अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील २९७ गावे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:00 AM2018-08-18T00:00:09+5:302018-08-18T00:04:27+5:30

जुलैमध्ये झालेल्या मोठ्या पावसानंतर तब्बल २५ दिवसांचा खंड दिलेल्या पावसाने श्रावण महिन्यात जोरदार पुनरागमन केले़ जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे़ सलग दोन दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टीही झाली़ याचा फटका तब्बल २९७ गावांना बसला असून ७१ हजार ३४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १८८ मि़मी़ पावसाची नोंद माहूर तालुक्यात झाली़

Due to excessive rain, 297 villages in Nanded district were interrupted | अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील २९७ गावे बाधित

अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील २९७ गावे बाधित

Next
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर : ७१ हजार हेक्टर क्षेत्राला फटका; २५१६ घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जुलैमध्ये झालेल्या मोठ्या पावसानंतर तब्बल २५ दिवसांचा खंड दिलेल्या पावसाने श्रावण महिन्यात जोरदार पुनरागमन केले़ जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे़ सलग दोन दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टीही झाली़ याचा फटका तब्बल २९७ गावांना बसला असून ७१ हजार ३४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १८८ मि़मी़ पावसाची नोंद माहूर तालुक्यात झाली़
जुलै महिन्याच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता़ त्यानंतर पावसाने सलग उघडीप दिल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ आठ दिवसांपूर्वी शहरासह काही भागात रिमझिम पाऊस झाला होता़ परंतु, त्याचा पिकांना कुठलाच फायदा झाला नाही़ त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता़ त्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली़ सकाळपर्यंत रिमझिम असलेल्या पावसाचा गुुरुवारी सकाळी चांगलाच जोर वाढला होता़ त्यानंतर दिवसभर संततधार सुरुच होती़ सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला़ त्यात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ गुुरुवारी रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला होता़
रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती़ शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने दुपारी एक वाजेनंतर विश्रांती घेतली़ गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठे ओसंडून वाहत होते़ आमदुरा येथील उच्चपातळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्याचे दरवाजे उघडण्यात आले होते़ त्याचबरोबर विष्णूपुरी प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडून गोदावरीत विसर्ग करण्यात आला़ त्यामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरुन वाहत होते़ त्यामुळे घाटपरिसरही पाण्याखाली गेला होता़ हीच परिस्थिती आसना नदीचीही होती़ आसनाचे पात्रही पाण्याने ओथंबून गेले होते़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता़
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती़ शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गत २४ तासांत माहूर तालुक्यात सर्वाधिक १८८ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ किनवट १३३ मि़मी़ , नांदेड ११३, अर्धापूर, १०२, हदगाव ९०, हिमायतनगर ८६, मुदखेड ७९ आणि भोकर तालुक्यात ६६ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ तर उमरी तालुक्यात ३७़३३, कंधार-६४़५०, लोहा-५२़१७, देगलूर-२२़१७, बिलोली-३४़८०, धर्माबाद-१८़६७, नायगांव-२८़२०, मुखेड-३२़१४ अशाप्रकारे सरासरी ७१़८७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ५७६़४६ मि़मी़पाऊस झाला आहे़ या आठ तालुक्यांसह जिल्ह्यातील ४१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे़ शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरारी ७१़८६ मि़मी़ पाऊस झाला़ नांदेडातील विष्णूपुरी प्रकल्प भरला असून गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत़
मुदखेड तालुक्यातील आमदुरा उच्च पातळी बंधाराही १०० टक्के भरल्याने बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत़ गोदावरी दुथडी भरुन वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ गुरुवारी जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, किनवट, माहूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली होती़ दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़

  • विष्णूपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

शहराची तहान भागविणा-या विष्णूपुरी प्रकल्पात येवा सुरुच असल्यामुळे प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते़ प्रकल्पातील पाण्याची पातळी ३५५ मीटर असून प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे़ त्यामुळे सकाळी सव्वाबारा वाजेच्या सुमारास एक आणि दुपारी सव्वादोन वाजता एक असे दोन दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़ या पाण्यामुळे गोदावरी पात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ प्रकल्पातील येवा सुरुच राहिल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़

  • शहरातील अनेक भागांत पाणी

शहरातील दत्तनगर, हमालपुरा, शिवनगर, गोकुळनगर, हिंगोलीगेट, बाफना चौक, अण्णाभाऊ साठे चौक, खडकपुरा, शहीदपुरा, श्रावस्तीनगर यासह अनेक भागांत पाण्याचे तळे साचले होते़ नाले ओव्हरफ्लो होवून पाणी रस्त्यावर आले होते़ हिंगोली गेट अंडरब्रीज पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

  • किनवट तालुक्यातील १८०० घरांत पाणी

किनवट : तालुक्यातील १४ ते १५ गावांमधील १ हजार ७०० ते १ हजार ८०० घरांमध्ये पाणी शिरून अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. शहरातील २०० ते २५० घरांत पाणी घुसून नुकसान झालेल्या विस्थापित कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. किनवट तालुक्यात सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाली. १७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत १३३ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. १७ रोजी सकाळी आ. प्रदीप नाईक यांनी शहरातील मोमीनपुरा, मामीनगुडा, रामनगर, कंधारवाडी, इस्लामपुरा, गंगानगर भागाला भेटी देवून बाधित कुटुंबाला मदतीची सूचना केली. दरम्यान, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी पालिका कर्मचा-यांची तातडीची बैठक घेवून सायंकाळपर्यंत पंचनामा करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. यावेळी बांधकाम सभापती व्यंकट नेम्माणीवार, नगरसेवक जहीरखान, अभय महाजन, इम्रानखान यांची उपस्थिती होती.

  • हिमायतनगरातील शेती पाण्याखाली

हिमायतनगर : तालुक्यात १५ आॅगस्टच्या रात्रीपासून सुरु झालेल्या धुवांधार पावसाने नदी - नाल्याना पूर आला असून, याचे पाणी थेट शेतीत घुसल्याने पिके पाण्याखाली गेली. नाल्यांना पूर आल्यामुळे दिवसभर रस्ते बंद होते.
यंदा खरीप हंगामात पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु, पंधरा दिवसांपासून पावसाने खंड दिल्यानंतर नागपंचमीच्या सणापासून दिवसभर पाऊस सुरू झाला. हा पाऊस हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, सरसम मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, कामारी, पोटा, दरेसरसम, आंदेगाव पळसपूर, मंगरूळ, कारला, बोरगडी, सवना, सिबदरा या परिसरात गुरूवारी मुसळधार पाऊस झाला. परिसरातील शेतकºयांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग अन्य पिके पाण्याखाली आली तर कापूस पीक आडवे पडले. शेतातील बांध फुटून काही भागातील शेतीजमिनी खरडून गेली. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. १७ रोजी पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. प्रशासनाने बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे़

Web Title: Due to excessive rain, 297 villages in Nanded district were interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.