शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:59 AM2018-02-18T00:59:19+5:302018-02-18T01:01:26+5:30
दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन सभा झाली. यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे म्हणाले. केंद्र सरकारने जनधन खाते उघडायला लावले; पण बँक खात्यात दमडी आली नाही व आता येण्याची शक्यताही नाही, कारण नीरव मोदी बँकांना करोडो रु पयांचा चुना लावून पळून गेला आहे. हा घोटाळा ९० हजार कोटींच्या पुढे जाणार आहे. राज्यातही तेच घडले, उतारा कोरा, शेतमालाला भाव आदी आश्वासने देत फडवणीस सरकार सत्तेत आले; पण त्यांनी फसवणूक केली. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील युती सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे हे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी औदासी सरकार असून, जनता या औदासी सरकारला घालवणार असल्याचे सांगितले. जिजाऊ मातेची जन्मभूमी सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री यांनी निधीची घोषणा केली; मात्र एक दमडी दिली नाही, असेही सुळे म्हणाल्या. प्रास्तविक आमदार नरहरी झिरवाळ यांनी करत मतदारसंघाची व सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीचे विवेचन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी नागरिक उपस्थित होते.कर्जमाफी देताना विविध निकष लावत लोकांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले तसेच आता गारपिटीच्या नुकसानभरपाईला विविध निकष लावले जात आहेत. गारपिटीत शेकडो पाळीव प्राणी मरण पावली. त्यांच्या भरपाईसाठी पोस्टमार्टमची अजब अट घातली असल्याचे मुंडे म्हणाले.
या सरकारला काही देण्याची दाणतच नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
सहकारी कारखाने चालविणे आज सोपे नाही; मात्र श्रीराम शेटे यांनी कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना अत्यंत सुस्थितीत आणत कादवा कारखाना चालवला हे सहकारात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाºयांना किती शाखा उघडल्या व उर्वरित कधी उघडणार विचारत पक्ष संघटनेबाबत हजेरी घेतली.