दुष्काळग्रस्त गावांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवा : मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांसोबत थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 09:58 PM2019-05-14T21:58:00+5:302019-05-14T22:01:36+5:30

जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर व नरखेड या तालुक्यातील ४५२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, गुरांना चारा तसेच गावातच रोजगाराची उपलब्धता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे सरपंचांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती घेतली. दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

Keep water supply to drought-hit villages: CM directs dialogue with sarpanch | दुष्काळग्रस्त गावांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवा : मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांसोबत थेट संवाद

दुष्काळग्रस्त गावांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवा : मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांसोबत थेट संवाद

Next
ठळक मुद्देपिण्याचे पाणी व गुरांना चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर व नरखेड या तालुक्यातील ४५२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, गुरांना चारा तसेच गावातच रोजगाराची उपलब्धता यासंदर्भात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे सरपंचांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती घेतली. दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. 


पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत देयकाअभावी पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीला ८९ लाख रुपये देण्यात आले आहेत व सर्व नळ पाणीपुरवठ्याच्या योजनांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत एकही चारा छावणी सुरू नाही. जिल्ह्यातील ७९ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ९८ लक्ष रुपयांचे दुष्काळ अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात ४६ हजार ६९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी ९ कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम अदा करण्यात येणार असून, त्यापैकी ७ कोटी २२ लक्ष रुपये इतकी रक्कम ५ हजार ३५६ पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० हजार ५५१ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकऱ्यांना दोन हजारप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ४ कोटी ८० लक्ष इतके अर्थसाहाय्य देण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. दुष्काळग्रस्त काटोल तालुक्यातील सरपंचांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली; तसेच जनावरांनासुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, याबाबत विनंती केली. मंगला काळबांडे, नितीन गजभिये, विनोद ठाकरे, धनंजय धोटे, प्रवीण अडकिने, संजय डफर, सविता गोतमारे, पूजा रिधोरकर, रेखचंद सावरकर आदी सरपंचांनी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या तलावातील गाळ काढण्यासोबतच पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना केली असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दुष्काळी तालुक्यातील सरपंचांसोबत ऑडिओ ब्रीज संवादात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी, रवींद्र खजांजी, उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे तसेच जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, कृषी, फलोत्पादन, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांसोबत संवाद साधताना ग्रामीण पाणीपुरवठा तसेच रोजगारासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
२१ सरपंचांनी पाणीटंचाईची सांगितली सत्यस्थिती
नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील सरपंचांनी ‘गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत तलावांचे खोलीकरण त्यासोबतच नदी खोलीकरण करून बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर विद्युतपंप बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली. गौतम दत्तूजी इंगळे यांनी गावात पाणीपुरवठा करणारी विहीर असून, तिला पाणी नसल्यामुळे पर्यायी विहीर अथवा विंधन विहीर करावी, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती विजय केशवराव गुंजाळ यांनी केली. तलावाचे खोलीकरण करण्यासाठी तसेच नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी निधीच्या माध्यमातून कामे प्राधान्याने व्हावीत, आदी सूचना तसेच पाणीटंचाईसंदर्भात ग्रामस्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांना ऑडिओ ब्रीजद्वारे माहिती दिली. तसेच कळमेश्वर तालुक्यातील उबाळी पाणीपुरवठा व पाणीटंचाई, लिंगा तलाव जलाशयातील पाणीपुरवठा व गाळ काढणे, आष्टीकला पाणीपुरवठा व विहीर खोलीकरण, सावळी बु.-पाणीटंचाई व पाण्याची पातळी कमी यावर उपाययोजना करणे, परसोडी वकील येथील पाणीपुरवठा व आडवी बोअरवेलबाबत सरपंचांशी मुख्यमंत्र्यांची यावेळी चर्चा झाली.
सरपंच व्हॉटस्अ‍ॅपवरसुद्धा सूचना करू शकतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांसोबत थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितींतर्गत राबविण्यात येत असलेल्या विहीर योजनांसंदर्भात संवाद साधताना सरपंचांना दुष्काळ निवारणासाठी तसेच पिण्याच्या पाणीटंचाईसंदर्भात सूचना करण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरसुद्धा सरपंच सूचना करू शकतात. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सरपंचांना दिली. मुख्यमंत्री आपल्यासोबत थेट संवाद साधून गावातील दुष्काळासंदर्भात तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात माहिती घेत असल्याबद्दल सरपंचांनी विशेष आनंद व्यक्त केला.

Web Title: Keep water supply to drought-hit villages: CM directs dialogue with sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.