पुण्यातील पेठांमधील उरुस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:00 AM2019-05-26T07:00:00+5:302019-05-26T07:00:12+5:30
पुण्यात वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. साधारणत: चैत्र-वैशाख महिन्यांत हे उरूस साजरे होतात. त्याविषयी...
- अंकुश काकडे -
दत्तवाडीतील म्हसोबाराय मंदिराने हॉल बांधला असून तेथे एमएससीआयटीचे क्लासेसदेखील चालविले जातात. यावर्षी तर म्हसोबारायाला २० लक्ष रुपयांचा सोन्याचा मुखवटा बनविला आहे. सुरुवातीपासून अनेकांचे हात या कामाला लागले, पण आता सध्या गजानन लोंढे, बाळासाहेब साठे, शंकर थोरवे, आनंद रिठे, विनायक हणमघर, राजाभाऊ चोरगे, शशिकांत काळे, किरण गंजकर, वसंत कदम, पवन अटक इत्यादी मंडळी हा उरूस पुढे नेत आहेत. आजच्या काळातही म्हसोबारायाला नैवेद्य वाहण्यासाठी दुपारी महिलांची मोठी रांग तेथे पाहावयास मिळते. अर्थात नैवेद्य पुरणपोळीचा पण कार्यकर्ते मात्र रात्री तिखट जेवणाशिवाय राहात नाहीत.
शास्त्री रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ शास्त्री पुतळ्यापाशी असलेलं छोटसं पण टुमदार मंदिर आपण पाहातो. तेथे मांगीरबाबांचं वास्तव्य होतं अशी आख्यायिका सांगितली जाते. फार वर्षांपूर्वी समोरच्या बाजुला बाबा ध्यान धारणेला बसत व पलीकडे असलेल्या विहिरीवर पाणी पिण्यास येत तेथेच आता हे मंदिर आहे. आता तेथील विहीर बुजविली गेली आहे. पेशवेकालीन जागृत देवस्थान आहे, असे म्हणतात. वैशाख महिन्यातील षष्ठीला हा उरूस होतो. छबिना, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिराची आयोजन या निमित्ताने होतात. रोज मांगीरबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेकजण येतात, असे तेथील कार्यकर्ते सांगतात, पण आवर्जून एक नाव ते घेतात ते म्हणजे शिवसेना नेते शाम देशपांडे यांचे. दररोज ते या ठिकाणी दर्शनाला न चुकता येतात. उरूसाच्या दुसºया दिवशी भाविकांना महाप्रसाद दिला जातो. गेली अनेक वर्षे विठ्ठल लगाडे, दत्ताभाऊ रानवडे, विनोद शिरसाट, सदिक पटेल, सुरेश फासगे ही मंडळी हा उरूस भरवतात. सध्या दीपक आबा शिरवळकर हे या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. नवी पेठेतील कित्येक वर्षे साजरा केला जाणारा उरूस श्री यशवंतमहाराज यांचा. सध्या यशवंतमहाराजांचं मंदिर हे डेव्हीड ससून अनाथ पंगूगृहाच्या आवारात आहे. शेजारीच ठोसर पागा आहे. तेथे पूर्वी घोड्यांची पागा होती म्हणून त्याला ‘ठोसर पागा’ हे नाव प्रचलित झालयं. यशवंत महाराजांची आख्यायिका अनेकजण वेगवेगळी सांगतात. पण १०० वर्षांपासून हा उरूस होत आहे, हे मात्र नक्की. पूर्वी अक्षयतृतीयेला हा उरूस होत असे. पालखी, भजनी मंडळ, नवी पेठ विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा असे छोटं स्वरूप या उरसाचे होते; पण पुढे ते वाढत गेले. पालखी, छबिना, भजनी मंडळींचा कार्यक्रम या बरोबरच तमाशा, दुसºया दिवशी कुस्त्या हे ठरलेलं. आपणास आश्चर्य वाटेल, पण सध्या जेथे पत्रकार भवन, एस. एम. जोशी फाउंडेशन शिक्षक भवन आहे, ह्या ठिकाणी पूर्वी आमराई होती. नवी पेठेतील अनेक महिला तेथे गोवºया थापण्यासाठी जात होत्या. याच आमराईत उरसाच्या दिवशी रात्री अकरापासून तमाशा होत असे. तो दुसºया दिवशी दुपारी १२-१ पर्यंत सुरू राहात असे. अनेक वर्षे स्वरूप होते. दुपारी ३ नंतर तेथेच काळ्या मातीत कुस्त्या होत. पुढे अनेक सुशिक्षीत मंडळी या भागात राहायला आली. वर्गणी देण्यासाठी ते काचकुच करत, आम्हाला तमाशा पाहण्यात रस नाही, असं सांगत, म्हणून मग बाळासाहेब गांजवे यांच्या पुढाकाराने काही वर्षे गांजवेवाडी, जोरी प्लॉट, कृष्ण हरदासपथ, नवी पेठ तालीम अशा चार ठिकाणी रस्त्यावर सिनेमा दाखवले जात. पण पुढे नंदलाल जिल्हाधिकारी असताना त्यांनी रस्त्यावर परवानगी नाकारली. त्यानंतरचा काही काळ ढोल-झांज पथकांच्या स्पर्धा गांजवे चौकात सकाळी ७ वाजेपर्यंत होत, रात्री ८ वाजता पालखी, भजनी मंडळ, बँड असे स्वरूप असे.
