देशातील वन समृद्ध करण्याची गरज : सिद्धांत दास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:13 AM2019-03-12T00:13:17+5:302019-03-12T00:15:54+5:30
वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.
सोमवारी सिद्धांत दास यांनी नागपुरातील वन मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सूचना व तांत्रिक) प्रवीण श्रीवास्तव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (संवर्धन), अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. रेड्डी, अशोक गिरीपुंजे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दास यांनी सांगितले की, वनांची उत्पादनक्षमता केवळ लाकूड नसून यात जंगलातून मिळणारी वनौषधी आणि इतर सामुग्रीसुद्धा आहे. या सर्व उत्पादनांमुळे वन समृद्ध होऊ शकते. त्यांनी वन मुख्यालयातील ‘कमांड कंट्रोल रुम’ला भेट देऊन स्तुती केली. यासोबतच जंगलाची सातत्याने देखभाल करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) अग्रवाल यांनी वन विभागाच्या सर्व नव्या उपक्रमांची माहिती दिली. राज्यात वनासोबत बांबूचे क्षेत्र वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीवास्तव यांनी विभागाच्या अॅपची माहिती देऊन सादरीकरण केले. शैलेश टेंभुर्णीकर यांनी वन अधिकार कायद्यावर सादरीकरण केले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.