हे तरी उड्डाण टिकून राहो !

By किरण अग्रवाल | Published: June 3, 2018 02:16 AM2018-06-03T02:16:24+5:302018-06-03T02:16:24+5:30

नाशिककरांसाठी मुंबई आता तशी जवळ आली आहे. वेळेची बचत व्हावी म्हणून मुंबईला विमानाने जाण्यासारखी रस्त्याची अवस्था दयनीय अगर पूर्वीसारखी वेळखाऊ राहिलेली नाही. त्यामुळे नाशिक-मुंबई विमानसेवेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. म्हणूनच आता नाशिक-दिल्ली व तेथून अन्य ठिकाणी जाता येईल, अशी सोय असणारी सेवा सुरू होऊ घातली आहे. यापूर्वीचे ‘चालू-बंद’चे प्रकार जमेस असले तरी, सद्यस्थितीत रस्ता व रेल्वेमार्गेही ‘दिल्ली दूर’ असल्याची वास्तविकता पाहता, हा नवीन प्रयत्न नक्कीच यशस्वी व कायम टिकण्याची अपेक्षा करता यावी.

Stay this flight! | हे तरी उड्डाण टिकून राहो !

हे तरी उड्डाण टिकून राहो !

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अबकी बार न होंगी हार’ अशी अपेक्षा गैर ठरू नयेविमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा अलीकडच्या काळात वाढलीवेळ सकाळची केल्यावर कशीबशी सेवा सुरू किमान चांगले भविष्य लाभण्याची अपेक्षा