गांजवे, काळभोर, निंबाळकर, पवार, हगवणे, गुंजाळ, काळे, साष्टे, राजवाडे, लडकत, मानकर अशी मोजकी मंडळी यात पुढाकार घेत. काही वर्षे माझाही सहभाग होता. पुढे काही काळ हा उरूस बंद पडला होता. पुढे सुधीर काळे हे काही वर्षे उरूस भरवत असत. आता गेली ७-८ वर्षे महेश लडकत यात पुढाकार घेत आहे. दरवर्षी बँड, ढोल, झांज असे स्वरूप असते. यावर्षी मात्र ती जागा अनेक ठिकाणी डीजेने घेतली होती.
पर्वती गावात गेल्यावर तेथे चैत्र नवमीला नवलोबानाथाचा उरूस होतो. १०० वर्षांपासून ही परंपरा आजही चालू आहे. पण पूर्वीसारखे छबिना, तमाशा, कुस्त्या हे मात्र आता होत नाही. सायंकाळी नवलोबांची पालखी गावातून निघते, शेवटी मंदिरात पान-सुपारी असा मर्यादीत कार्यक्रम आता तेथे होतो. सुरुवातीच्या काळात राऊत, केंजळे, तावरे, जाधव, मानकर, बडदे इ. मंडळींनी हा उरूस सुरू केल्याचे तेथील जुनी मंडळी सांगतात. पालखी बाबासाहेब पुरंदरे यांचे दारात आली की, कितीही आजारी असले तरीही ते दर्शनासाठी न चुकता येतात. गेली कित्येक वर्षे ते हे सांभाळत आहेत. दुसरा आणखी नवलोबाचा उरूस साजरा केला जातो तो खडकमाळ आळीत. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा उरूस साजरा होतो, हा देखील १०० वर्षांपासून सुरू आहे. छबिना, तमाशा, कुस्ती हे मात्र बंद होऊन साध्या पद्धतीने रस्त्यावर विद्युत रोषणाई, पालखी, पानसुपारी असे त्याचे स्वरूप आहे. कै. दिगंबर बालगुडे, शिवाजीराव खेडेकर, केशवराव पवार, केशवराव थोरात, तुकाराम चव्हाण इत्यादी मंडळींनी हा उरूस सुरू केला असल्याचे संजय बालगुडे सांगतात. आता गुरुवार पेठेत आपण आलो की तेथे वेताळमहाराजांचा उरूस आजही होत आहे. पूर्वी गुरुवार पेठेला वेताळपेठ असेच म्हणत असत. वेताळ महाराजांची पालखी, छबिना, तमाशा असे पारंपरिक स्वरूप आता बदलले असून सांस्कृतिक कार्यक्रम, छबिना आजही चालू आहे. संजय बोलाईत, रसाळ इत्यादी मंडळी हा जुना वारसा पुढे नेत आहेत. शाहू चौकातील म्हसोबाचा उरूस अगदी शहराच्या मध्यवस्तीतून जाणाºया शिवाजी रस्त्यावर कित्येक वर्षे होत आहे. १२५ वर्षांपासून हा उरूस चालू असल्याचे जाणकार सांगतात. रस्त्यातच असलेलं म्हसोबांच ठाणं, रस्ता रुंदीकरणात हलवण्याचा निर्णय झाला; पण प्रत्यक्ष कृती करताना तेथील कामगाराचा मृत्यू झाला असं सांगतात, त्यामुळे म्हसोबाचं मंदिर आजही आहे तेथेच आहे. छबिना, पालखी, त्याबरोबरच ढोल-झांज पथकांची संख्या येथे नेहमी मोठी असते. पूर्वी हलगी, पोवाडे यांचे कार्यक्रम होत; आता सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्यांची जागा घेतली आहे. आता इकडे कसबा पेठेतही उरूसाची परंपरा अजून टिकून आहे. गावकोस मारुती मंडळ दरवर्षी तेथील म्हसोबाचा उरूस भरवत असते, त्याची स्थापना बाबूराव नलावडे यांनी ४६ वर्षांपूर्वी केली असून चार वर्षांनी त्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याचे बुवा नलावडे, भालचंद्र देशमुख हे सांगतात. अक्षयतृतीयेच्या अगोदर चार दिवस येथे कार्यक्रम होतात. एक दिवस छबिना-पालखी मिरवणूक, दुसरा दिवस ढोल-झांज पथकांच्या स्पर्धा-कीर्तन सप्ताह अजुनही टिकून आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाप्तीचा कार्यक्रम मोठा असतो. येथील उरूसाचं वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक घरातून म्हसोबादेवाला नैवेद्य हा येणारच.
(उत्तरार्ध)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)