'आम्ही गेले सहा महिने जमीन पाहिलेली नाही'; इंडोनेशियात बोटीत कैद असलेल्या ६० भारतीयांची वेदनादायी कहाणी

By कुणाल गवाणकर | Published: July 20, 2019 07:22 PM2019-07-20T19:22:07+5:302019-07-20T19:27:16+5:30

साठ भारतीय पाच महिने 'तरंगत्या तुरुंगात'

60 Indian seafarers stuck in Indonesia from 5 months | 'आम्ही गेले सहा महिने जमीन पाहिलेली नाही'; इंडोनेशियात बोटीत कैद असलेल्या ६० भारतीयांची वेदनादायी कहाणी

'आम्ही गेले सहा महिने जमीन पाहिलेली नाही'; इंडोनेशियात बोटीत कैद असलेल्या ६० भारतीयांची वेदनादायी कहाणी

googlenewsNext

जकार्ता: इंडोनेशियाच्या सागरी हद्दीत बोट आणल्याचा ठपका ठेवून इंडोनेशियानं ६० भारतीयांना अटक केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता इंडोनेशियन नौदलानं ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे बोटीवरील कोणालाही आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही. तब्बल ५ महिन्यांपासून ३ जहाजांमधील ६० भारतीय इंडोनेशियाच्या नौदल तळावर अटकेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुरेशी मदत मिळत नसल्यानं बोटीवरील सर्वजण हवालदिल झाले आहेत. 

फेब्रुवारीत इंडोनेशियन नौदलानं एमटी वीन वीन बोट ताब्यात घेतली. या बोटीवर एकूण २६ कर्मचारी आहेत. त्यातील १९ जण भारतीय आहेत. या बोटीचे नेव्हिगेशन ऑफिसर असलेल्या अक्षय हळदणकर यांच्याशी 'लोकमत डॉट कॉम'नं संपर्क साधला. त्यांनी गेल्या पाच महिन्यात घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. 'इंडोनेशियाच्या हद्दीत बोट नांगरल्यानं आम्हाला ताब्यात घेण्यात आलं. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. खरंतर आम्ही आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत बोट नांगरली होती,' असं हळदणकर यांनी सांगितलं. 

आमचा कॅप्टन मुकेश कुमार आमच्या बाजूनं भांडतो आहे. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. गेले सहा महिने आम्ही जमीनच पाहिलेली नाही. आमचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं काढून घेण्यात आली आहेत, अशी व्यथा हळदणकर यांनी मांडली. हळदणकर यांच्या एमटी वीन वीन बोटीत महाराष्ट्रातील दोन जण आहेत. तर उत्तर प्रदेशातील ७, तमिळनाडूचे ३, गुजरातचे २, दिल्ली, बिहार, केरळ, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशचा प्रत्येकी १ जण आहे. ही बोट ग्रीकमधील व्यक्तीच्या मालकीची आहे. 

इंडोनेशियात भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांना या प्रकरणात न्यायालयाबाहेर तडजोड करायची आहे. त्यासाठीची रक्कम कंपनीच्या वकिलांना कळवण्यात आली आहे. या रकमेची कल्पना बोटीवर कैदेत असलेल्या कोणालाही नाही. भारत सरकारकडून आपल्याला मदत मिळेल अशी आशा बोटीवर अडकून पडलेल्या भारतीयांना आहे. मात्र जसेजसे दिवस पुढे सरकू लागले आहेत, तसतशी ही आशादेखील मावळू लागली आहे. या प्रकरणाची कल्पना परराष्ट्र मंत्रालयाला इंडोनेशियातील भारतीय वकिलातीला असूनही अद्याप तरी सुटकेच्या दिशेनं कोणतीही ठोस पावलं पडताना दिसत नाहीत. 

सरकारकडून मदत मिळत नाही, कंपनीनं वाऱ्यावर सोडलेलं अशा अवस्थेत ६० भारतीय इंडोनेशियात अडकले आहेत. आमच्या सोबत असलेल्या एका मोटरमनची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्याचा रक्तदाब वाढला. त्यानंतर त्याला थेट डिपोर्ट करण्यात आल्याचं हळदणकर यांनी सांगितलं. 'त्या मोटरमनला साईन ऑफ करता आलं असतं. मात्र त्याला डिपोर्ट करण्यात आल्यानं त्याला पुढे अनेक अडचणी येतील. जेव्हा जेव्हा तो व्हिसासाठी अर्ज करेल, तेव्हा संबंधित देश त्याला याबद्दल नक्की विचारेल. तुला इंडोनेशियातून डिपोर्ट का करण्यात आलं होतं, असा प्रश्न त्याला विचारला जाईल. त्यामुळे त्याला व्हिसा मिळणं अवघड होईल,' अशा शब्दांमध्ये हळदणकर यांनी इंडोनेशियाच्या ताब्यात असलेल्या भारतीयांचे हाल लोकमतला सांगितले. 
 

 

Web Title: 60 Indian seafarers stuck in Indonesia from 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.