‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

By किरण अग्रवाल | Published: July 7, 2019 01:09 AM2019-07-07T01:09:33+5:302019-07-10T09:35:59+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, शिवाय मतविभागणीवर नजर ठेवून आडाखे बांधणाऱ्यांनाही नवीन उंबरठा लाभू शकेल.

'MNS' - If the threads of 'Swabhimani farmer' match ... | ‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

‘मनसे’-‘स्वाभिमानी शेतकरी’चे धागे जुळले तर...

Next
ठळक मुद्देकाँग्रेस आघाडीत सन्मानजनक जागावाटप न झाल्यास विरोधकांमध्ये नवा पर्याय आकारास येण्याची चिन्हेलोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाºया ठरूशकतात.समविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे व राजू शेट्टी या दोघा मातब्बर नेत्यांच्या दोनदा दीर्घ बैठका झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीखेरीजचा वेगळा पर्याय मतदारांपुढे येतो की काय, याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक बनले आहे. तसे झाले, म्हणजे ‘मनसे’ व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली तर नाशिक जिल्ह्यातही काही जागांवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, देशाची व राज्याची गणिते वेगवेगळी असतात म्हणून सारेच विरोधक पुन्हा नव्या जोमाने विधानसभेसाठीच्या तयारीला लागले आहेत. यात भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वांनाच एकत्र घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत खरे; परंतु वंचित आघाडीसारख्या पक्षांनी अवाजवी जागा मागितल्याचे पाहता त्यांची वाटचाल स्वतंत्रच राहण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतही जागा वाटपाचा तिढा नाही असे नाही, शिवाय मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यायच्या हा कळीचाच मुद्दा ठरूशकणारा आहे. पराभवाची खात्री असली तरी लढून पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठी असल्याने अन्यसमविचारी पक्षांना त्यांच्याकडून स माधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.



याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे व राजू शेट्टी यांच्यातील खलबतांकडे पाहता यावे. राज्यात सर्वच ठिकाणी नसला, तरी काही विशिष्ट भागात वा मतदारसंघात या दोघा नेत्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा प्रभाव नक्कीच आहे. विशेषत: राज यांचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरी भागावर राहिलेले आजवरचे लक्ष व शेट्टी यांचा कोल्हापूर, सांगलीकडील प्रभाव आणि अन्यत्रही ग्रामीण भागात पोहोचलेले संघटनात्मक कार्य पाहता, शहरी व ग्रामीण या दोघा क्षेत्रात त्यांची परस्परपूरकता उपयोगी ठरू शकेल. पारंपरिक पक्ष व त्याच त्या चेहºयांखेरीजचा पर्याय म्हणून या दोघा नेत्यांच्या सामीलकीकडे बघितले जाऊ शकते. २००९ मध्ये ‘मनसे’ने प्रथमच तब्बल १४३ जागा लढवत १३ आमदार निवडून आणले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ने २१८ तर ‘स्वाभिमानी’ने भाजपसोबत राहत १५ जागा लढविल्या होत्या. यंदा काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास या दोघांनाही जागांसाठी मोठी तडजोड करावी लागेल. तेव्हा, सर्वांसोबत जाऊन कमी जागेत जास्त यशाची अपेक्षा करण्यापेक्षा अधिक जागा लढून माफक यश मिळाले तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा विचार ते करू शकतात.



अशा स्थितीत, नाशिक जिल्ह्यातील काही जागांवर ही राजकीय दुक्कल जय-पराजयाची समीकरणे नक्कीच घडवू अगर बिघडवू शकेल. ‘मनसे’ने यापूर्वी नाशकातील तीनही जागा मिळविल्या होत्या, तर बागलाणमध्ये एकेकाळी शेतकरी संघटनेचा आमदार राहिला आहे. राज ठाकरे यांनी ‘मनसे’चा पाया विस्तारण्यासाठी मध्यंतरी केलेल्या जिल्हा दौºयात दिंडोरी, पेठ, कळवण, इगतपुरीत त्यांना मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले होते. ‘मनसे’तील स्थानिक पातळीवरील अनिल मटाले, सलीम शेख आदी नव्या नेतृत्वानेही चांगली धडपड चालविलेली दिसून येत आहे. ‘स्वभिमानी’च्या हंसराज वडघुले, कवी संदीप जगताप, नाना बच्छाव आदी तरुण फळीने कांदा आंदोलन व जिल्हा बँकेच्या सक्तीने केल्या जाऊ पाहणाऱ्या कर्ज वसुलीविरोधात संघर्ष करून पक्षाला ग्रामीण भागात बºयापैकी चेहरा प्राप्त करून दिला आहे. कर्जमुक्तीसाठी पुणतांब्यातून सुरू झालेल्या आंदोलनाला निर्णायक दिशा नाशकातून दिली गेली, त्यावेळीही ही फळी आघाडीवर होती. त्यामुळे निफाड, नांदगाव, सटाणा, चांदवड आदी जागा ‘स्वाभिमानी’ला खुणावणाऱ्या ठरू शकतात.

एकूणात, काँग्रेस आघाडीमध्ये समाधानकारक जागा मिळणार नसतील तर ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’चा एकत्रित नवा पर्याय आकारास येऊ शकतो. काही ठिकाणी मतदारांची पसंती तर काही जागांवर मतविभाजनातील हाराकिरीतून यशाचे आडाखे ते बांधू शकतात. त्यासाठी इतरांकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक ‘आयते’ गळास लागू शकतील. ‘अपक्ष’ लढण्यापेक्षा हा नवा पर्याय अनेकांना कामी येईल. ठाकरे व शेट्टी यांच्यातील वाढती ऊठबस म्हणूनच वेगळ्या वाटचालीचा संकेत देणारी म्हणता यावी.

Web Title: 'MNS' - If the threads of 'Swabhimani farmer' match ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.