Kerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:21 AM2018-08-19T06:21:29+5:302018-08-19T06:21:53+5:30

राज्य शासनाचे २० कोटी; सरकारी अधिकाऱ्यांकडून ३० कोटी, काँग्रेसचे आमदार देणार एक महिन्याचे वेतन

Kerala floods: A wave of help from Maharashtra for Kerala | Kerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

Kerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

Next

- विशेष प्रतिनिधी

मुंबई : पूरग्रस्त केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्य शासनाने २० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना अन्नपुरवठा केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच धावून जावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यातील सर्व दीड लाख अधिकारी त्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देतील, असे जाहीर केले. ही रक्कम ३० कोटी रुपये असेल, अशी माहिती महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी दिली.
पूरग्रस्तांना मदत पाठविण्यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाºयांची विशेष बैठक शनिवारी मंत्रालयात झाली. त्यात एका विशेष पथकाची नियुक्ती करुन त्यावर याबाबतच्या समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सामाजिक संस्थांचा पुढाकार
एमसीएचआय क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून ५१ लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

फूड आर्मीचीही मदत
मुंबईतील फूड आर्मी या स्वयंसेवी संंघटनेच्या माध्यमातून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी खाद्यपदार्थ पाठविण्यात येणार आहेत. यासाठी खासगी विमान कंपनीने मालवाहू विमान विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. मुंबई व परिसरातील सत्तेचाळीस केंद्रावरून ही सामग्री गोळा करून मंगळवारी हे विमान मुंबईतून बेंगलोरसाठी रवाना होईल, अशी माहिती फूड आर्मीच्या संस्थापिका रिंटू राठोड यांनी दिली. तर काहीही करून आम्ही पंधरा हजार किलो खाद्यपदार्थ पाठविणार आहोत, असे खार येथील केंद्राची जबाबदारी सांभाळत असलेल्या नायाब बट्ट यांनी सांगितले.

पन्नास मशिदींचाही पुढाकार
पूरग्रस्तांसाठी राज्यातील ५० मशीदींद्वारे मदत पाठवण्यात आली आहे. स्टुडन्ट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन या संस्थेतर्फे तरुण स्वयंसेवकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर दीड लाखापेक्षा जास्त रक्कम जमवली व ती केरळला पाठवली. या मोहिमेची राज्यातील जबाबदारी असलेले खिझर शबिबी म्हणाले की, पुढील आठवड्यात असलेल्या ईदच्या निमित्ताने राज्यातील १०० पेक्षा जास्त मशिदींमध्ये व ईदगाहच्या ठिकाणी केरळवासीयांसाठी मदत गोळा करण्यात येईल. ईदच्या वेळी देण्यात येणाºया कुर्बानीच्या प्राण्याचे कातडे विकून निधी जमा करून तोदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येईल.

पूरग्रस्तांसाठी मुंबईकरही सरसावले
मुंबई : केरळमध्ये १०० वर्षांतील सर्वात भीषण पुराने थैमान मांडले असताना, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता मुंबईकरही सज्ज झाले आहेत. दक्षिण मुंबईसह उपनगर आणि मुंबई त ठिकठिकाणी ‘एनी बडी कॅन हेल्प’ या सामाजिक संस्थेमार्फत मदत गोळा केली जात आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांकडून गोळा केलेली मदत केरळला विमानाने रवाना करणार असल्याची माहिती ‘एनी बडी कॅन हेल्प’ संस्थेचे निमंत्रक चिरेश झवेरी यांनी दिली.
झवेरी म्हणाले की, पूरग्रस्तांसाठी आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव संस्था करत आहे. या वस्तू जमा करताना क्रीम बिस्कीट आणि वापरलेले कपडे स्वीकारणार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
याशिवाय माकपचे कॉम्रेडही पूरग्रस्तांच्यामदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. माकपचे मुंबई जिल्हा समितीचे सदस्य के. के. प्रकाशन म्हणाले की, मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांतून मदत स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. वाशीमधील केरळ हाउस, वसईतील बी.के.एस. स्कूल यासह विविध ठिकाणी मदत स्वीकारली जात आहे. केरळ सरकारने नेमलेल्या समितीच्या मदतीने ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येईल.
मुंबईसह नवी मुंबई आणि वसईतून मदतीचा ओघ वाढत असल्याची माहिती के. के. प्रकाशन यांनी दिली. त्यातील नवी मुंबई आणि वसईतून आलेल्या मदतीच्या वस्तुंमुळे ७ ट्रक भरले आहेत. या वस्तू केरळला शनिवारी कार्गोच्या मदतीने रवाना केल्या आहेत. मुंबईतूनही २ ट्रक भरतील, इतक्या जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा झाल्याचे प्रकाशन यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी घेऊन रेल्वे रवाना
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन विशेष रेल्वे सायंकाळी केरळकडे रवाना झाली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार हा निर्णय घेतला आहे.

मंत्री महाजन केरळला जाणार
पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांचे एक पथक पुरेशा वैद्यकीय साठ्यासह केरळला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा केरळ येथे भेट देणार आहेत.

येथे जमा करा मदत!
दक्षिण मुंबईतील हाजीअली मार्गावरील बेसाइड मॉलमधील गाळा क्रमांक ३३.
माटुंगा येथील पोद्दार महाविद्यालयानजीक असलेल्या कीर्ती महलमध्ये २१८/ए गाळा.
चेंबूर येथील आदर्श विद्यालय
बोरीवली पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवरील भाट लेनमधील हर्मस अपार्टमेंटचा बी/१० गाळा.
मुलुंड पश्चिमेकडील अंबाजी धाम येथील भक्ती मार्गावरील वर्धमाननगरच्या ओ विंगमधील ४०१ क्रमांक गाळा
नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० मधील साईकला गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या मजल्यावरील गाळा क्रमांक ११मध्ये.
कामोठे येथील सेक्टर ३४मधील मोरेश्वर हाइट्सच्या गाळा क्रमांक १०३मध्ये.
वाशीचे केरला हाउस
वसईचे बीकेएस स्कूल

Web Title: Kerala floods: A wave of help from Maharashtra for Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.