पुन्हा कधीच जाणार नाही म्हणाला होता अक्षय; क्रेझी कॅसल दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:33 AM2018-05-21T10:33:21+5:302018-05-21T10:33:29+5:30

नागपूर : त्याला जायचे वेध लागले होते. म्हणून की काय अक्षय बिंडने अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नातेवाईक आणि मित्रांकडे अनेक तासांपूर्वीपासूनच जाण्याचा हट्ट धरला होता.

Akshay said he will never go again; Craye Castle Accident | पुन्हा कधीच जाणार नाही म्हणाला होता अक्षय; क्रेझी कॅसल दुर्घटना

पुन्हा कधीच जाणार नाही म्हणाला होता अक्षय; क्रेझी कॅसल दुर्घटना

Next
ठळक मुद्देगडबडघाई ठरली शेवटच्या प्रवासाची बस ताई... शेवटचाच जातो...!

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्याला जायचे वेध लागले होते. म्हणून की काय अक्षय बिंडने अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नातेवाईक आणि मित्रांकडे अनेक तासांपूर्वीपासूनच जाण्याचा हट्ट धरला होता. त्याच्या ताईला त्याने एक दिवसापूर्वीच जाणार म्हणून सांगितले होते. तर, मित्रांना रविवारी सकाळी ६ वाजतापासूनच तो लवकर निघण्यासाठी फोन करत होता. त्याची ही गडबडघाई शेवटच्या प्रवासाची आहे, अशी कल्पनादेखील कुणी केली नव्हती. थरथरत्या ओठाने अक्षयची बहीण सोनू आणि पूजाने त्याच्याबद्दलची माहिती सांगितली, अन् त्याच्या जाण्याच्या हट्टामागचे कारण आपल्याला का कळले नाही असे म्हणत स्वत:लाच दोष दिला.
बिंड परिवार चितारओळीत राहतो. वडील अनिल बिंड मूर्तिकार आहेत. आई अनिता गृहिणी असून, मोठा भाऊ सचिन तसेच सोनू आणि पूजा या दोन बहिणी अक्षयला आहेत. तो बी. कॉम. द्वितीय वर्षांला शिकत होता. सर्वात लहान असल्याने तो बहिणीचा खूपच लाडका होता. प्रत्येक गोष्ट तो बहिणीसोबत शेअर करायचा. अक्षय आणि त्याच्या आठ ते दहा समवयस्क मित्रांनी संडे पिकनिकचा बेत दोन, तीन दिवसांपूर्वीच बनविला होता. कुठे जायचे यावर बराच विचारविमर्श केल्यानंतर क्रेझी कॅसलला जाऊ, असे सर्वांनी पक्के केले. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे नागपूरबाहेर गेल्यास हाल होतील. शहरातच रखरखत्या उन्हात कृत्रिम सागरी लाटा अंगावर घेण्यासाठी त्यांनी क्रेझी कॅसलची निवड केली. शनिवारी त्याने त्याच्या ताई सोनू आणि पूजाला पिकनिकचा बेत सांगितला. प्रारंभी बहिणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने ‘पुन्हा कधीच जाणार नाही, बस ताई ... शेवटचाच जातो...!, असे म्हणत बहिणींकडून परवानगी मिळवली. त्याचे शेवटचे जाणे म्हणजे कधीच न परतण्यासाठी होते, हे सोनू आणि पूजाला आता लक्षात आले. त्यामुळे या दोघींची अवस्था शब्दातीत आहे. या दोघींसमोर पुन्हा एक जीवघेणा प्रश्न आहे. तो म्हणजे, आई अनिताला तिच्या काळजाचा तुकडा कायमचा निघून गेल्याचे कसे सांगावे, ते कळेनासे झाले आहे. अक्षय त्याची आई अनिताचा जीव की प्राण होता. तिच्या काळजावर घाव घालणारे हे वृत्त कसे सांगावे, या प्रश्नाने सोनू आणि पूजा जास्तच अस्वस्थ झाल्या आहेत. अक्षयने त्याच्या बहिणीप्रमाणेच मित्रांनाही संकेत दिले होते. आज भल्या सकाळपासूनच तो मित्रांमागे लागला होता. सकाळी ६ वाजतापासून त्याने मित्रांना क्रेझी कॅसलकडे जाण्यासाठी लवकर निघण्याची घाई केली होती. त्याचे फोनवर फोन येत होते. अखेर १० ते १०.३० च्या सुमारास सारेच्या सारे मित्र आपापल्या घरून बाहेर पडले. साधारणत: ११. ३० ला ते अंबाझरीजवळ पोहचले. काहींनी सोबत टीफिन आणला होता. तो खाल्ल्यानंतर अक्षयसह त्याचे सर्व मित्र क्रेझी कॅसलमध्ये गेले अन् मित्रांना चाट मारून अक्षय तसेच सागर सहस्रबुद्धे हे दोघे पुन्हा कधीच परत न येण्यासाठी निघून गेले.

अशी घडली ही दुर्दैवी घटना

अंबाझरी मार्गावर असलेल्या क्रेझी केसलमध्ये सुटीच्या दिवशी खास करून दर रविवारी मोठी गर्दी असते. क्रेझी केसलचे प्रशासन विशिष्ट वेळेसाठी येथील स्विमिंग पुलमधील पाण्यात समुद्राप्रमाणे कृत्रिम लाटांची निर्मिती करते. त्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी रविवारी दुपारी १ च्या सुमारास विविध वयोगटातील शंभरेक जण होते. प्रशासनाने इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करून पाण्यात लाटा निर्माण केल्या. सराव नसूनही खोलगट भागात असलेले अक्षय बिंड, सागर सहस्त्रबुद्धे,  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे तरुण पाण्यात बुडाले. ते ध्यानात येताच या युवकांचे मित्र यश भारद्वाज आणि रुतूज देव यांनी आरडाओरड केली. प्रशासनाला लाटांचे पाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी कुछ नही होता, म्हणत  यश आणि रुतूजला गप्प बसण्यास सांगितले. मात्र, मित्रांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून या दोघांनी  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले यांना आधार देत मानवी साखळी बनविली आणि त्यांना पाण्याबाहेर काढले. काही वेळेनंतर अक्षय, सागर आणि स्रेहललाही बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हे तिघे बेशुद्ध पडले असतानादेखिल तेथील कर्मचारी अथवा बाऊंसरने कसलीही मदत केली नाही. या मित्रांनीच आॅटो करून त्या तिघांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे अक्षय आणि सागरला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वडिलांना सोडून आईकडे गेला सागर
या दुर्घटनेत सागर गंगाधर सहस्रबुद्धे (वय २०) हा युवकही मृत झाला. तो जरीपटक्यातील लुंबिनीनगरात राहत होता. सक्करदऱ्यातील महाविद्यालयात बीएससीच्या प्रथम वर्षाला शिकणारा सागर त्याच्या वडिलांचा आधार होता. सागरच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तो वडिलातच आईचे प्रेम शोधत होता. वडील गंगाधर सहस्रबुद्धे माळीकाम करतात. त्यांना सोडून सागर त्याच्या आईकडे निघून गेला.

Web Title: Akshay said he will never go again; Craye Castle Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.