साराश
नाशिक येथून विमानोड्डाणाचा विषय आता जणू गमतीचाच भाग बनला असला तरी, स्थानिक उद्योजक व लोकप्रतिनिधींनी त्यासाठी चालविलेले सातत्यपूर्वक प्रयत्न महत्त्वाचेच ठरणारे आहेत. अनेकदा सुरू होऊन अडखळलेली ही सेवा कायम राखण्यासाठी पुन्हा नव्याने सुरू झालेल्या प्रयत्नांकडे त्याचदृष्टीने बघता यावे. आता एकमेव मुंबईसाठी नव्हे तर दिल्ली व तेथून अन्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ठिकाणांची सेवाही उपलब्ध करून देण्याच्या हालचाली असल्याने ‘अबकी बार न होंगी हार’ अशी अपेक्षा गैर ठरू नये.
नाशिक-मुंबई विमानसेवेचा पार येळकोट झाला आहे. अतिशय जुनी असलेली विमानसेवेची मागणी पूर्णत्वास आली तीच मुळी रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर. त्यामुळे या सेवेची पूर्वी जितकी व जशी निकड भासायची तशी परिस्थिती आज राहिलेली नाही. पूर्वी मुंबईला रस्तामार्गे पोहोचण्यासाठी पाचेक तास लागत. आता तीच वेळ तिनेक तासांवर आली आहे. परंतु म्हणून विमानसेवेची गरज संपली आहे असे मुळीच नाही. उलट राज्यात छगन भुजबळ मंत्री व समीर भुजबळ खासदार असताना त्यांच्या प्रयत्नांतून अद्ययावत विमानतळ उभारले गेले परंतु विमानसेवाच नसल्याने त्या वास्तू वा व्यवस्थेचा उपयोग होत नाही, ही प्रत्येक नाशिककरांना बोचणारी बाब ठरली आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने मुंबई जवळ आली, पण दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आदी ठिकाणी जाण्यासाठीची नाशिककरांची कसरत संपलेली नाही. त्यामुळे थेट नाशकातून मुंबई व्यतिरिक्तची विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा अलीकडच्या काळात वाढली आहे. त्याचदृष्टीने नवीन प्रयत्न होत असल्याने त्यास प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वाढून गेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, नाशिकच्या एअर कनेक्टिव्हिटीकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी व उद्योजक संघटनांनी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांनी आपली सेवा सुरूही करून पाहिली, परंतु प्रवाशांअभावी ती बंद केली गेली. मुंबईसाठी प्रतिसाद लाभत नाही म्हणून नागपूर विमानसेवा सुरू केली गेली, मात्र त्यासही फारसे प्रवासी लाभले नाहीत. मोदी सरकारने हाती घेतलेल्या ‘उडान’ योजनेअंतर्गत मोठ्या अपेक्षेने जी सेवा सुरू झाली तीदेखील रडतखडतच आहे. या सेवेसाठी मुंबईत विमान उतरविण्यासाठी ‘स्लॉट’ मिळत नाही म्हणून मध्यंतरी खासदार हेमंत गोडसे यांना दिल्लीत आंदोलन करावे लागले तेव्हा कुठे हालचाल होऊन तो ‘स्लॉट’ मिळाला व विमान उडू लागले. परंतु गैरसोयीच्या वेळांमुळे त्यासही प्रतिसाद लाभू शकला नव्हता. आता वेळ सकाळची केल्यावर कशीबशी सेवा सुरू आहे. यासर्व पार्श्वभूमीवर अल्पप्रतिसादाची मुंबई सेवा देण्याऐवजी दिल्ली व तेथून देशांतर्गत अन्य शहरांमध्ये आणि विदेशांत जाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी पाहता नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लाभून जाणे शक्य होणार आहे.
विमानसेवा देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांनी यासंदर्भात चाचपणी व चर्चा करताना अपेक्षित प्रवासी संख्या उपलब्ध होण्याची अपेक्षा बोलून दाखविली असली तरी त्यासाठी अगोदर सातत्यपूर्वक सेवा दिली जाणे गरजेचे आहे. विमान कंपन्या धर्मादाय सेवेसाठी त्यांचे विमानोड्डाण करणार नाहीत हे जसे खरे तसे हेदेखील खरे की, विमानसेवा सुरू राहावी म्हणून नाशिककर उगाच हौसेखातर दिल्लीवाºया करणार नाहीत. त्यामुळे प्रवासी संख्येवर न अडकता विमानसेवा सुरू करण्याची भूमिका हवी. प्रारंभीच जादा प्रवासी क्षमतेचे ‘बोर्इंग’ सुरू करून नंतर तितके प्रवासी उपलब्ध होत नाही, अशा तक्रारीला संधी देण्यापेक्षा अगोदर कमी आसनाच्या विमानाचा पर्याय या संदर्भात स्वीकारता येऊ शकेल. दुसरे म्हणजे ओझरला जाण्यासाठी नाशकातून एअरपोर्टपर्यंत पिकअप व ड्रॉप म्हणजे ने-आणची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ‘तान’सारखी संघटना आज त्यासाठी पुढाकार घेत आहे हे कौतुकास्पद आहे, पण ती व्यवस्थाही कायम राहण्याच्यादृष्टीने प्रयत्न हवेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विमानसेवेसाठी पुरेशी प्रवासी मिळत नाही, अशी तक्रार व त्यामुळे सुरू होऊन अल्पावधीत बंद पडणारी सेवा पाहता ओझरला ‘हँगर’ म्हणजे पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. मुंबईमधील ‘एअर कंजेशन’ पाहता लगतच्या अहमदाबाद आदी ठिकाणी ‘नाइट लॅण्डिंग’ला मुक्कामी जाणारी विमाने जर त्यापेक्षा नजीकच्या ओझरला वळविता आली तर त्यांचा इंधन खर्च वाचेलच, परंतु अशी विमाने मुंबईला सकाळी जाताना पुरेसे प्रवासी असण्याची आवश्यकता उरणार नाही. तेव्हा, विमानसेवेसाठी कंपन्यांची दारे ठोठावण्याबरोबरच सरकारकडे पाठपुरावा करून ओझरला ‘हँगर’ची व्यवस्था करून घेतल्यास ते अधिक उपयोगी ठरेल. कंपन्यादेखील उद्योजकांवर लक्ष केंद्रित करून मार्केटिंग करतात, पण येथे येणारे व नाशकातून मोठ्या प्रमाणात दिल्ली, बंगळुरू व विदेशात जाणारे विद्यार्थी अशा घटकांकडे त्यांचे दुर्लक्षच होताना दिसते. तेव्हा, या अन्य घटकांनाही आकर्षित करण्यासाठी काही सोयी-सवलतींचे ‘पॅकेज’ आणले गेले तर त्यातून प्रवासीसंख्या निश्चितच वाढू शकणारी आहे. १५ जूनपासून सुरू होऊ घातलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला या पार्श्वभूमीवर किमान चांगले भविष्य लाभण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Stay this flight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.