...लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा, नाहीतर ते म्हणतात त्याप्रमाणे तिरंगा फडकवून दाखवा - उद्धव ठाकरे    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 07:48 AM2017-11-29T07:48:05+5:302017-11-29T13:00:47+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Uddhav Thackeray on farooq abddulah | ...लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा, नाहीतर ते म्हणतात त्याप्रमाणे तिरंगा फडकवून दाखवा - उद्धव ठाकरे    

...लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा, नाहीतर ते म्हणतात त्याप्रमाणे तिरंगा फडकवून दाखवा - उद्धव ठाकरे    

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकव्याप्त कश्मीरवर तिरंगा फडवूच,  असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपातील नेतेमंडळी करतात. यावरुन  जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असं आव्हान केंद्र सरकारला दिलं. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

''डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा!'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.  

काय आहे आजचे सामना संपादकीय?
फारुख अब्दुल्ला यांची विधाने किती गांभीर्याने घ्यावीत, हा प्रश्नच असतो. मग हाच विचार करायचा झाला तर फक्त अब्दुल्लाच कशाला? देशातील सध्याचे सत्ताधीश म्हणा किंवा इतर पक्षांचे राजकारणी रोज जी ‘हवाबाण हरडे’ पद्धतीची विधाने करीत असतात ती तरी किती गांभीर्याने घ्यावीत? काल कोणती थुंकी उडवली व कोणते ‘हवाबाण’ सोडले याचा आज पत्ता नसतो. पुन्हा देशभक्ती व देशद्रोहाच्या व्याख्या जो तो आपापल्या बालबुद्धीप्रमाणे ठरवीत असतो. तरीही अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त विधानांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. डॉ. अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा त्यांचे तोंड वाईट पद्धतीने उघडले आहे. अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत व ते चीड आणणारे असले तरी कटुसत्य आहे. पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच! असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर या ‘५६ इंची’ छातीच्या मुद्यांवरच मोदी यांनी प्रचारसभांतून टाळ्या व नंतर भरघोस मते मिळवली. प्रत्यक्षात तीन वर्षांत काय घडले? पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून ‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही, हे सत्य कसे नाकारणार? यावर डॉ. अब्दुल्ला आता वेड्यासारखे (?) बरळले आहेत की, ‘पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याच्या गप्पा मारता, पण आधी श्रीनगरातील लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवून दाखवा!’ अब्दुल्ला यांचे हे बरळणे आहे की जहाल सत्य याचा निवाडा पंतप्रधान मोदी यांनीच करायचा आहे. डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा! स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशात तिरंगा डौलाने फडकवला जातो, पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला जात नाही हे स्वातंत्र्याचे व हुतात्म्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे अब्दुल्लांचे बरळणे वेडेपणाचे व मानसिक झटक्याचे असले तरीही त्यात तथ्य हे आहेच. 

डॉ. अब्दुल्लांचे बोलणे फोल ठरवायचे असेल तर स्वातंत्र्यदिनाचे पुढचे भाषण पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर न करता असा ‘उप’ सोहळा आपल्या जम्मू-कश्मीरातील लाल चौकात करावा व तेच सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल. अब्दुल्ला यांची विधाने धक्कादायक असतात. पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीरचा भूभाग हा पाकड्यांचाच असल्याचे सांगून अब्दुल्ला यांनी माती खाल्ली होती. पण यावर पंतप्रधानांनी तत्काळ खुलासा करून अब्दुल्लांच्या तोंडातील माती काढायला हवी होती.

‘अब्दुल्ला वेडे आहेत व पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याचे माझे वचन आहे,’ असे त्यांनी ठासून सांगायलाच हवे होते. भाजप सरकारतर्फे तसे ठणकावून सांगितले नाही. त्यामुळे अब्दुल्ला यांना वेड्यांच्या बाजारात उभे करणे कठीण झाले. कश्मीरात आजही हत्या होत आहेत. रोजच जवान शहीद होत आहेत. तिकडे पलीकडे हाफीज सईद नावाच्या सैतानाची नजरकैदेतून सुटका झाल्याने तोही दहशतवाद व हिंसाचाराची नव्याने आखणी करीत आहे. यावर डॉ. अब्दुल्ला हे ठार वेड्यासारखे बरळले आहेत. काय तर म्हणे, नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱयांत दहशतवाद संपला असून शांतता निर्माण झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. पण दहशतवाद कमी झाला असेल तर कश्मीरात रोज जवान शहीद का होत आहेत? अब्दुल्लांचे बरळणे हे खरेच वेडेपणाचे आहे काय? सगळाच गोंधळ आहे.

Web Title: Uddhav Thackeray on farooq abddulah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.