रोषास कारण की...

By किरण अग्रवाल | Published: August 12, 2018 02:14 AM2018-08-12T02:14:12+5:302018-08-12T02:14:51+5:30

ठिय्या व बंददरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने त्यावर दिशाहीनतेचा आरोप होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलली गेली व सकल मराठा समाजातील नेते मंडळी पुनश्च एकसंधतेने पुढे आलेली पहावयास मिळाली, ही इष्टापत्तीच म्हणता यावी. आता या नेतृत्वकर्त्यांनी आरक्षणाचा विषय आणखी पुढे नेतानाच रस्त्यावर शक्ती व्यर्थ न घालवता मराठा विद्यार्थी वसतिगृहांसाठी जागेचे संपादन व ‘मेरी’तील दोन इमारतींचे हस्तांतरण करण्याबाबत जी कार्यवाही घडून येत आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्यास आंदोलनाची रचनात्मक फलश्रुती घडून येऊ शकेल.

Roshas reason ... | रोषास कारण की...

रोषास कारण की...

Next

ठिय्या व बंददरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने त्यावर दिशाहीनतेचा आरोप होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलली गेली व सकल मराठा समाजातील नेते मंडळी पुनश्च एकसंधतेने पुढे आलेली पहावयास मिळाली, ही इष्टापत्तीच म्हणता यावी. आता या नेतृत्वकर्त्यांनी आरक्षणाचा विषय आणखी पुढे नेतानाच रस्त्यावर शक्ती व्यर्थ न घालवता मराठा विद्यार्थी वसतिगृहांसाठी जागेचे संपादन व ‘मेरी’तील दोन इमारतींचे हस्तांतरण करण्याबाबत जी कार्यवाही घडून येत आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्यास आंदोलनाची रचनात्मक फलश्रुती घडून येऊ शकेल.
मराठा आरक्षणासंबंधीनाशिक शहर व जिल्ह्यात झालेल्या विविध आंदोलनात शिस्त-संयमाचा तसेच सनदशीर मार्गाचा आदर्श घालून दिला गेला असताना व त्यास आजवर कधीही, कसलेही गालबोट लागलेले नसताना परवा असे काय झाले की, आंदोलक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला असला तरी, त्या उद्रेकाचे कारण कुण्या व्यक्ती वा राजकीय पक्षात शोधता येऊ नये. अपेक्षापूर्तीच्या वाटेत अनास्था व व्यवस्थांचे अडथळे असल्याची सार्वत्रिक भावना वाढीस लागते तेव्हा कुठलाही समूह अनियंत्रितच बनून पुढे आल्याचा इतिहास आहे. अशावेळी विवेकाचे बोट सुटू न देणे महत्त्वाचे असते. नाशकातील आंदोलनाला आक्रमक वळण लागल्याचे दिसून येताच, दुसऱ्याच दिवशी तातडीने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळवले ही बाब त्यादृष्टीने समाधानाची तर ठरलीच, शिवाय तात्कालिक आक्रमकता या नेत्यांमधील एकसंधतेला निमंत्रण देणारीही ठरली म्हणायचे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चांपासून तर आतापर्यंत जी जी काही आंदोलने नाशकात व जिल्ह्यात केली गेलीत, त्यात सकल मराठा समाजाने कमालीच्या शिस्त व संयमाचे दर्शन घडविले आहे. म्हटले तर या आंदोलनाला कुणा प्रस्थापिताचे नेतृत्व नाही. अवघ्या समाजानेच ते हाती घेतले आहे, त्यामुळे राजकीय पक्ष व अन्य संस्था-संघटनांचे जोडे बाहेर काढून सारे जण त्यात सहभागी झाले असले तरी विशेषत: तरुण मंडळी हिरिरीने हे आंदोलन पुढे चालवित आहे. यात मध्यंतरी राज्यात काही ठिकाणी अपवादात्मक अप्रिय घटना घडल्या असल्या तरी, नाशिक जिल्ह्यात सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू होते. आमदारांच्या घरासमोर करण्यात आलेल्या ठिय्यांप्रसंगी संबंधितांनी आंदोलकांना सामोरे जात व मागण्यांबद्दलची आपली सहमती दर्शवित मराठा समाजाच्या बरोबरीने या आंदोलनात स्वत: सहभागी होण्याचीही भूमिका घेतल्याने मोठी सकारात्मकता त्यास लाभलेली दिसून आली. त्यावेळी मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी दिल्या गेलेल्या आश्वासनाची फलश्रुती होतानाही दिसून येत आहे. ते मोठे यश मानता यावे. अशात आंदोलनाचा मार्ग अथवा दिशा कशी असावी यावरून मतभिन्नता झाली असेलही; पण सर्वच संबंधितांनी सामोपचाराने घेतल्याने आपल्याकडील संयम अबाधित होता. म्हणूनच ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असतानाही नाशकात मात्र केवळ ठिय्या देऊन आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याबद्दल आश्वस्त करण्यात आले होते. ठिय्याला तशी सुरुवातही झाली होती. परंतु काही आंदोलकांच्या रोषाचे अभिव्यक्तीकरण वेगळ्या पद्धतीने घडल्याने परिस्थितीत तणाव ओढवला.
