राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; शहर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:32 AM2018-12-11T01:32:24+5:302018-12-11T01:32:55+5:30

हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली.

 Nashik: The coldest winter in the state; The city is frozen | राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; शहर गारठले

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; शहर गारठले

Next

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली. शहरात किमान तपमान १२.८, तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशांपर्यंत खाली घसरला. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे.
मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशांपर्यंत तर किमान तपमान ११.२ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर सातत्याने किमान तपमानासह कमाल तपमान सलग चार दिवस कमी राहिले. २८.२ अंशांपर्यंत कमाल तपमान खाली घसरले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तपमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; मात्र अचानकपणे ३१ अंशांपर्यंत पोहचलेला कमाल तपमानाचा पारा थेट सोमवारी २८.२ अंशांपर्यंत घसरला तर किमान तपमान १३.४ अंशांवरून १२.२ अंशांपर्यंत खाली आले. वातावरणात सोमवारी सकाळी ७६ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यात आले.
दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका
शहराचे हवामान अचानकपणे बदलले असून, येत्या दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून, गुरुवारनंतर (दि.१३) किमान तपमानात १ अंशाने वाढ होऊ शकते, असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. कमाल तपमान वाढल्यास काही अंशी वातावरणात उष्मा निर्माण होऊन थंडीपासून दिलासा मिळू शकेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Web Title:  Nashik: The coldest winter in the state; The city is frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.