अस्वस्थ काश्मिरच्या सुंदर रस्त्यांवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:19 PM2018-06-16T15:19:37+5:302018-06-16T15:20:29+5:30

गेल्या रविवारी श्रीनगरला पोहचलो. वाटेत अनेक चौक्या, बंदूकधारी पोलीस आणि जवान ! हिरवे दांडगे ट्रक, वाजणार्‍या शिटय़ा आणि सायरन. आम्ही आणि भेटणारे काश्मिरी यांच्या नजरा एका अस्वस्थतेनं गढुळलेल्या होत्या.. फार देखणी माणसं. आणि त्याहून सुंदर त्यांची मनं! सत्तेचाळीसची फाळणी, नकाशावरल्या राजकीय रेषा, अधूनमधून उमटणारे, भडकवलेले उद्रेक यांनी सार्‍या सामान्य जनजीवनालाच अशांत, अस्वस्थ केलं आहे. अविचल आहे तो एकटा हिमालय!

on the way of restless kashmir | अस्वस्थ काश्मिरच्या सुंदर रस्त्यांवर...

अस्वस्थ काश्मिरच्या सुंदर रस्त्यांवर...

Next

वसंत वसंत लिमये 

सात हजार फुटांवर पोहचलो आणि गार हवेच्या झुळुकेनं गालाशी गुदगुल्या करायला सुरुवात केली. डांबरी रस्ता संपून मातीचा रस्ता सुरू झाला होता. गाडीच्या हादर्‍यांच्या लयीची आता सवय झाली होती.  लांबचा पल्ला गाठायचा असल्यानं, दुपारच्या जेवणाला चाट दिली. बाजीरावाचा आदर्श आठवून, बिस्कीटं आणि केळी असं चालत्या गाडीतच खाल्लं. दरीच्या माथ्यावर काळ्या ढगांचं सावट होतं. एव्हाना ते आमच्या सवयीचं झालेलं.. डावीकडच्या खोल दरीत खळाळत, फेसाळत वाहणारा स्वच्छ निर्झर आज आमची अखंड सोबत करत होता. उडत्या चालीवर किशोरदा ‘झुमरू’ झाले होते, आमचाही मूड मस्त होता. आम्ही निघालो होतो ‘सिंथन टॉप’कडे. उंची 12,000 फूट.
शुक्रवारी रात्री आम्ही भदरवाह इथे कॅम्प केला होता. पाचव्या आठवडय़ातील आमचे पुण्याहून आलेले नवे भिडू होते प्रशांत जोशी आणि आनंद भावे. प्रशांत आयवाटी क्षेत्रातील तज्ज्ञ. त्याच्या उत्साहामुळे सारी ‘हिमयात्रा’ डिजिटली रेकॉर्ड होते आहे. आनंद म्हणजेच भावेअण्णा हा अडुसष्ट वर्षीय तरुण म्हणजे एक गमतीशीर अजब रसायन आहे. या वयातही अण्णा एकदम फिट! एकीकडे हा माणूस लेझर या विषयातील तज्ज्ञ, त्यांची शास्त्रीय जिज्ञासा दांडगी. दुसरीकडे त्यांचा आध्यात्मिक कल, पौराणिक व्यासंग अफाट, तशीच रामरायावरही गाढ श्रद्धा. त्यांच्या अखत्यारीतील विषय नसेल तर ‘सब कुछ ठीक होगा !’ अशी निर्‍शंक श्रद्धा. माझं नेमकं याच्या उलटं! ‘कसं होणार?’ ही पराणी शेवटर्पयत प्रयत्न केले पाहिजेत, अशी टोचणी माझ्या जबाबदार मनाला लावणार. कितीही प्रयत्न केला तरी अखेर्पयत अस्वस्थतेचा भुंगा एका कोपर्‍यात कुरतडत राहणार. खरंच श्रद्धा आणि प्रय}वाद यांचा समतोल साधता आला पाहिजे.
