वीज बिलाच्या धसक्याने इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:11 PM2017-07-24T15:11:26+5:302017-07-24T15:11:26+5:30
दोन विजेच्या दिव्याचे बिल २० हजार रुपये आल्याचा धसका घेऊन एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : घरात असलेल्या दोन विजेच्या दिव्याचे बिल २० हजार रुपये आल्याचा धसका घेऊन एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली. महादेव पुंजाजी पाटील (४८,रा.रुक्मिणीनगर, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे.
महादेव पाटील हे शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यांचे स्थानिक रुक्मिणीनगरात दोन खोल्यांचे घर आहे. महादेव यांना मागील वर्षीच्या आॅगस्ट महिन्यापासून अव्वाच्या सव्वा बिल येते होते. याची तक्रार त्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, त्यांची समस्या जाणून न घेता त्यांना आलेले देयक भरावेच लागेल असे सांगण्यात आले. बिलाची थकबाकी वाढत चालल्याने त्याच्यावर दबाव वाढत गेला. डिसेंबर २०१६ या महिन्याचे वीज बिल २० हजार ३८० रुपये आले आहे. गत महिन्यात आपले वीज बिलाच्या देयकाची रक्कम कमी कशी होईल, यासाठी महावितरणसह अनेकांशी संपर्क साधला असल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
देयकाची संपूर्ण रक्कम भरावीच लागेल, असे महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे मागील पाच दिवसांपासून ते तणावात होते. यातूनच त्यांनी रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक आठवडी बाजारातील आरामशीन जवळ कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.