पाऊस थांबल्याने मुंबईत रस्त्यांच्या कामांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:04 AM2018-09-25T04:04:31+5:302018-09-25T04:05:44+5:30

मान्सून लवकरच मुंबईतून माघारी परतण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने बंद पडलेली रस्त्यांची कामे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहेत़

 Due to the stagnation of rain, road works in Mumbai | पाऊस थांबल्याने मुंबईत रस्त्यांच्या कामांना वेग

पाऊस थांबल्याने मुंबईत रस्त्यांच्या कामांना वेग

Next

मुंबई : मान्सून लवकरच मुंबईतून माघारी परतण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने बंद पडलेली रस्त्यांची कामे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहेत़ त्यानुसार १ आॅक्टोबरपासून मुंबईत तब्बल १ हजार ३४३ रस्त्यांची पुनर्बांधणी व रिर्स्फेसिंगच्या कामाला सुरुवात होणार आहे़
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्व रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार दुरुस्तीला सुरुवात केली आहे़ या अंतर्गत १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत ५५२.७१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची, तर २ लाख ८८ हजार २७८ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे करण्यात आली आहेत. पावसाळा संपल्यानंतर, म्हणजेच आॅक्टोबर २०१८पासून २०२.३१ कि.मी. लांबीच्या ६२४ रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत.
एकूण ६२४ रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ यामधील १९९ रस्ते शहर भागात, १५५ रस्ते पूर्व उपनगरात तर २७० रस्ते पश्चिम उपनगरातील आहेत़ यापैकी ६२ रस्ते प्राधान्य क्ऱ १मध्ये असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती होणार आहे़ गेल्या पावसाळ्यापासून प्रलंबित ७१९ रस्त्यांची पुनर्बांधणी होणार आहे़

७१९ रस्त्यांची कामे वेग धरणार
♦पावसाळ्यामुळे थांबविण्यात आलेली ३०५.०८ कि.मी. लांबीच्या ७१९ रस्त्यांची कामे पुन्हा सुरू होणार आहेत. यामधील २३८.४५ कि.मी. लांबीचे रस्ते हे ‘प्रकल्प रस्ते’, ‘प्राधान्यक्रम २’ - ७.७१ कि.मी. लांबीचे रस्ते, प्राधान्यक्रम ३ - ५८.९२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे ही आॅक्टोबर २०१८पासून हाती घेण्यात येत आहेत.
♦या प्रकल्प कामांमध्ये शहर भागातील ४६.१६ किमी लांबीचे १९९ रस्ते, पूर्व उपनगरातील ४७.८९ किमी लांबीचे १५५ रस्ते, १०८.२६ किमी लांबीचे २७० रस्ते हे पश्चिम उपनगरांमधील आहेत.
♦प्रकल्प रस्त्यांसाठी दोषदायित्व कालावधी हा तीन वर्षांचा आहे. तर प्राधान्यक्रम २ व ३ अंतर्गत असणाऱ्या पुन:पृष्ठीकरणाच्या कामांचा
दोषदायित्व कालावधी हा दोन वर्षांचा आहे़
♦२०१५मध्ये रस्तेकामातील घोटाळा उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे़ त्यानुसारच रस्त्यांची कामे होत आहेत़ ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेने या घोटाळ्याची चौकशी केली होती़ दोन टप्प्यांत झालेल्या चौकशीनंतर १८० अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता़ यापैकी सहा जणांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे़

Web Title:  Due to the stagnation of rain, road works in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.