‘अभिजात मराठी’ हे विजयानंतरचे पहिले लक्ष्य; लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:45 AM2017-12-11T09:45:17+5:302017-12-11T09:45:54+5:30

माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली.

'Classical Marathi' is the first goal of victory; Laxmikant Deshmukh | ‘अभिजात मराठी’ हे विजयानंतरचे पहिले लक्ष्य; लक्ष्मीकांत देशमुख

‘अभिजात मराठी’ हे विजयानंतरचे पहिले लक्ष्य; लक्ष्मीकांत देशमुख

Next
ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला विशेष मुलाखत

शफी पठाण।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल. त्यातून बरेच काही चांगले उपक्रम राबवता येतील. त्यामुळे माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली.
संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली. देशमुख म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेत अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली.
या समितीने मराठी भाषेचे संशोधन व सूक्ष्म अभ्यास करून मराठी कशी अभिजात आहे, याचे पुरावे संबंधित विभागाला सादर केले आहेत. मी लवकरच प्रा. रंगनाथ पठारे यांना भेटून चर्चा करणार असून त्यानंतर दिल्लीत पाठपुरावा सुरू करणार आहे. याविषयी प्रसंगी आंदोलनाचीही माझी तयारी आहे. मराठी ही ज्ञानभाषा व व्यवहार भाषा झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासाठीही मी संमेलनाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मराठी विद्यापीठ व संतपीठासाठी विशेष प्रयत्न
मराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. हे विद्यापीठ मराठीचे आद्यकवी मुंकुदराज स्वामींच्या अंबेजोगाई या गावी व्हावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. यासोबतच पैठणला संतपीठ व्हावे, यासाठी शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तो विषयही प्रलंबित आहे. याकडे मी संमेलनाध्यक्षाच्या पदावरून शासनाचे लक्ष वेधणार आहे.


जय-पराजय नव्हे कार्य महत्त्वाचे
साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. जो निकाल आला तो मला मान्य आहे. शेवटी जय-पराजय नव्हे तर वाङ्मयीन कार्य महत्त्वाचे आहे. मला मिळालेली मते ही माझ्या चाहत्यांनी माझ्या लेखणीला दिलेली पावती आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो. विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो. विदर्भ साहित्य संघाचे विशेष ऋण मानतो. या निवडणुकीच्या निमित्ताने एक सांगायचे आहे. मागच्या काही वर्षात मतांचा निश्चित कोटा पूर्ण करता निवडून येण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा निवडीचा वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
-डॉ. रवींद्र शोभणे


अमूर्त जगाशी परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद
मी ही निवडणूक केवळ लढण्यासाठी नव्हे तर सारस्वतांच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या अनैतिक आणि स्खलनशील परंपरेचा अंत व्हावा यासाठी लढलो. यासाठी जवळपास एक वर्ष झटलो. निवडणुकीची लोकशाहीप्रणित साधनशुचिता निष्ठेने पाळूनच मी बृहन्महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील गावोगावी साहित्यिक मित्रांशी भेटलो. त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीने साहित्य संस्थांच्या अमूर्त जगाशी परिचय करून दिल्याबद्दल, त्याबद्दल मला सहकार्य करणाºया सर्वांचेच मनस्वी धन्यवाद.
-डॉ. किशोर सानप


संमेलनासाठी एक कोटीची मागणी योग्यच
जागतिक तामीळ महोत्सवासाठी तामिळनाडू सरकारने ३०० कोटींचा खर्र्च केला. कानडी साहित्य संमेलनासाठी कर्नाटक सरकारने आठ कोटी रुपये दिल्याचे उदाहरणही ताजेच आहे. आपले राज्य सरकार मात्र खूप कद्रुपणा करीत आहे. आजच्या महागाईच्या काळात २५ लाखांच्या अनुदानात काहीच होत नाही. म्हणून साहित्य महामंडळ संमेलनासाठी जी एक कोटीची मागणी करीत आहे तिचे मी समर्थन करतो.


अध्यक्षीय भाषणासाठी ऐकणार ‘मन की बात’
माझ्या अध्यक्षीय भाषणात कुठल्या-कुठल्या विषयाला स्पर्श केला जावा, मतदारांना व मराठी जनांना याबाबत काय वाटते, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मी लवकरच काहींना पत्र पाठवून त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेणार आहे. त्या अपेक्षा, सूचनांचा अध्यक्षीय भाषणात समावेशही करणार आहे. बडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो. सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार. मी कार्यर्ता होतो, यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.

 

Web Title: 'Classical Marathi' is the first goal of victory; Laxmikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी