पुलाच्या कठडय़ावर ट्रक आदळून पेचरीदेवजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:20 AM2019-07-19T11:20:14+5:302019-07-19T11:20:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव गावाजवळ कांजी नदीच्या पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा पाटा तुटल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव गावाजवळ कांजी नदीच्या पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा पाटा तुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली.
पिंपळनेरहून कांदे भरुन अहमदाबादकडे जाणारा ट्रक (क्रमांक जी.जे.01 जीटी- 2200) 17 जुलैच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास पेचरीदेव येथील कांजी नदीचा पूल ओलांडत होता. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे ट्रकचा पाटा तुटल्याने पुलाच्या कठडय़ावर ट्रक आदळून कठडा तोडून भिंतीलगत लटकला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तनवीर पीरमोहंमद अन्सारी रा.धुळे याने अक्कलकुवा पोलिसांत अपघाताची माहिती दिली असून नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी हे.कॉ.दीपक पानपाटील, अजित गावीत, अंकुश गावीत, शरद पाटील यांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध करून दिली.
दरम्यान, या रस्त्यांवर खड्डय़ांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने अपघाताची संख्या वाढली आहे. त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करावे किंवा दज्रेदार दुरुस्तीची मागणी होत आहे.