ठिय्याप्रसंगी बोलताना कुणाकडून तरी काही राजकीय उल्लेख घडून आल्याने व त्यास रोखून आंदोलन भरकटू नये म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नातून हा तणाव झाला खरा; परंतु त्याकडे व्यक्तीविरोधातील नव्हे तर, व्यवस्थेबद्दलचा रोष म्हणून पाहायला हवे. मराठा समाजाने आजवर नेतृत्वाची वेळोवेळी संधी घेऊनही समाजाच्या पदरी मात्र हाल-अपेष्टाच आल्याचे शल्य यामागे होते, कुणा एका राजकीय व्यक्तीवर हा रोष नव्हता तर एकूणच समाजाची फरफट पाहून व अनुभवूनही सत्तेत असताना काही न करता आलेल्या व्यवस्थेविरुद्धचा तो रोष होता. नाशकात धक्काबुक्की, चप्पलफेक व राजकारण्यांच्या वाहनांवर दगडफेक घडून आली असली तरी जिल्ह्यात मात्र ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या उपस्थितीतच मोर्चे निघालेले, ठिय्ये दिले गेलेले किंवा रास्ता रोको केले गेलेले पाहावयास मिळाले. तिथे कुठेही गालबोट लागले नाही. तेव्हा रोषाचे कारण समजून घ्यायला हवे. तो व्यक्तीवर नसावाच मुळी. गर्दीचे मानसशास्त्र समजून घेण्यात गल्लत झाली तर असे प्रकार घडून येतात. पण, झाल्या प्रकारानंतर त्यावर मोठ्या मनाने पडदा टाकण्यात आला. म्हणूनच तर, ज्यांच्या बाबतीत सदर प्रकार घडून आल्याचे बोलले गेले त्या अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनीच पुढाकार घेत पुन्हा शांततेने आंदोलन हाताळण्याचे प्रयत्न केलेले व त्यात यशही आलेले दुसºया दिवशी पहावयास मिळाले. कारण जराशा आगळिकीने शहरातले वातावरण बिघडून आंदोलनाला चुकीचे वळण लागू नये अशी प्रामाणिक भावना त्यामागे होती व आहे. त्यामुळे रोखून धरलेली वाफ उफाळून येताना जसे वा जे घडते, तसेच या आक्रमकतेकडे पाहून त्यातून घडून आलेला समाजाच्या एकसंधतेचा प्रत्यय महत्त्वाचा मानायला हवा.
नाशकातील तरुण फळीने खरेच खूप संयमाने आंदोलन हाताळले आहे. क्रांतिदिनी अघोषित बंद घडून येऊन जोही काही प्रकार घडला तो पाहता सकल समाजाचे नेते पुन्हा एकवटले. पहिल्या क्रांती मोर्चाप्रसंगी जशी सर्वपक्षीय नेत्यांची सामीलकी दिसून आली होती, तशीच यानिमित्ताने घडून आली. त्या मोर्चात ही प्रस्थापित मंडळी सर्वात शेवटी होती. पण त्यांच्या पाठबळाचा आधार होता. दरम्यानच्या काळात अनेक प्रस्थापित नेते बाजूला राहिल्यासारखे दिसून आले होते. त्यामुळे मध्यंतरी प्रस्थापित नेतृत्वाखेरीज तरुण फळीने आंदोलन टिकवून धरले. परंतु त्यांनीही अखेर ज्येष्ठांचा सन्मान राखत त्यांच्या पुढे न जाण्याची भूमिका घेतली. त्यातून राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार नाशकातील पुढची रूपरेषा ठरविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला ही जमेची बाजू ठरली. ज्येष्ठ व तरुण नेतृत्वाच्या समन्वयाची ही गुढीच पुन्हा शिस्तशीर व संयमाने आंदोलन चालविण्याची ग्वाही देणारी ठरावी. रोषाचे कारण व्यवस्था व राजकारण्यांविषयीची नकारात्मकता असली तरी, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसू न देण्याची सकल मराठा समाजाची यातील भावना व भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने नाशकात तात्काळ पाऊले पडलीत, हेच समाधानाचे आहे.

 

Web Title: Roshas reason ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.