पैनगंगा नदी कोपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:46 AM2018-08-17T00:46:26+5:302018-08-17T00:47:32+5:30

बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याशिवाय माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी गावांतील शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले.

Panganga River Kopali! | पैनगंगा नदी कोपली !

पैनगंगा नदी कोपली !

googlenewsNext
ठळक मुद्देकिनवट- माहूर तालुक्यांना पावसाने झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट/ माहूर : बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याशिवाय माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी गावांतील शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले.
पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली होती. पाणी पुलावरुन वाहत असल्याने दोन्ही बाजूचे कठडे तुटले तर पुलाची क्षतीही झाल्याची शक्यता आहे. पैनगंगा नदीचे पाणी किनवट शहरातील नालागड्डा, रामनगर, मोमीनपुरा, गंगानगर, इस्लामपुरा व बेल्लोरी येथील अंदाजे १५० ते २०० घरात पाणी शिरले.
दुपारपर्यंत पन्नास कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. उर्वरित कुटुंबातील लोकांना हलविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली़ गजानन महाराज मंदिर वसाईबाबा मंदिर पाण्याने वेढले. कृष्ण प्रिय गो शाळेतील सर्व गायी व जनावरांना हलविण्यात आले़ पावसामुळे किनवट गोकुंदा रोडवर उपविभागीय अधिकारी कार्यालय व पेट्रोल पंप रोड पाण्याखाली आले होते़ याही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ कोठारी नजीकच्या पेट्रोल पंप व एमआयडीसी रस्त्यावरही पाणीच पाणी होते़ किनवट-माहूर मार्गावरील शहरालगतच्या सीरमेटी नाल्यावरून पुराचे पाणी डाब धरल्याने दुपारपासून वाहतूक ठप्प झाली. दुपारी तीन वाजता पाऊस थांबल्याने पाणी उतरण्याच्या मार्गावर होते़ पैनगंगा नदी पुलावरुन पाणी वाहिल्याने हाही मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला़ शनिवारपेठ येथेही घरात पाणी घुसून बाधित झाले होते़
बोधडी खु भागात झालेल्या पावसाने व चक्रीवादळाने झाडे उन्मळून पडली आहे़ १९८३ पावसापेक्षाही मोठा पूर नाल्याला आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले़ पूरपरिस्थितीवर तहसीलदार नरेंद्र देशमुख, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत़ किनवटचे आ़प्रदीप नाईक यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे हेही होते़

सखल भाग जलमय
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शहरातील बाबानगर, आनंदनगर, वसंतनगर यासह हिंगोलीगेट, बाफना चौक, हमालपुरा आदी भागांमध्ये पाणी साचले होते. महापालिकेने आपत्तीनिवारण पथकांची स्थापना केली आहे.
शहरात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. संततधार सुरू झालेला हा पाऊस गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरूवारी सकाळपासूनच पावसाचा वेग वाढला होता. शहरातील हमालपुरा, शिवनगर, दत्तनगर, हिंगोलीगेट, बाफना चौक आदी भागात पाणी जमा झाले होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात होते. दुसरीकडे मागील काळातील पूरपरिस्थितीचा अनुभव लक्षात घेता पाणी निचरा करण्यासाठी पथकांची निर्मिती आवश्यक होती. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती निवारण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांच्याकडे श्रावस्तीनगर, हमालपुरा, शिवनगर, दत्तनगर, शाहूनगर या भागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांना खडकपुरा, शहीदपुरा, जुनामोंढा, किल्लापरिसर या भागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. शहर अभियंता माधव बाशेट्टी हे कालापूल, नावघाट, सिद्धनाथपुरी व बिलाल नगर तर कार्यकारी अभियंता कलीम परवेज यांच्याकडे साईबाबा मंदिर नाला परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे.
---
जिल्ह्यात ४० टक्के जलसाठा
जिल्ह्यात आजघडीला ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून विष्णूपुरी प्रकल्प जवळपास ८५ टक्के भरला आहे. दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पातील जलसाठा मात्र चिंताजनक आहे. या प्रकल्पात केवळ ११.२७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात ३४.३७ टक्के पाणीसाठा असून ४० दलघमी साठा आहे. उच्च पातळी बंधाºयाची परिस्थिती चांगली असून जवळपास ८५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यातील आमदुरा बंधारा १०० टक्के भरला आहे. लघु प्रकल्पातही ६७ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून ही टक्केवारी जवळपास ४० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सरासरी ४० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून २७८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. नांदेडसाठी उपयुक्त असलेल्या इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून आजघडीला ३३ टक्के हा प्रकल्प भरला आहे. इसापूरमध्ये ३१२.५२ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे.
---
अधिकारी, कर्मचाºयांना सतर्कतेचे आदेश
त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेवून जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी नांदेड महापालिकेने अधिकारी, कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी आपत्तीच्या काळात ०२४६२-२३४४६१ व ०२४६२-२३०७२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
---
विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला, देवापूर बंधाराही भरला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात ९४ घनमीटर प्रति सेंकदाने पाण्याचा येवा सुरू असून प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी रात्री ९ वाजता उघडण्यात आला आहे. या दरवाज्यातून ४७१ क्युमेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे.
विष्णूपुरीसह मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील देवापूर उच्च पातळी बंधाराही १०० टक्के भरला असून या बंधाºयाचे दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १५ आॅगस्ट पासून पावसाची संततधार सुरूच आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरूच होता. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात ६८.७९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याचवेळी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरूच आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने संबंधितांना सावधानतेचा इशारा दिला होता. रात्री ९ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. पाण्याचा येवा सुरूच असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हवामान खात्यानेही पुढील दोन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नांदेड शहरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूर उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाहीे.
विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून गोदावरी काठावरील काठांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Panganga River Kopali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.