डोळ्यांत कशाला पाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 09:55 AM2018-03-11T09:55:08+5:302018-03-11T09:55:08+5:30

तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतिनिमित्त..

Why water in the eye | डोळ्यांत कशाला पाणी...

डोळ्यांत कशाला पाणी...

googlenewsNext

- पद्मजा फेणाणी-जोगळेकर
२२ जानेवारी १९९९
हा दिवस मला कधीच विसरता येणार नाही. कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!
नाशिकहून कार्यक्र म करून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे ठरले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. ‘या या’ म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं स्वागत केलं.
‘सध्या नवीन काय चाललंय?’ क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं, ‘अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय.’
तात्या म्हणाले, ‘मग म्हणाना.’
एवढ्यात तात्यांच्या जवळचे सद्गृहस्थ काळजीनं म्हणाले, ‘तात्यांना आता काही ऐकवू नका.’ परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ‘अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. म्हणू द्या तिला.’
मी गायला सुरुवात केली -
‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हिड्डयाँ गलाएँ...’
‘वा, फारच सुंदर झालंय! किती वेगळा नि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात राहा..’
- आयुष्यभर जपावा असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं, तर त्याची झेप गरुडझेप ठरू शकते. रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कविमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाºया अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, ‘ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे...’
कुसुमाग्रजांंच्या विशाखा या संग्रहाची प्रस्तावना लिहिणाºया वि.स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल?
स्वधर्म कवितेत कुसुमाग्रज म्हणतात,
दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता... तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसºयास नसे. आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि.स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज !
तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खºया अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते दीपस्तंभ ठरले! बºयाच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना जनस्थान पुरस्कार मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबार्इंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणाºया या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.
यातून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ - (निवड कुसुमाग्रजांची - भाग १) व भाग २ म्हणजे घर नाचले नाचले या ध्वनिफिती. त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम केल्याचं आज समाधान आहे.
तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबार्इंप्रति आदर व्यक्त करण्याकरता, त्यांच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. हा आम्हीही थाटात हा सोहळा २३ आॅगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यानंतर झालेल्या भेटीत तात्यांनी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली. केवढं सामर्थ्य होतं त्यांच्या स्पर्शात! स्पर्श म्हटला की तात्यांची कणा ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त सरांच्या आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,
मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढ म्हणा...
या ओळी कठीणप्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण...’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात !
तात्यासाहेब गेल्याची बातमी जेव्हा ऐकली, तेव्हा धस्स झालं. मराठी भाषेचे पितामह ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्त्व - तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन - निखळून पडलं ! ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. अंगणात त्यांचं पार्थिव सुंदर सजवलेल्या चबुतºयावर ठेवलं होतं. त्यामागे पाटी होती,
‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन,
मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परि पाय तूझे,
धुळीचेच आहे मला भूषण...!’ हे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन -
‘गमे कि तुझ्या रूद्र रूपात जावे,
मिळोनी गळा घालुनीया गळा.’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?
त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून
आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी...
हे गुणगुणणारे तसंच,
ती शून्यामधली यात्रा, वाºयातील एक विराणी,
गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी...
हे तत्त्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी... हे विचार आचरणात आणणं तर सोडाच; परंतु सुचणेसुद्धा कठीण आहे, हे जाणवले आणि या महामानवाची प्रतिमा मनात उंच उंच होत गेली !
दुसºया दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. गर्जा जयजयकार क्रांतीचा मधून क्र ांती नसान्सांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, नटसम्राटसारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार, मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा शब्दभास्कर अनंतात विलीन झाला.
‘एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रू तरंगत
दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू !
मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव
काय तुला देऊ...?’
असं मनात म्हणत, या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि हारातली दोन फुलं घरी घेऊन आले... आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

padmajajoglekar@gmail.com

Web Title: Why water in the eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.