भदरवाह येथून रस्ता पूलडोडा या गावी उतरतो, इथे आम्हाला प्रथमच चिनाब नदी भेटली. तिचं खळाळतं जोमदार दर्शन उल्हसित करणारं होतं. ही पश्चिमेकडे पाकिस्तानात जाणारी नदी उगम पावते खूप पूर्वेकडील हिमाचल प्रदेशातील ‘चंद्र ताल’ येथे. तेव्हा तिचं नाव आहे चंद्रा नदी. आम्ही पूलडोडाहून उत्तरेला किश्तवार येथे चिनाबच्या काठाने भांडारकूटला पोहचलो. येथे मारवा किंवा भागा नदी चिनाबला येऊन भेटते. संगमानंतर ती होते ‘चंद्रभागा’ म्हणजेच चिनाब! याच संगमावर, सोनी-महिवाल या लोकप्रिय प्रेमकहाणीतील जोडीने म्हणे जीव दिला होता ! भांडारकूट हे ठिकाण आहे 3,000 फुटांवर. इथून आम्ही 9,000 फूट चढून ‘सिंथन टॉप’ येथे पोहचणार होतो.  आम्ही अनेक नद्या पार केल्या होत्या; पण चिनाबचा जोश, फेसाळतं स्वच्छ पाणी पाहून मी तर तिच्या प्रेमात पडलो.
सात हजार फुटांपासूनच देवदार वृक्षांचं घनदाट जंगल विरळ होऊ लागलं होतं. पिवळसर, मातकट डोंगर उतारांवर ज्युनिपरची दाट झुडपं दिसू लागली. थंडगार वारा आता बोचरा होऊ लागला होता. पुढच्याच वळणावर गाडी थांबवून झटपट स्वेटर, जाकिटं चढवली गेली. हिमालयात तापमान झटझट बदलू शकतं, म्हणूनच एक जाडजूड जाकीट घालण्याऐवजी दोन तीन आवरणं असणं गरजेचं असतं. ‘सिंथन टॉप’ पार करताच आम्ही जम्मू सोडून काश्मीरमध्ये प्रवेश करणार होतो.  स्वभावतर्‍ जम्मू, काश्मीर आणि लदाख अतिशय वेगळे आहेत. मुंबईहून आलेले काही फोन, स्थानिक वर्तमानपत्रातील उल्लेख आणि बहुतांश प्रसारमाध्यमांची सवंग नकारात्मक वृत्ती यामुळे किश्तवार, अनंतनागमार्गे श्रीनगरला जाताना एक  अस्वस्थ भीतीचा किडा डोक्यात वळवळत होता.
दहा हजार फुटांनंतर झुडपंही गायब झाली. अजूनही पंधरा किमी बाकी होते. पिवळसर मातकट उतारावरून वळणं घेत अलगदपणे आमची गाडी ‘सिंथन’ खिंड जवळ करत होती.. तब्बल अकरा तास अमितनं ड्रायव्हिंग केलं होतं. हिमालयात गाडी चालवणं हे येर्‍यागबाळ्याचं काम नोहे! एकीकडे दरी तर दुसरीकडे अंगावर येणार्‍या कपारी. आम्ही साडेसहाला ‘सिंथन टॉप’वर पोहचलो. पलीकडे उतरणारा रस्ता आता डांबरी दिसत होता. ं तंबूतल्या टपरीतला गरमागरम चहा घेऊन आम्ही दाकसुमच्या दिशेनं काश्मीरकडे निघालो.
या आठवडय़ात सोमवारी भागीरथीच्या काठी असलेल्या उत्तरकाशीहून प्रवासाला सुरुवात केलेली. यम्नोत्रीच्या वाटेवर यमुना, मग कमल नदी पार केली. मोरी या गावापाशी आम्ही उत्तराखंडातून हिमाचलमध्ये प्रवेश केला. देवभूमी गढवालचा हिमालय मागे पडून लाल रंगाची किनार असलेली हिरव्या छपराची टुमदार घरं, हिरवळीनी सजलेले उतार, देवदार आणि पाइनचं मिश्र जंगल दिसू लागलं. सफरचंदासारखा रंग आणि कांती असलेल्या स्त्रिया, गुबगुबीत गोरे गाल असलेली मुलं दिसू लागली. पर्यटकांना आकर्षित करणारा हिमाचल सुरू झाला होता. हिमालयाची ही बदलती रूपं स्तिमित करणारी होती.  संध्याकाळी पोहचलो पब्बर नदीच्या किनारी रोहडू या गावी. ‘रोहडू’ हे छोटंसं गाव असेल अशी आमची अपेक्षा; पण ते निघालं चांगलं मोठ्ठं शहर. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचा हा मतदारसंघ आणि यामुळेच प्रघातानुसार ‘रोहडू’ हे छान विकसित झालेलं मॉडर्न शहर.  गावाच्या थोडं पुढे जाऊन पब्बर नदीच्या किनारी एका निवांत ‘लग्नी’ लॉनवर मस्त कॅम्प केला.
