दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास दोन टप्प्यात : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:45 PM2019-02-18T20:45:27+5:302019-02-18T20:46:30+5:30

आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, त्यावर २८१ कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे, अशा माहितीचे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए ) व नागपूर सुधार प्रन्यास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.

The all-round development of Dikshabhoomi in two stages: Information in the High Court | दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास दोन टप्प्यात : हायकोर्टात माहिती

दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास दोन टप्प्यात : हायकोर्टात माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे एनएमआरडीए व नासुप्र यांचे प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, त्यावर २८१ कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे, अशा माहितीचे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए ) व नागपूर सुधार प्रन्यास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.
यासंदर्भात अ‍ॅड. शैलेष नारनवरे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने एनएमआरडीए व नासुप्र यांना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता नोएडा येथील डिझाईन असोसिएट्स इनकॉर्पोरेशनची प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये स्तुप विस्तारीकरण, सीमाभिंत, गेट कॉम्प्लेक्स व वॉच टॉवर, पार्किंगसाठी बेसमेंट, शौचालये, पिण्याचे पाणी, कार्यक्रम व्यासपीठ, जलसाठा टाकी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १००.४७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १८१ कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आह,े असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणावर येत्या बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय हे प्रतिज्ञापत्र विचारात घेईल. एनएमआरडीए व नासुप्र यांच्यातर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.
--------
असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे
दीक्षाभूमी येथे दरवर्षी दसरा, १४ आॅक्टोबर (धम्मचक्र प्रवर्तन दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महापरिनिर्वाण दिवस (६ डिसेंबर) व अन्य विविध कार्यक्रमांसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येत भाविक येतात. परंतु, या ठिकाणी निवास, भोजन, स्वच्छतागृह, परिवहन इत्यादी आवश्यक सुविधा नसल्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा सन्मानाने जगण्याच्या अधिकार हिरावला जातो. तसेच, दीक्षाभूमीलगतच्या लक्ष्मीनगर, बजाजनगर, रामदासपेठ, वसंतनगर इत्यादी वस्त्यांतील नागरिकांना अव्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर, चेंगराचेंगरी व अन्य अकस्मात दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेतली जात नाही. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असून त्याकडे अद्याप कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे याचिकाकर्ते अ‍ॅड. शैलेष नारनवरे यांचे म्हणणे आहे.

Web Title: The all-round development of Dikshabhoomi in two stages: Information in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.