सोशल मीडियावर अजूनही जल्लोष, मिम्स अन् पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:25 AM2019-05-27T02:25:19+5:302019-05-27T02:25:36+5:30

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले आहेत.

Still on social media, Mills and posts | सोशल मीडियावर अजूनही जल्लोष, मिम्स अन् पोस्ट

सोशल मीडियावर अजूनही जल्लोष, मिम्स अन् पोस्ट

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले आहेत. पण राजकीय पक्षांमधील समाजमाध्यमावरील रणधुमाळी सुरूच असून संबंधित पक्षांच्या पाठिराख्यांचा कलगीतुरा अजूनही सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ तर काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला जात आहे. या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.
सोशल मीडियातून गवगवा करून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग पक्ष व उमेदवारांना उपलब्ध झाला आहे. सोशल मीडियातून मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविता येतात. लोकशाहीत सर्वच पक्षांना सत्तेची समान संधी असते. परंतु, जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या व समन्वय असलेल्या पक्षालाच जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे दिसते. २०१४च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला. तर, २०१९ मध्ये तर याच माध्यमाचा नियोजनपूर्वक आणि मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. काँग्रेसनेही समाजमाध्यमाच्या रणांगणात उतरून आपली लढाई सुरू केली. ‘दहशतवादी हमारे जवानोंको मार रहे है, ५६ इंच की छाती किस काम की,’ असे म्हणत काँग्रेसने प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला होता. निकालांनंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिले असून मजाक उडानेवालो देखली ५६ इंच की छाती... वार झेले सभीके और बेहोश भी किया सभीको अशा शब्दांत उत्तर दिले आहे. तर लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यावर भाजपच्या यशाचे श्रेय तुमचेच असल्याचा टोला लगाविण्यात आला आहे. पराभवामुळे राहुल गांधी यांच्यावर मिम्स आणि पोस्टच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी यांनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शूरपणे निवडणूक लढलो, त्यांनी कठोर परिश्रम घेतले यामध्ये कोणतीही शंका नाही. पण दुर्दैवाने आम्ही निवडणूक हरलो. त्यांनी राजीनामा का द्यावा? त्यांनीच पक्षाचे नेतृत्व करायला हवे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा लढू आणि जिंकू. मोदी लाटेतही कित्येक पक्षांचा आणि दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. परंतु त्या नेत्यांनी आणि त्यांच्या अध्यक्षांनाही कोणी राजीनामा देण्यास सांगितले नाही. आमच्या नेत्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
तर पराभवानंतर पोस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनाही धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताºयाच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली. संकट आले म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं, आज सबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठीण आहे, मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू. आज अनेक ठिकाणांहून टँकरची मागणी आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही, अशी तक्रारदेखील केली जात आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी, अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारकडून मत घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे शरद पवार यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
>प्रज्ञासिंह ठाकूरवर मिम्स
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी जामिनावर असलेली खासदार प्रज्ञासिंह ठाकूरवर जोरदार मिम्स व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकीत बॉम्बस्फोट आरोपी हाफिज सईदला जनतेने नाकारले तर लोकसभा निवडणुकीत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जनतेने निवडून दिले. तसेच मी प्रज्ञासिंह ठाकूरला कधीच माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मग प्रज्ञा ठाकूरचा राजीनामा न घेता तिला एनडीए बैठकीत सहभागी का केले, असा सवाल मिम्सच्या माध्यमातून विचारला जात आहे.
>पवारही लक्ष्य
लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनाही नेटकऱ्यांनी लक्ष्य केलं आहे. शरद पवार लोकसभेचा निकाल टीव्हीवर पाहत आहेत आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. होय हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, अशा आशयाचे मिम्स व्हायरल होत आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. पवार आता कोणावर विश्वास राहिला नाही असे म्हणतात, तर मी गर्दीची गॅरंटी दिली होती, सीट जिंकून येण्याची गॅरंटी दिली नव्हती, अशा आशयाचे मिस व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवर व्हायरल होत आहेत.
>आपले अकाउंट तयार ठेवा
पुन्हा एकदा मोदी सरकार आले आहे. सर्वांचे अभिनंदन. चला पुन्हा एकदा नोटा बदलायच्या आहेत. आणि आधारकार्ड, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आणि खासकरून टिकटॉकशी लिंक करायचे आहे. मला वाटते या वेळी खरंच १५ लाख खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यामुळे खाते तयार ठेवा, अशा पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत.
>देश-परदेशात कोठेही सरकार बनविण्यासाठी संपर्क साधा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळविले आहे. भाजपच्या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचाही मोलाचा वाटा आहे. निवडणुकीतील त्यांची रणनीती भाजपला यशापर्यंत घेऊन गेली. त्यामुळेच भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये बहुमत गाठले. त्यामुळे देश किंवा परदेशात कोठेही सरकार बनविण्यासाठी संपर्क साधा : मोटाभाई गुजरातवाले अशी पोस्ट सध्या फिरत आहे.

Web Title: Still on social media, Mills and posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.