वायुप्रदूषणाने मुंबईत १०,५०० अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:39 AM2018-07-15T06:39:54+5:302018-07-15T06:40:09+5:30

वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

Air pollution 10,500 premature deaths in Mumbai | वायुप्रदूषणाने मुंबईत १०,५०० अकाली मृत्यू

वायुप्रदूषणाने मुंबईत १०,५०० अकाली मृत्यू

Next

नवी दिल्ली: वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
या अभ्यास पाहणीनुसार, अहवाल वर्षांत ‘पीएम २.५’ कणांमुळे भारतातील सर्वाधिक १४,८०० मृत्यू राजधानी दिल्लीमध्ये झाले. मृत्यूच्या प्रमाणात त्या खालोखाल मुंबई, कोलकाता (७,३०० ) व चेन्नई (४,८००) या महानगरांचा क्रमांक लागतो. सेंटरच्या संचालिक अनुमिता रॉय-चौधरी यांनी सांगितले की, अशा प्रकारे वायुप्रदूषणाने जगातील सर्वच महानगरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अकाली मृत्यू होत असतात, पण आशिया खंडातील महानगरांमध्ये त्यांचे प्रमाण
जास्त आढळते. त्यामुळे चीन, भारत, पाकिस्तान व बांगलादेश या आशियाई देशांमधील महानगरे निवडून विशेष अभ्यास केला गेला. या चार देशांच्या विचार केला, तर चीनमधील बीजिंग (१८,२००) व शांघाय (१७,६००) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली अशी क्रमवारी लागते. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर आणि निरंतर उपाय योजणे, प्रदूषणाची वेळच्या वेळी मोजणी करून, तत्काळ पावले उचलणे आणि किमान प्रदूषणाची कडक उद्दिष्टे ठरवून त्यांचे पालन करणे याखेरीज पर्याय नाही, असे रॉय-चौधरी म्हणाल्या.
चीनमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा खूप खराब असला तरी तेथील सरकार त्यास आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. त्या मानाने भारतासह इतर देशांत ढिलाई दिसते, असे त्या म्हणाल्या.
>श्वसन आणि फुप्फुसांचे आजार
मानवी व्यवहार आणि वारा-वादळासारख्या नैसर्गिक घटनांनी हवेमध्ये धूलिकण नेहमीच मिसळतात व पसरतात. यापैकी
२.५ मिमीहून कमी आकाराचे धूलिकण आरोग्यास अधिक घातक ठरतात. माणसाच्या नाकात असलेल्या केसांमुळे श्वास घेताना हवेतील असे धूलिकणांना अटकाव होतो, पण २.५ मिमीहून लहान कण श्वसनाद्वारे सहजपणे शरीरात जातात. कालांतराने श्वासनलिका, फुप्फुसे यांवर अशा कणांचे आवरण तयार होऊन त्यांचे कार्य मंदावते. यातून पुढे श्वसनसंस्थेच्या व हृदयाच्या आजारांखेरीज प्रसंगी कर्करोगही होऊन अकाली मृत्यू ओढावतो.

Web Title: Air pollution 10,500 premature deaths in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.