आव्हान काश्मीरचे मन जिंकण्याचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 06:03 AM2019-02-17T06:03:00+5:302019-02-17T06:05:06+5:30

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एक स्वाभाविक संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दोन कळीचे प्रश्न उपस्थित होतात : १. पाकिस्तानची मस्ती जिरवण्याची युद्धखोर भाषा कितपत व्यवहार्य आहे? २. काश्मिरी जनता हिंसेचे समर्थन करणारी आणि भारतविरोधी आहे का? दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून दोनदा बचावलेले पुलवामाचे माजी आमदार मोहम्मद युसूफ तरीगामी यांनी केलेले हे विश्लेषण...

When ground reality bites ex MLA of Pulwama Mohammed Yousuf Tarigami speaks about the pains of J&K | आव्हान काश्मीरचे मन जिंकण्याचे!

आव्हान काश्मीरचे मन जिंकण्याचे!

Next
ठळक मुद्दे‘गुस्से से हालात को संभाला नही जाता.’ त्याऐवजी काश्मिरी जनता दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.

- मोहम्मद युसूफ तरीगामी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला अतिशय दुर्दैवी आहे. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच एवढी तीव्र घटना घडली. या आधीही अनेक दहशतवादी हल्ले काश्मिरात झाले. पण यावेळच्या हल्ल्याची पद्धत अधिक भीषण असल्याने खूप मनुष्यहानी झाली. अशा हिंसाचाराच्या घटनांमुळे काश्मिरी जनतेच्या प्रश्नांचा गुंता आणखी वाढतो. हिंसाचारामुळे कुठलेच प्रश्न सुटलेले नाहीत, हा जगाचा अनुभव आहे. हिंसेने काश्मिरी जनतेचे आजवर नुकसानच केले आहे. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार झाला, की त्यामध्ये येथील सामान्य नागरिक पहिल्यांदा भरडला जातो. काश्मीरची बाजू घेऊन दहशतवाद घडवणारे काश्मीर प्रश्नाचा गुंता सोडवत नाहीत तर अधिक वाढवतात. पुलवामा परिसरातले बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. भात आणि सफरचंदाची शेती ते करतात. भगव्या केशराचे गंधीत मळे जिथे फुलतात ते जगप्रसिद्ध पम्पोर आमच्याच भागात आहे. या सगळ्या वैभवाला न जाणो कोणाची दृष्ट लागली. ‘सारा खुशहाल इलाका तबाही मे बदल गया !’
हे आज घडलेले नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून १९४७ पासून घडत आले आहे. खरे म्हणजे मुस्लीमबहुल असूनदेखील काश्मीर खोऱ्याने बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांतवाद नाकारला. पाकिस्तानाशी नाते जोडण्याचे नाकारून काश्मिरी जनता राजा हरिसिंगांच्या सोबत राहिली. पंजाब, बंगाल फाळणीच्या जखमांनी भळभळत होता तेव्हा काश्मीर खोऱ्यात रक्ताचा एक थेंबही वाहिला नव्हता. महात्मा गांधीदेखील म्हणाले होते, ‘उमेदीचे किरण जर मला कुठे दिसत असतील तर ते काश्मिरातूनच.’ राजा हरिसिंगांनी काश्मिरी जनतेच्या हितासाठी कायदा केला. काश्मीरमध्ये फक्त स्थानिकांनाच नोकऱ्या करता येतील, जमिनी घेता येतील अशा तरतुदी केल्या. पुढे भारतीय राज्यघटनेनेही या कायद्यास बळ दिले. पण स्वातंत्र्यानंतरच्या केंद्र सरकारांनी सातत्याने कलम ३७०ला धक्के दिले. अनेक सुधारणा करून काश्मिरी जनतेचे नुकसान केले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर हे कलमच हटवून टाकण्याची आहे. काश्मिरी युवकांच्या आशा-आकांक्षांची पूर्ती करण्याला कोणत्याच सरकारांनी प्राधान्य दिले नाही. त्यामुळे काश्मिरी तरुणांची नाराजी वाढत गेली. हाताला काम नसल्याने हे तरुण कशाच्याही बहकाव्यात येऊ लागले. सन २०१४ नंतर काश्मिरी तरुणांची नाराजी वाढली. त्याचे मुख्य कारण ठरले मेहबूबा सईद आणि त्यांची ‘पीडीपी’. भाजपाची साथ न करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी निवडणूक जिंकली. पण सत्ता मिळवण्यासाठी भाजपाशीच हातमिळवणी केली. मेहबूबांच्या विश्वासघातामुळे काश्मिरी जनतेत संताप निर्माण झाला.
राजकीय अस्वस्थतेमुळे येथील जनतेला भडकावण्याच्या दहशतवाद्यांच्या इराद्यांना बळ मिळते. याचा अर्थ काश्मिरी जनता दहशतवादी कृत्यांना साथ देते असा मात्र कोणी घेऊ नये. संपूर्ण काश्मीर खोरे दहशतवादाच्या गडद छायेखाली कापते ही वस्तुस्थिती आहे. काश्मिरी तरुणांचा अत्यल्प हिस्सा दहशतवादाच्या मार्गाकडे ओढला गेला हे खरेच; पण सर्वसाधारणत: काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे. आम्हालाही प्रगती करायची आहे. सुखीसमाधानी आयुष्य जगायचे आहे. गोळ्यांचे आवाज, स्फोटांच्या चिंधड्या, वातावरणात दाटून राहिलेली हिंसा ही काश्मिरी जनतेची प्राथमिकता असू शकत नाही. म्हणूनच जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या आदिल अहमद दार या तरुणाच्या वडिलांनी अतिशय दु:ख व्यक्त केले. ‘‘कोणाचाही मृत्यू माझ्यासाठी वेदनादायी आहे. जे झाले ते अतिशय अयोग्य होते,’’ ही त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे. संपूर्ण काश्मीरची भावना हीच आहे. दहशतवादाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. काश्मीरचा प्रश्न हिंसाचाराने सुटणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसा असू शकत नाही. दहशतवादी हल्ला अतिशय लाजिरवाणा आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु, पाकिस्तानप्रमाणेच आपणही व्यक्त झालो तर त्यातून विनाशाशिवाय काहीच हाती लागणार नाही. आजपर्यंत किती युद्धे, चकमकी झाल्या. ‘सर्जिकल स्ट्राइक’ही झाले. त्यातून हाती काय लागले? दहशतवाद्यांची पैदास थांबलेली नाही. ‘गुस्से से हालात को संभाला नही जाता.’ त्याऐवजी काश्मिरी जनता दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. काश्मिरी लोकांची मने जिंकण्याची कामगिरी आजवरच्या सरकारांना करता आलेली नाही. काश्मीर समस्येचे खरे मूळ हेच आहे.
शब्दांकन : सुकृत करंदीकर

Web Title: When ground reality bites ex MLA of Pulwama Mohammed Yousuf Tarigami speaks about the pains of J&K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.