चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

By किरण अग्रवाल | Published: April 23, 2019 08:10 AM2019-04-23T08:10:48+5:302019-04-23T09:27:23+5:30

काळाच्या बदलानुसार व्यक्तीच्याही गरजा व अपेक्षा बदलत असतात. कालसापेक्षता महत्त्वाची मानली जाते ती त्यामुळेच. राजकारणाच्या क्षेत्रालाही ते लागू होते.

Chavan's arm showing unaware! | चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

चव्हाण यांचे हात दाखवून अवलक्षण!

Next

-  किरण अग्रवाल

काळाच्या बदलानुसार व्यक्तीच्याही गरजा व अपेक्षा बदलत असतात. कालसापेक्षता महत्त्वाची मानली जाते ती त्यामुळेच. राजकारणाच्या क्षेत्रालाही ते लागू होते. यात काळानुसार स्वत:ला बदलावे लागते, अन्यथा आपला पक्ष किंवा मतदारच आपल्याला बदलण्याची भूमिका घेऊन मोकळे होतात. यासाठी कुठे थांबायचे, याचा निर्णय घ्यावा लागतो; जो सहजासहजी कुणी घेताना दिसत नाही. राजकीय व्यक्ती तर जिवाच्या अंतापर्यंत ‘खुर्ची’त राहू इच्छिते. त्यामुळे कुणी काही बदल केला की नाराजीतून त्यांचे पाय अधिक खोलात जाताना दिसून येतात. नाशिक जिल्ह्यातील भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याही बाबतीत तेच झाल्याचे म्हणता यावे.

लोकसभा निवडणुकीतीलनाशिकदिंडोरीमधील ‘युती’च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (ब) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली असता, त्यांच्या व्यासपीठावर तिकीट कापलेले खासदार चव्हाण उपस्थित झाले खरे; पण गेल्या पंचवार्षिक काळात ज्यांच्यासोबत ते संसदेत होते, त्या मोदी यांनी चव्हाण यांच्याशी बोलण्याचे किंवा त्यांच्याकडे पाहण्याचेही टाळून उलट शिवसेनेच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा केलेली दिसून आली, त्यामुळे चव्हाण यांची भाजपतील उपयोगीता संपल्याचेच स्पष्ट संकेत यातून मिळालेत. खरे तर दिंडोरीच्या उमेदवारीवरून चव्हाण यांनी जे नाराजी नाट्य प्रदर्शिले त्या पार्श्वभूमीवर भाजपतही काहीशी चिंताच व्यक्त केली जाते आहे. पण अशाही स्थितीत चव्हाण मोदी यांच्या सभेनिमित्त व्यासपीठावर आल्याने त्यांना भाषण करायला संधी देऊन मतदारांमधील संभ्रम दूर करण्याची भाजपला संधी होती. नगरमध्ये दिलीप गांधी यांना बोलू दिले गेले होते; परंतु पिंपळगाव (ब)च्या सभेत चव्हाणांच्या बाबतीत तेही टाळले, त्यामुळे भाजपनेच आता त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणता यावे.

का झाले असावे हे चव्हाणांच्या बाबतीत? तर त्यांना तिकीट कापल्याची नाराजी कुठे सोडून पुढे पक्षकार्यात लागायचे हे कळले नाही म्हणून. नाशकात माणिकराव कोकाटे यांची भूमिका नक्की होती. भाजपने तिकीट नाही दिले तरी लढायचेच असे त्यांनी ठरविले होते. पण, दिंडोरीत तिकीट कापले म्हणून अपक्ष लढण्याची हिंमत चव्हाण दाखवून शकले नाहीत. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, कोरड्या विहिरीत उडी मारायची जर मानसिकता नव्हती तर नाराजी ताणून धरण्याची गरज काय होती, असा प्रश्न पडावा. पक्षाने उमेदवार बदलला म्हटल्यावर मोठ्या मनाने निर्णय स्वीकारून दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला ते लागले असते तर ‘झाकली मूठ...’ राहिली असती. त्यामुळे भविष्यात कदाचित वेगळी संधी चालून येऊ शकली असती; परंतु कुठे थांबावे हे चव्हाण यांना कळले नाही आणि अखेर मोदी यांच्या व्यासपीठावर जाऊनही दुर्लक्षित ठरण्याची नामुष्की त्यांनी ओढवून घेतली. ‘हात दाखवून अवलक्षण’ म्हणतात ते यालाच.

महत्त्वाचे म्हणजे, राजकारणात अनिच्छेनेही कधी कधी समझौते करून संयमाची भूमिका घ्यावी लागते, अन्यथा काळ मागे सोडून दिल्याशिवाय राहात नाही. राज्यात भाजपचे सरकार असताना आदिवासी विभागातील भरती प्रक्रियेवर आवाज उठवत चव्हाण यांनी स्वपक्षाचेच मंत्री विष्णू सावरा यांना अडचणीत आणून ठेवले म्हणून तशीही पक्षांतर्गत नाराजी ओढवून घेतली होती. त्यात तिकीट कापले गेल्यावर थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांना एका आरोग्य शिबिरासाठी आर्थिक मदत दिली नाही म्हणून आपली उमेदवारी डावलल्याचा आरोप ते करून बसले. परिणामी पक्ष धुरिणांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले ओरखडे अधिक वेदनादायी ठरणे स्वाभाविक बनले. मनुष्याला राग येतो तेव्हा, ‘ठंडा कर के खाने का...’ सल्ला दिला जातो. तापल्या तव्यावर पाणी शिंपडले गेले तर चर्रऽऽऽ होतेच. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बाबतीत तेच झाले, नव्हे त्यांनी ते ओढवून घेतले; त्यामुळेच मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावर चव्हाणांकडे हेतुत: दुर्लक्ष केले गेलेले दिसून आले जे त्यांच्या सर्वपक्षीय मित्रांना व पक्षातील समर्थकांनाही व्यथित करणारेच ठरले.  

Web Title: Chavan's arm showing unaware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.