नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:53 PM2018-07-14T21:53:12+5:302018-07-14T22:04:20+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये (कळमना बाजार) दीड वर्षांपासून असलेल्या प्रशासकाच्या कारभारामुळे सातही बाजाराची दुर्दशा झाल्याचा आरोप संबंधित बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला. शनिवारी प्रशासकासोबत झालेल्या बैठकीत सर्व बाबींवर तोडगा काढण्यात त्यांना अपयश आले.

The Kalamna Market in Nagpur will remain closed from 18 | नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार

नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार

Next
ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य, चोरांचा हैदोस, रस्त्यावर खड्डेबैठकीत प्रशासकाला तोडगा काढण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये (कळमना बाजार) दीड वर्षांपासून असलेल्या प्रशासकाच्या कारभारामुळे सातही बाजाराची दुर्दशा झाल्याचा आरोप संबंधित बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला. शनिवारी प्रशासकासोबत झालेल्या बैठकीत सर्व बाबींवर तोडगा काढण्यात त्यांना अपयश आले.

बाजाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कळमना बाजारात दुर्दशा असल्यामुळे फळ बाजार १८ आणि १९ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. फळ बाजाराचे पदाधिकारी म्हणाले, फळ बाजारात घाणीचे साम्राज्य असून चोरांनी हैदोस मांडला आहे. बाजार समितीचे गार्ड त्यांच्यावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरले आहेत. दुकानाचे कुलूप तोडून चोरी करीत आहे. दुकानांच्या खिडक्यांमधून चोर लहान मुलांना आत पाठवून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. चालत्या ट्रकमधून फळांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. आॅक्शन हॉलमध्ये उरलेल्या मालाची चोरी ही नित्याचीच बाब आहे. गार्डला तलवारीचा धाक दाखविला जात आहे. रात्री चोरांची संख्या जास्त असल्यामुळे जीवाच्या भीतीने गार्डने चुप्पी साधली आहे. त्या कारणामुळे अनेक रात्रकालीन गार्डने नोकरी सोडली आहे. चोरीच्या तक्रारी कळमना पोलीस ठाण्यात नोंदविली असता पोलीस एफआयआरची कॉपी देण्यास नकार देत आहेत. ही बाब प्रशासकाला सांगितली असता, त्यांनी या बाबतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बाजाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोरीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका
चोरीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांना मालाची १० ते २० टक्के रक्कम कमी मिळत आहे. चोरीच्या भीतीने शेतकऱ्यांना मालाजवळ रात्रभर बसून राहावे लागत आहे. त्यांनी माल विकावा की राखण करावी, असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
मुख्य द्वारासमोरील रस्त्याचे बांधकाम बंद
कळमना बाजार समितीच्या मुख्य द्वारासमोरील रस्त्याचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू आहे. तसे तर हे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. पण राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर वचक नसल्यामुळे बांधकाम केव्हा पूर्ण होईल, हे सांगणे कठीण आहे.

बाजारात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
बाजार समितीच्या आवारात संपूर्ण रस्ता पावसामुळे उखडला आहे. मालाचे ट्रक या रस्त्यांवरून जातात तेव्हा केव्हा उलटेल, याचा नेम नसतो. गेल्या दीड वर्षांत रस्त्यांची डागडुजी झालेली नाही, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासक नायक यांच्यापूर्वी दोन प्रशासकांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
घाणीमुळे आजाराला आमंत्रण
बाजारात दररोज कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरात येणारे शेतकरी आणि व्यापाºयांना विविध रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. साफसफाईचे कंत्राटदार आपली जबाबदारी पार पाडत नसल्यामुळे रस्त्यावरील घाण ही नेहमीचीच बाब झाली आहे.
कोट्यवधींच्या सेसची वसुली
कळमना बाजारात शेकडा १.०५ रुपये दराने सेस वसुली केला जातो. सेसच्या स्वरुपात वसूल केलेले जवळपास १५० कोटी रुपये समितीकडे जमा आहेत. पण दैनंदिन स्वच्छता आणि रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यास समिती अपयशी ठरली आहे. प्रशासकाच्या निर्णयाविना कोणतीही कामे होत नसल्यामुळे कळमना बाजार बेवारस झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला.

Web Title: The Kalamna Market in Nagpur will remain closed from 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.