खरेच का गणिते बदलतील?

By किरण अग्रवाल | Published: May 27, 2018 01:55 AM2018-05-27T01:55:44+5:302018-05-27T01:55:44+5:30

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नरेंद्र दराडे यांच्या रूपाने शिवसेनेला विजयश्री लाभताच आता जिल्ह्यातील आगामी निवडणुकातील गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची साथ देणाऱ्या भाजपाचा मुखभंग घडविल्याची हकीकत त्यामागे आहे हे खरे; परंतु या निकालाला सार्वत्रिक जनादेशाचा कल समजता येऊ नये. शिवसेनेचा उत्साह दुणावणे व भाजपा ‘बॅकफुट’वर जाणे या दोन्ही बाबींच्या पलीकडची राजकीय गणिते अजून आकारास यायची आहेत. ती गणिते कदाचित मतदारांच्या दृष्टीने प्रभावाची ठरतील, आजचा निवडणूक निकाल नव्हे !

Why the calculations will change? | खरेच का गणिते बदलतील?

खरेच का गणिते बदलतील?

Next
ठळक मुद्दे चौघांना चीत करीत शिवसेनेने आपला झेंडा रोवला हे विशेषचशिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे तसे मातब्बरमालेगावमधील मतांची भर पडल्यानेही दराडे यांचा विजय सुकर उद्याच्या गणिताचा बदल आज गृहीत न धरलेलाच बरा