पुढील प्रवासात ‘तातापानी’पाशी सतलजचं दर्शन झालं. मंडीपाशी  बियास नदीच्या काठी आयआयटी मंडीचं देखणं कॅम्प्स पाहायला मिळालं. मी मुंबई आयआयटीचा; पण ते कॅम्प्स पाहून ‘अशीच आमुची आयआयटी असती..’ अशी असूया मनात उमटून गेली. मंडीहून निघून आम्ही ‘पराशर’ सरोवरापाशी मुक्काम केला. इथेच पराशर ऋषींचा आश्रम होता. या सरोवरातील नैसर्गिक ‘तरंगतं’ बेट मोठं आश्चर्यकारक आहे. रात्री लक्षावधी चांदण्यांनी चमचमणार्‍या आकाशाखाली अण्णांच्या महाभारतकालीन रसभरीत कहाण्यांनी फारच मजा आणली. शिमल्याला बगल देऊन आम्ही कुफरी, धरमशालामार्गे जोत नावाच्या ठिकाणी सुमारे दहा हजार फुटांवर राहिलो.  मजल दरमजल करत भदरवाह येथे पोहचलो. या सार्‍याच प्रवासात भागीरथी, कमल, टोन्स, पब्बर, सतलज, बियास, रावी आणि बैरासूल अशा हिमालयातून येणार्‍या अनेक खळाळत्या शीतल नद्या आम्ही पार केल्या. नंतर चिनाब आणि श्रीनगरच्या मार्गावर झेलम, एकाच आठवडय़ात इतक्या मातब्बर नद्या भेटणं हा मस्त योग जुळून आला होता.
रविवारी दाकसुमहून छोटा पल्ला पार करून श्रीनगरला पोहचलो. वाटेत अनेक चौक्या, बंदूकधारी पोलीस आणि जवान भेटत होते. हिरवे दांडगे ट्रक, वाजणार्‍या शिटय़ा आणि सायरन. अनंतनागमार्गे थोडी धाकधूक मनात घेऊन सुखरूपपणे दाल लेकच्या काठी पोहचलो. वाटेत आम्ही आणि भेटणारे काश्मिरी यांच्या नजरा एका अस्वस्थतेनं गढुळलेल्या होत्या. गोरेपान चेहरे, देखण्या भरघोस दाढय़ा आणि विशेष उठून दिसणारी धारदार नाकं असलेले पुरुष, तर स्वच्छ नितळ गोरी कांती आणि रेखीव भुवयांखालून डोकावणारे गहिरे काळेशार डोळे असलेल्या सुरेख स्त्रिया. आजूबाजूचं नितांत रमणीय सौंदर्य जणू त्या माणसांत उतरलं आहे. आम्हाला वाटेत भेटलेली सारीच माणसं प्रेमळ होती. सत्तेचाळीसची फाळणी, नकाशावर ओढलेल्या राजकीय रेषा, अधूनमधून उमटणारे, भडकवलेले उद्रेक यांनी सार्‍या सामान्य जनजीवनालाच अशांत, अस्वस्थ केलं आहे. हिमालय अविचल आहे. त्यातून उद्भवणार्‍या, सार्‍या भरतवर्षाला सुजलाम, सुफलाम करणार्‍या असंख्य नद्यांच्या सोबत माणुसकीचा झरा जर पुन्हा वाहू लागला तर या शापित नंदनवनाला लागलेलं गालबोट पुसून टाकता येईल !

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
 

Web Title: on the way of restless kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.