नागपुरात निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:59 AM2018-03-19T10:59:35+5:302018-03-19T10:59:42+5:30

मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला.

Gang robbery by kidnapping innocent woman in Nagpur | नागपुरात निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपुरात निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Next
ठळक मुद्देमित्रांची भूमिका संशयास्पदएमआयडीसीत गुन्हा, तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. असहाय पीडित तरुणी आधी भरोसा सेल आणि नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी लगेच धावपळ करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी रात्री ९ वाजता सुरू झालेला हा संतापजनक घटनाक्रम रविवारी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चर्चेला आला.
अखिलेश ऊर्फ अख्खि प्रकाश वांद्रे (वय २२, रा. जयभीमनगर, अजनी), रितेश भीमराव गवई (वय १९, रा. त्रिशरण चौक, अजनी) आणि शुभम ऊर्फ निंबू गजानन निंबाळकर (वय १९, रा. एसआरपीएफ कॅम्पजवळ, हिंगणा, एमआयडीसी) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यातील आरोपी अखिलेश हा तडीपार गुंड असून, तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, अजनीत त्याची प्रचंड दहशत आहे. पीडित तरुणीला वडील नाही. तिची आई आजारी असून, अजनीतील एका झोपडीत ती राहते. ती कॅटरर्सकडे काम करते. शनिवारी रात्री ७ च्या सुमारास पीडित तरुणी, तिचा आॅटोचालक मित्र राकेशसोबत सीताबर्डीत आली. त्यांच्यासोबत प्रज्वल नामक अन्य एक मुलगा होता. ९ वाजेपर्यंत आॅटोत फिरल्यानंतर झाशी राणी चौकातून ते अजनीला परत जाण्यासाठी निघाले. महाबँक चौकाजवळ त्यांच्या आॅटोसमोर आरोपी अखिलेशने सिनेस्टाईल त्याची मोटरसायकल आडवी केली. अखिलेशसोबत त्याचा साथीदार आरोपी रितेश गवईसुद्धा होता. मोटरसायकलवरून उतरून रितेश आॅटोत येऊन बसला. त्यानंतर भलामोठा चाकू दाखवून अखिलेशने आॅटोचालक राकेशला गप्प राहण्यास भाग पाडले. आरोपी अखिलेश याने आॅटोतील तरुणीला ‘माझी गर्लफ्रेन्ड कुठे आहे, अशी विचारणा केली. तिने माहीत नाही म्हणताच तिला आरोपीने अश्लील शिव्या दिल्या. माहिती सांग नाही तर तुझ्यावर येथेच बलात्कार करून जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. चाकू पाहून घाबरलेल्या तरुणीने अखिलेशला तुझी मैत्रीण यवतमाळला गेली, असे सांगितले. तू आधी का खोटी बोलली, असे विचारत अखिलेशने तिला जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर ओढले’. त्यानंतर आरोपी अखिलेश तिला घेऊन जयताळा परिसरातील ससाने लेआऊटमधील एका निर्माणाधीन इमारतीत गेला. मागे राकेश (तरुणीचा मित्र, आॅटोचालक), प्रज्वल आणि या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपी रितेश ऊर्फ काल्या गवई आॅटोत बसून होता. आॅटो प्रतापनगरात थांबवण्यात आला. या इमारतीत आरोपींनी आधीच निंबू नामक साथीदाराला बोलवून ठेवले होते. तेथे तरुणीला निंबूच्या हवाली केल्यानंतर आरोपी अखिलेश पुन्हा प्रतापनगरात आला. तेथे त्याने आॅटोतून रितेश आणि प्रज्वलला सोबत घेतले. आॅटोचालक राकेशला धमकी देऊन पळवून लावले. परत इमारतीत आल्यानंतर आरोपी अखिलेश, निंबू आणि रितेशने दारू पिली. प्रज्वलला त्यांनी धाक दाखवून दाराजवळ बसविले. त्यानंतर या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

आरोपी मिळाला पोलीस ठाण्यात
सामूहिक बलात्काराची तक्रार ऐकताच पोलीस हादरले. त्यांनी तरुणीला आरोपींचे नाव, पत्ता विचारला. तिने आपण ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राकेशचा (आॅटोचालक मित्र) उल्लेख केला. त्यावरून ठाणेदार सुनील महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच अजनी गाठले. राकेशला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आरोपी अखिलेशचे नाव, पत्ता सांगितला. पोलीस त्याच्या घरी पोहोचले, मात्र तो घरी नव्हता. त्यामुळे एमआयडीसी पोलीस अजनी ठाण्यात पोहोचले. तेथे हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काही वेळेपूर्वीच आरोपी अखिलेशला प्रतिबंधक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतल्याचे सांगितले.
तो आयता ठाण्यातच भेटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुसऱ्या दोन आरोपींची नावे विचारली. त्यानंतर आरोपी रितेश ऊर्फ काल्या आणि निंबू या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री ९ वाजेपर्यंत आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मित्रांची भूमिका संशयास्पद
विशेष म्हणजे, पीडित तरुणीचे अपहरण तिच्या मित्रांच्या समोरच आरोपींनी केले. आॅटोचालक मित्राला बलात्कार करण्यापूर्वी आरोपीने प्रतापनगरातून पळवून लावले. यावेळी तो पोलीस ठाण्यात जाऊन किंवा १०० क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती देऊ शकला असता, मात्र त्याने असे काहीही केले नाही. दुसरे म्हणजे, प्रज्वल नामक मित्रासमोर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तो आरडाओरड करू शकला असता. रात्री जेव्हा पळून गेला तेव्हासुद्धा तो रस्त्यावरच्या पोलिसांना सांगू शकला असता. मात्र, दोनपैकी कोणत्याही मित्राने तसे केले नाही. त्यामुळे या दोघांची भूमिकाही संशयास्पद ठरली आहे. दरम्यान, उपराजधानीत २४ तासात दोन सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जेवण घेऊन गेले
रात्री ११ वाजता एक आरोपी पुन्हा शंकरनगर चौकात आला. येथे त्याने दारू आणि जेवण विकत घेतले आणि घटनास्थळी पोहोचला. तेथे पुन्हा आरोपी दारू पिऊन जेवले आणि नंतर रात्रभर त्यांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, संधी मिळताच मध्यरात्री १ च्या सुमारास तेथून प्रज्वलने धूम ठोकली आणि तो सरळ घरी पोहोचला. पहाटे ४ च्या सुमारास आरोपी तेथून पळून गेले. रात्रभर अत्याचार झाल्याने पीडित तरुणी तशीच पडून राहिली. सकाळी जाग आल्यानंतर ती बाहेर पडून प्रतापनगर परिसरात भटकंती करू लागली. एका महिलेने तिची अवस्था बघून तिला विचारणा केली असता, तिने आपली आपबिती सांगितली. महिलेने तिला भरोसा सेलमध्ये पोहोचविले. तर, भरोसा सेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला एमआयडीसी ठाण्यात नेले.

Web Title: Gang robbery by kidnapping innocent woman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.