साराश
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाच्या नाकावर टिच्चून शिवसेना उमेदवार स्वबळावर विजयी झाल्याने या जागेवर प्रथमच भगवा फडकला, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे उधाण असणे अगदी स्वाभाविक आहे. उमेदवार राष्ट्रवादीचा असला तरी त्यासह काँग्रेस, मनसे व विशेषत: भाजपा अशा चौघांना चीत करीत शिवसेनेने आपला झेंडा रोवला हे विशेषच आहे. या निकालाने सर्वांचेच समज-गैरसमज दूर होण्यास संधी दिली हेदेखील खरे. त्यातून बेभरवशाचे राजकारण अधिक्याने अधोरेखित होऊन गेले, हेही लक्षात घेता यावे. पण, या निवडणुकीत ते जमले किंवा तसे घडून आले म्हणून, आता पुढच्या सर्वच निवडणुकांची गणिते बदलतील अशी अपेक्षा करता यावी का, हा खरा प्रश्न आहे.
मुळात विधान परिषदेचा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ मर्यादित मतदारांचा असतो, त्यामुळे तेथील निवडणुकीसाठीचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ काहीसे वेगळेच असते. पक्षापेक्षाही उमेदवाराकडे असलेली ‘पर्स’ येथे कायम महत्त्वाची ठरत आली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे तसे मातब्बर होते, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे हेदेखील यात कमी नव्हतेच. जेव्हा असे समकक्ष असलेले दोन मातब्बर आमने-सामने असतात तेव्हा प्रचारासाठी आणखीही वेगळ्या मुद्द्यांचा शोध घेतला जातो. यंदा त्यासाठी ‘जात’ कार्ड वापरले गेल्याची चर्चा उघडपणे घडून आली. निवडणूक निकालानंतर नरेंद्र दराडे यांनी प्रतिक्रिया देताना ‘जातीय प्रचाराला मतदारांनी चपराक लगावली’, असे जे सांगितले त्यातून यासंबंधीचा पुरता अर्थबोध होणारा आहे. मराठा-ओबीसी अशा ध्रुवीकरणात भाजपाकडून ऐनवेळी ठोकरल्या गेलेल्या परवेज कोकणी यांच्या नाराजीमुळे वळविल्या गेलेल्या मालेगावमधील काही मतांची भर पडल्यानेही दराडे यांचा विजय सुकर झाल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेची २०७ मते असलेले दराडे तब्बल १९२ जास्तीची मते खेचतात व चार पक्षांची मिळून ३४३ मते असताना सहाणे यांना २३२ मतेच पडतात, या फाटाफुटीचा माग शोधताना जे अन्य ‘फॅक्टर’ समोर येतात त्यात ‘जात’ कार्ड दुर्लक्षिता येऊ नये. पण म्हणून यापुढेही प्रत्येकच वेळी वा बाबतीत मतांचे तसेच ध्रुवीकरण घडेल, असेही समजता येऊ नये. उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क व सार्वजनिक जीवनातील वावर या बाबी ‘जात’ कारणावर नेहमीच मात करीत आलेल्या आहेत हे विसरता येऊ नये.
महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला विजयाची अपेक्षा बाळगण्यासारखी मुळी परिस्थितीच नव्हती. दराडे यांनी अचूक व्यूहरचना केल्याने ‘फोडाफाडी’त त्यांना यश लाभले, भाजपाने ‘युती’ धर्म निभावला असता तर त्यांच्या यशाच्या दुधात साखर पडली असती इतकेच, म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे मतदारसंख्येचे बळ तसेही नव्हते. त्यामुळे पराभवाने त्या पक्षाने काही गमावले नाही, गमावले ते भाजपाने. कारण, शिवसेनेला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्यांनी पारंपरिक मित्रपक्षाला टांग मारून काँग्रेस आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली. यामुळे सहाणे यांचे कागदावरील मतदार संख्याबळ नक्कीच वाढले, त्यातून त्यांचा फाजील आत्मविश्वास दुणावला व तो पराभवाकडे घेऊन गेला हा भाग वेगळा; परंतु तो काँग्रेस आघाडीला जिव्हारी लागण्या ऐवजी भाजपाचा मुखभंग करणारा ठरला. म्हणजे भाजपाने उगाच ‘आ बैल मुझे मार’ करून घेतले. यातून यापुढील गणित काय बदलावे, तर भाजपा-शिवसेनेतील दुरावा आणखीन वाढेल; तो अधिक टोकदार होईल. त्यातून मतदारांचे मनोरंजन घडून येईल. परंतु या निवडणुकीत भाजपाची मते फुटून शिवसेना उमेदवाराला त्याचा लाभ झाला म्हणून जिल्ह्यातील यापुढील निवडणुकांतही भाजपाची मते शिवसेनेकडे वळतील असा भ्रम बाळगता येऊ नये. मर्यादित मतदार असलेली व सार्वत्रिक निवडणुकीतील गणिते वेगवेगळी असतात. भाजपाने आजवर दिलेल्या आश्वासनांची कल्हई उडाल्याने त्या पक्षाला जो काही फटका बसायचा तो बसेलही; पण म्हणून तो या निवडणूक निकालाच्या परिणामस्वरूप बसेल असे म्हणता येऊ नये. शिवाय, या निवडणुकीत टोकाचा विचार करीत भाजपाने राष्ट्रवादीच्या पाठीशी आपले बळ उभे केले, उद्याही तसे होण्याची अपेक्षा धरता येणारी नाही. उद्याची गणिते आणखी वेगळी असू शकतील. त्या निवडणुकांचे मतदार व्यापक प्रमाणातील असल्याने त्यांची खरेदी तितकी सहज-सोपी नसते. तेव्हा, गणिते बदलतील ती तत्कालीन परिस्थितीला अनुसरून, आजच्या निकालाने नव्हे हे लक्षात घ्यायला हवे.

