर संस्थांनी घेतला असता. शेवटी मेजर जनरल पृथ्वीराज, मेजर जनरल नटराज आणि ब्रजेश मिश्र अटलजींकडे गेले. सोयीची तारीख येत होती. ११ मे. त्या दिवशी बुद्धपौर्णिमा होती. १८ मे १९७४ रोजी भारताने ‘शांततापूर्ण उपयोजना’साठी प्रथम अणुचाचणी केली, त्या दिवशीही बुद्धपौर्णिमा होती. अटलजींनी तत्क्षणी होकार भरला.
१ मे १९९८ रोजी पहाटे तीनला मुंबईच्या ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’तून काही ट्रक निघाले. ते मुंबई विमानतळावर गेले. या ट्रकमधील सामग्री विमानाने तीन तासांत जैलसमेरला गेली. तेथून ती सामग्री एका तासात पोखरणला पोहोचली. ती ज्या इमारतीत नेण्यात आली, तिचे नाव ठेवले होते प्रेअर हॉल. डॉ. काकोडकर तर या काळात अनेक नावांनी, अनेक वाहनांनी आणि अनेक रस्त्यांनी प्रवास करीत होते. एकदा तर त्यांनी या काळात मुंबई ते राजस्थान हा प्रवास ट्रकमधून, नाव-वेश पालटून केला होता. तेही पोखरणला पोहोचले. प्रेअर हॉलमध्ये सारी सामग्री सज्ज झाली. एकूण पाच चाचण्या करायच्या होत्या. ११ मेचा दिवस उजाडला. राजधानीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी सकाळी नऊपासूनच अटलजी आणि त्यांचे प्रधान सचिव ब्रजेश मिश्र पोखरणकडे डोळे लावून बसले होते. डॉ. कलाम आणि डॉ. चिदंबरम लष्करी वेशात पोखरणला हजर होते. आदल्या दिवशी तीनही भूमिगत प्लॅटफॉर्मवर स्फोटके चढविण्यात आली होती. पहिले होते थर्मोन्यूक्लिअर, दुसरे प्लॅटोनियम आणि तिसरे युद्धासाठी नव्हे तर शांततेसाठी वापरावयाचे. हे तीनही फलाट १५0 ते २00 मीटर खोलवर खोदण्यात आले होते. परिसरातल्या सगळ्या वायरी झुडपांनी अथवा वाळूने झाकून टाकल्या होत्या. वैज्ञानिक सकाळी आठपासून तयार होते. पण त्या दिवशी सकाळपासून नेमका जोरदार वारा होतो. तो थांबल्याशिवाय चाचणी करणे शक्य नव्हते. समजा, अणुचाचणीत काही किरणोत्सारी उत्सर्जन झालेच, तर वाहत्या वा-याने ते फार दूरवर पसरण्याचा धोका होता. तसे काही देशांत पूर्वी झाले होते. म्हणूनच वाट पाहण्याला काही पर्याय नव्हता.
इकडे अटलजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी ७, सफदरजंग हे विरोधी पक्षनेता म्हणून मिळालेले निवासस्थान सोडून ७ रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी आले होते. दुपारी डॉ. कलाम यांचा ब्रजेश मिश्र यांना फोन आला. डॉ. कलाम म्हणत होते की, आता वारा थांबला आहे. पुन्हा वारा सुटला नाही तर तासाभरात आम्ही काम पुरे करू. उत्सुक अटलजींना हा निरोप सांगण्यात आला. एव्हाना संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, अर्थमंत्री यशवंत सिन्हा, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष जसवंतसिंह, राजकीय सल्लागार प्रमोद महाजन ही निवडक मंडळी आली. सर्वांचे अधीर कान पोखरणहून डॉ. कलाम कधी फोन करतात, याकडे लागले होते. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी मुद्दाम टाकलेल्या विशेष लाइनवरील फोन घणघणला. फोनवर डॉ. कलाम होते. ते अटलजींना म्हणाले, ‘‘सर आता तीन वाजून ४५ मिनिटांनी आपल्या तीनही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तुमचे मन:पूर्वक अभिनंदन!’’ फोन ठेवताच अटलजींना साफल्याच्या भावनेने गहिवरून आले.
या भूमिगत अणुचाचणीच्या बातमीने जग कसे हादरेल, याची कल्पना या सातही जणांना होती. पटकन कामाला लागले ते महाजन. त्यांनी मोजक्या उद्घोषणेसाठी बंगल्याबाहेरच्या हिरवळीवर तयारी केली. एक पोडियम, माइक आणि शेजारी फडफडता तिरंगा. ‘व्हाइट हाऊसची’ आठवण व्हावी असे हे नेपथ्य होते! प्रसन्न मुद्रेने अटलजी बाहेर आले. त्यांनी मोजक्या शब्दांतले निवेदन केले. अमेरिकेला हे आवडणार नाही, हे अटलजींना माहीत होते. पण १९९१ च्या उदारीकरणानंतर परिस्थिती बरीच बदलली होती. जगाला भारतात गुंतवणूक करायची होती. अटलजींनी १७७ राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहिले. दोन दिवसांनी १३ मे रोजी आणखी दोन अणुचाचण्या घेण्यात आल्या.
भारत सरकारने प्रथमच आक्रमक भाषेतील निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले होते, ‘भारतावर आर्थिक निर्बंध लादताना याचीही जाणीव ठेवावी लागेल की, भारताकडून मिळणा-या आर्थिक लाभावरही पाणी सोडावे लागेल.’ अटलजींनी घेतलेला हा अदमास इतका अचूक ठरला की, अमेरिकेलाही नावापुरते निर्बंध ठेवून त्यातून अनेक पळवाटा स्वत:च काढाव्या लागल्या. २७ मे रोजी अटलजी लोकसभेत म्हणाले, ‘‘आपण अण्वस्त्रसज्ज आहोत, ही आता वस्तुस्थिती आहे. हा ‘दर्जा’ इतर कुणी देण्याची गरज नाही. ‘अण्वस्त्रधारी’ या बिरूदाचीही आम्हाला गरज नाही. आम्हाला कुणाला भय दाखवायचे नाही. पण आम्हालाही कुणी अण्वस्त्रांची भीती दाखवू नये. भारत म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरची एक षष्ठांश मानवजात आहे, हे कुणी विसरू नये!’’ २८ मे रोजी पाकिस्ताननेही बलुचिस्तानच्या चाघी पर्वतरांगांमध्ये ५ अणुचाचण्या करून भारताला चोख उत्तर दिले. ३० मे रोजी सहावी चाचणी केली. अटलजींचा निर्णय किती अचूक होता, याचा पाकिस्तानने केलेले स्फोट हा पुरावा होता.
(‘अटलजी’ या सारंग दर्शने यांच्या पुस्तकातील लेखाचा संपादित अंश साभार.)

Web Title: Atal Bihari Vajpayee: ... and Buddha laugh again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.