समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:29 AM2018-04-25T00:29:09+5:302018-04-25T00:29:41+5:30

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली.

Whole Maharashtra should be 'watery': Aamir Khan | समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

Next
ठळक मुद्देपत्नी किरणसह मांडला ‘वॉटर कप-२०१८’ चा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने पत्नी किरणसह वॉटर कप-२०१८ चा लेखाजोखा मांडला. आमिर पुढे म्हणाला, यंदा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. पाणलोटसाठी यंदा २० हजार गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून ते आपआपल्या गावात जाऊन इतर गावकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करणार आहेत, याकडेही आमिरने लक्ष वेधले.
१ मे ला महाश्रमदान
पाण्याच्या बचतीचा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या महाश्रमदानात सहभागासाठी आतापर्यंत सव्वा लाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. नावनोंदणीची ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आमिरने यावेळी दिली.
‘आझाद’लाही कळते पाण्याचे मोल
पाणी बचतीची ही मोहीम आम्ही स्वत:च्या घरापासून सुरू केली. मी आणि किरण दोघेही पाण्याचा काटकसरीने उपयोग करतो. इतकेच नाही तर आमचा मुलगा आझाद यालाही आम्ही हीच शिकवण दिली आहे. तो आता फक्त सहा वर्षांचा आहे. पण, त्यालाही पाण्याचे मोल कळते. तो अजिबात पाणी वाया घालवत नाही, हे आमिरने आवर्जून सांगितले.
गावकऱ्यांची एकता बघून बळ मिळते
या पत्रकार परिषदेतनंतर शहरातील प्रमुख दैैनिकांच्या संपादकांशी आमिर व किरण खानने अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत आमिर म्हणाला, गावातील लोक खूप प्रामाणिक व धैर्यवान आहेत. प्रतिकूल स्थितीतही त्यांनी आशा सोडली नाही. पाणलोट विकासाच्या कामावर त्यांची एकता मी बघितली आहे व त्यातून मला मोठे बळही मिळत असते. याच क्रमात लोकमतने घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा आहे. लोकमतने राबविलेल्या जलमित्र अभियानाचे चांगले परिणाम राज्यात दिसल्याचे आमिरने कौतुकाने सांगितले. या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांची आर्थिक स्थिती बदलली असून, आता शेतकरी वर्षातून दोनदा उत्पादन घेत आहेत, याकडे किरणने संपादकांचे लक्ष वेधले.

Web Title: Whole Maharashtra should be 'watery': Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.