प्रारंभी उल्लेखिल्याप्रमाणे दराडे यांच्या विजयामुळे शिवसेनेतील उत्साह दुणावला आहे व हा उत्साह अगर त्यातून कार्यकर्त्यांत आलेले चैतन्य या पक्षासाठी लाभदायीच ठरेल यात शंका नाही. परंतु राजकीय आघाड्यांवरील उत्साहाची स्थिती काळानुरूप व व्यक्तिगणिक बदलणारी असते. त्यामुळे आज दराडे यांच्या निमित्ताने दिसून येणारा आनंद पुढल्या वर्ष-दीड वर्ष टिकून राहीलच याचीही शाश्वती देता येऊ नये. कारण, याच दराडे यांना उमेदवारी दिली म्हणून पक्षात उमटलेली नाराजीची भावना लपून राहू शकली नव्हती. दराडे विजयी झाले व त्यांनी अन्य पक्षांची मते खेचून आणलीत, असे बोलले जात असले तरी, खुद्द शिवसेनेची मते फुटली नसावीत हे छाती ठोकपणे कसे सांगता यावे? सहाणे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची सल बाळगणारे शिवसेनेत नक्कीच होते. दराडे परपक्षाच्या मतदारांना आपल्याकडे वळवू शकले, तसे परपक्षाच्या उमेदवाराने शिवसेनेचे मतदार वळवले नसतील कशावरून? तेव्हा आपले सर्व मतदार प्रामाणिक राहिले, असा भ्रम शिव सेनेलाही बाळगता येऊ नये. विजयाच्या आनंदात स्वपक्षातील अंतस्थ नाराजीकडे दुर्लक्ष करून उद्याची गणिते बदलण्याची अपेक्षा बाळगणे शिवसेनेसाठीही घातकच ठरावे ते म्हणूनच. दराडे यांच्या विजयाने शिवसेनेतील खासदार संजय राऊत गट आता उचल खाईल, असेही बोलले जात आहे. आमच्याकडे कसलाही गट-तट नसतो. ठाकरे हाच आमचा एकमेव गट असतो, असे म्हणून राऊत या गटबाजीच्या चर्चांना नाकारतीलही. परंतु त्याने वस्तुस्थिती टाळता येऊ नये. मध्यंतरी नाशकातील महानगरप्रमुख बदलले गेल्यानंतर जिल्हाप्रमुख बदल मागे पडला होता. तो कदाचित आता केला जाईल. तसा बदल गरजेचा असल्याची खुद्द शिवसैनिकांतही चर्चा आहे, तेव्हा गणित बदलण्याची अपेक्षा आहे ती संघटनात्मक पातळीवर.

राहता राहिला मुद्दा, दराडे यांच्या विजयाने येवल्यातील गणिते बदलतील का याचा; तर त्यासाठी पुलाखालून अजून बरेच पाणी जायचे आहे. भुजबळ जामिनावर सुटल्यावर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने मुंबईबाहेर पडू शकले नाहीत. येवल्यात यायची इच्छा असूनही ते येऊ शकले नाहीत; पण सारेच उमेदवार मुंबईत जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आल्याने प्रत्येकानेच आपापल्यापरीने त्या भेटीचा प्रचार केला. खासगी संदर्भाने आमदार पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर जाऊन आले होते व मिलिंद नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतली होती, त्याचेही संदर्भ घेऊन भुजबळांची अनुकूलता
भासविली गेली. दराडे यांनी त्यांच्या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत भुजबळांचे नाव घेतल्याने यासंदर्भातील शक्यतांना अधिकच
हवा मिळून गेली. भुजबळांचे ‘प्रवक्ते’ म्हणविणाºयांनी त्याबाबत नकाराचा खुलासा केलाही; परंतु खरेच दराडे यांना त्यांची मदत झाली असेल तर उद्या येवल्यात गणिते बदलायची अपेक्षा कशी करता यावी? आणि समजा मदत झाली नसेल, तर का दराडे तेथील चित्र बदलू शकतील? दराडेंचे जाऊ द्या, पण ज्या ‘मातोश्री’शी भुजबळ आजही सलोखा ठेवून आहेत व शिवसेनाप्रमुखांच्या अटकेवरून आलेली कटुता विस्मरणात गेलेली नसताना जुन्या संबंधाचा धागा जपून आहेत, त्यांची काय भूमिका असेल? भाजपाशी जमणे शक्य नसताना शिवसेना हाताशी काही अन्य पक्षीय पत्ते राहू देणार असेल तर भुजबळ त्यात असतील का, अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांची उकल यासंदर्भात होणे बाकी आहे. म्हणूनच, उद्याच्या गणिताचा बदल आज गृहीत न धरलेलाच बरा.

Web Title: Why the calculations will change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.