वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भोजनावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 02:02 AM2017-07-25T02:02:28+5:302017-07-25T02:02:28+5:30
अनेकदा तक्रारी करूनही वसतिगृहात चांगले जेवण मिळत नसल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी जेवणावरच बहिष्कार टाकला.
मेसचालक बदलविण्याची मागणी : अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सुटला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकदा तक्रारी करूनही वसतिगृहात चांगले जेवण मिळत नसल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी जेवणावरच बहिष्कार टाकला. ही घटना काटोल नाका चौकातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात घडली. विद्यार्थ्यांनी मेस चालकास जेवणच बनवू दिले नाही. त्यामुळे विद्यार्थी सकाळचा नाश्ता व जेवणापासून वंचित राहिले. काही विद्यार्थ्यांनी बाहेरून नाश्ता आणून आपली भूक भागविली. दरम्यान समाजकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेवटी मेसचालक बदलवून देण्याच्या आश्वासनानंतर हा वाद मिटला. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी बाहेरून जेवणाची व्यवस्था केली.
काटोल नाका चौकात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. १५० मुलांची या वसतिगृहाची क्षमता आहे. येथील विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत नेहमीच तक्रारी राहिल्या आहेत. जेवण व्यवस्थित राहत नाही. चविष्ट राहत नाही. नियमानुसार पदार्थ उपलब्ध करून दिले जात नाही. आदी अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वीच येथील मेसचालकाला जावे लागले होते. परंतु तरीही जेवणात मात्र काहीही फरक पडला नाही. रविवारी यावरूनच विद्यार्थ्यांचा वाद झाला. त्यांनी मेसचालकास उद्यापासून तू जेवण करायचे नाही, असे म्हटले.
त्यामुळे मेसचालक आज सकाळी आलाच नाही. याबाबत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर यांनी तातडीने वसतिगृहाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितले. मेसचालक बदलून मागितला. मेस कॉन्ट्रॅक्टरलाही बोलावण्यात आले. त्यांच्याशीही चर्चा झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही चर्चा सुरूच होती. परंतु विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर वाकुलकर यांनी नवीन मेसचालक देण्याचे आश्वासत दिले.
परंतु इतक्या लवकर नवीन मेसचालक कसा मिळेल? असे सांगत काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था बाहेरून करून देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. यानंतर हा वाद मिटला.
समोशावर काढला दिवस
दरम्यान सकाळी मुलांनी नाश्ता व जेवण केले नाही. काही मुलांच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे त्यांनी बाहेरून समोसा बोलावून आपली भूक भागवित दिवस काढला.