दहावीचा शेवटचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:20 PM2018-03-22T20:20:32+5:302018-03-22T20:20:46+5:30

गावात दहावीपर्यंतचे वर्ग नाही. त्यामुळे गावाबाहेर शिकण्यासाठी दररोज साडेतीन किमीचे अंतर सायकलने ये-जा करायची. पूर्ण वर्ष संपले, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. शेवटचा पेपरही झाला. मात्र हा पेपर झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये मौजमस्ती करण्याची ‘तिची’ इच्छा अपुरीच राहिली. पेपर आटोपून घरी जात असताना भरधाव ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात ती विद्यार्थिनी जागीच गतप्राण झाली. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र. ६ समोर घडली.

The student returning after the last paper of Class X has been crushed by the truck | दहावीचा शेवटचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले

दहावीचा शेवटचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टाकळघाटच्या इंडोरामा गेटसमोर भीषण अपघात, नागरिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावात दहावीपर्यंतचे वर्ग नाही. त्यामुळे गावाबाहेर शिकण्यासाठी दररोज साडेतीन किमीचे अंतर सायकलने ये-जा करायची. पूर्ण वर्ष संपले, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. शेवटचा पेपरही झाला. मात्र हा पेपर झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये मौजमस्ती करण्याची ‘तिची’ इच्छा अपुरीच राहिली. पेपर आटोपून घरी जात असताना भरधाव ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात ती विद्यार्थिनी जागीच गतप्राण झाली. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र. ६ समोर घडली.
वैष्णवी राजेंद्र ढवळे (१६, रा. टेंभरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने साडेतीन किमी अंतरावरील टाकळघाट गाठले. गाव ते शाळा हे साडेतीन किमीचा प्रवास वैष्णवी ही सायकलने ये-जा करायची. पावसाळा, हिवाळ्यातील अवरोध लक्षात घेतले तरी ती शाळेपासून दूर झाली नाही. यावर्षी वैष्णवी ही दहावीला होती. टाकळघाट येथील श्रीमती निस्ताने विद्यालयात ती शिकत होती. बोर्डाची परीक्षा असल्याने तिने चांगली तयारी केली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन भविष्यात वाटचाल करावी, असे तिचे स्वप्न होते. टाकळघाट येथीलच अमर हायस्कूल हे तिचे परीक्षा केंद्र होते. परीक्षाही संपत आली असताना उन्हाळी सुट्यांचा प्लान ‘तिने’ केला होता. गुरुवारी दहावीचा ‘माहिती तंत्रज्ञान संप्रेषण’ हा शेवटचा पेपर होता. सकाळी ११ वाजता असल्याने ती सकाळीच सायकलने घरून निघाली. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचली, पेपर सोडविला. त्यानंतर मैत्रिणींशी बोलून ती तिच्या टेंभरी गावाकडे सायकलने निघाली. दरम्यान इंडोरामा कंपनीजवळचे वळण पार करून जाताच इंडोरामाकडून येणाºया एमएच-३४/एबी-५७४९ क्रमांकाच्या ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक फरार झाला.
अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकास काही अंतरावर नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले. उमेश जंगली महतो (६०, रा. चंद्रपूर) असे अटकेतील ट्रक चालकाचे नाव आहे. पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
गतिरोधकाची मागणी
विद्यार्थिनीला ट्रकने धडक दिली, त्या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले. त्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले तर कितीतरी नागरिकांना कायमचे अंपगत्व आले. याशिवाय किरकोळ अपघात हे सुरूच असतात. त्यामुळे त्या परिसरात गतिरोधक लावण्याची मागणी नागरिकांनी कित्येकदा केली. मात्र त्याकडे लक्षच देण्यात आले नाही. त्यातच गुरुवारी विद्यार्थिनीचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा गतिरोधकाची मागणी पुढे आली. गतिरोधक लावण्यात आला नाही तर आंदोलन करू, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.

Web Title: The student returning after the last paper of Class X has been crushed by the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.