‘शांतिदूतां’च्या त्रासानं त्रस्त झालेल्यांच्या जगात एक फेरफटका..

By अोंकार करंबेळकर | Published: February 25, 2018 07:37 AM2018-02-25T07:37:19+5:302018-02-25T07:37:19+5:30

कबुतरांबाबत सगळ्यांनाच तसा कळवळा. पण याच कबुतरांवरून देश-विदेशात वातावरण तापतंय..लोकांनी कबुतरांना खायला घालणं थांबवावं यासाठी पुणे महापालिका नियमावली बनवतेय, तर रोग प्रसारासाठी कारणीभूत ठरणाºया कबुतरांवर तिकडे आॅस्ट्रेलियाच्या खासदारबार्इंनी जोरदार मोहीम उघडलीय...

A tour of the world of troubled tragedy ... | ‘शांतिदूतां’च्या त्रासानं त्रस्त झालेल्यांच्या जगात एक फेरफटका..

‘शांतिदूतां’च्या त्रासानं त्रस्त झालेल्यांच्या जगात एक फेरफटका..

Next

गेल्या महिन्यातली गोष्ट. पुणे आणि क्वीन्सलँड. एक महाराष्ट्रातलं शहर आणि दुसरं थेट आॅस्ट्रेलियातलं राज्य. दोन्ही ठिकाणी एका विषयाने पुन्हा उचल खाल्ली तो म्हणजे कबुतरांचा माणसाला होणारा त्रास. आॅस्ट्रेलियातील जो- अ‍ॅन मिलर या खासदारबाई आजारी पडल्या आणि त्यांचा आजार चर्चेचा विषय झाला. मी आजारी पडले ते कबुतरांमुळेच, असा आरोप त्यांनी शांतिदूत कबुतरांवर केला आणि त्याविरोधात मोहीमही उघडली.
न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करावं लागल्यानं मिलरबाई चांगल्याच संतापल्या. रुग्णालयातूनच त्यांनी वर्तमानपत्रांना मुलाखती देऊन कबुतरांचा होणारा त्रास सगळ्यांसमोर मांडला. गेली दोन-तीन वर्षे आपल्या कार्यालयाच्या छतावर असणाºया कबुतरांमुळे हे सगळं झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. कबुतरांमुळे आपल्या कार्यालयातील काही कर्मचाºयांनाही याचा त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आॅस्ट्रेलिया असो वा युरोपातील विविध देश, कबुतरांच्या त्रासानं तिथं गंभीर प्रश्न झाला आहे. अन्नधान्याची नासाडी करणं तसेच विष्ठा आणि पिसांमुळे घाण करणं यामुळे या शांतिदूतांना आता फ्लायिंग रॅट्स म्हटलं जातंय.
भारतात काही फारसं वेगळं चित्र नाही. प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये कबुतरांचा उच्छाद लोकांची पाठ सोडायला तयार नाही. पुणे महानगरपालिकेने यावर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. लोकांनी कबुतरांना खायला घालणं थांबवावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे.
तसं पाहायला गेलं तर कबुतरांबद्दल सर्वसाधारणपणे एक प्रकारचा कळवळा असतो. त्यांना खायला घालणं, उडताना पाहणं यावर विशेष वेळ खर्च केला जातो. पुरातन वास्तू, स्मारकं, उंच इमारती, पुतळे, कारंजे.. असणाºया शहरांमध्ये दाणे टिपणारी कबुतरं, त्यांचे फोटो काढणारी माणसं हे साधारण चित्र असतंच. मुंबईमध्ये जीपीओसमोरील आणि दादरचा कबुतरखाना सर्वांना माहिती आहे. याशिवाय गेट वे आॅफ इंडियासारख्या ठिकाणीही या शांतिदूतांचे थवे बसलेले असतातच. असं असलं तरी मुंबईत ठिकठिकाणी किराणा मालाच्या दुकानांबाहेर आणि चौकांमध्ये त्यांना दाणे घालण्याची पद्धत दिसून येते. शहरातील या कबुतरांनी प्रत्येक इमारतीमध्ये जागा पकडल्या आहेत. बाल्कनी, पोटमाळे, एसीचे खोके, ग्रील अशा विविध जागा धरून या प्रेमवीरांनी बिºहाडं थाटली आहेत. इमारतींच्या खाली, पाइपजवळ, प्रत्येक कोपºयामध्ये त्यांच्या विष्ठेचे थर, हवेत उडणारी पिसं, त्यांचा घुत्कार, सदासर्वकाळ चालणारा त्यांचा प्रणय हे सगळं पाहिल्यावर या शहरामध्ये खरंच केवळ एकच पक्षी शिल्लक राहिलाय का, असं वाटायला लागतं. थोड्याफार फरकाने ही स्थिती प्रत्येक शहराच्या बाबतीत सारखीच आहे. चिमण्या आणि इतर पक्ष्यांची जागा झपाट्याने वाढणाºया या पक्ष्याने घेतली आहे. भाड्याने घर घ्यायचं असेल तर इस्टेट एजंट ‘फुल्ली फर्निश्ड’बरोबर बाल्कन्यांना जाळ्याही लावल्या आहेत असं उत्साहानं सांगतो. कबुतरांना आत येण्यापासून थांबवण्यासाठी लावायची ही जाळी शहरात राहण्यासाठी एक महत्त्वाची गरज झाली आहे इतका त्यांचा उपद्रव वाढला आहे. दादरच्या कबुतरखान्याजवळून जाताना कबुतरांना धान्य, चणे-फुटाणे खायला घालणारे लोकं आणि त्यांची वाढलेली संख्या जाणवायची; पण तिथे राहणाºया लोकांना किती त्रास होत असेल याबाबत कधी कोणाशी बोलणं झालेलं नव्हतं. कबुतरं आणि धुळीपासून संरक्षण करायला इथल्या बहुतांश घरांच्या खिडक्या लावलेल्याच असतात; पण रस्त्याला लागून असलेल्या डॉ. ऋतुजा बोरकरांकडे गेलो तर त्यांनी या पक्ष्याच्या उपद्रवावर धडाधड बोलायला सुरुवात केली. ‘कबुतरांमुळे आम्हाला खिडक्याच उघडता येत नाहीत. कबुतरांची विष्ठा आणि त्यांचा विशिष्ट प्रकारचा वासही सहन होत नाही. पक्षिप्रेम आणि भूतदया हे सगळं ठीक असलं तरी या त्रासाबद्दल कोण बोलणार?’
डॉक्टरांची दिशा नावाची रिसेप्शनिस्ट कबुतरखान्याजवळच राहते. ती म्हणाली, ‘आम्ही घरात सगळीकडे जाळी लावून त्यांना थांबवायचा प्रयत्न केलाय; पण लक्ष द्यावंच लागतं. काठीने कबुतरांना हाकलणं हे आजीचं कामच झालंय.’
बोरकरांच्या दवाखान्यातून बाहेर पडल्यावर फुटपाथवर चणे, धान्य विकणारा माणूस दिसला. १०, २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतचे घमेलंभर चणे कबुतरांना घालून इन्स्टंट पुण्य मिळवण्याची त्याच्याकडे सोय होती. एकीकडे चण्यानं भरलेली घमेली लोकांना फटाफट देत आणि दुसरीकडे त्यांनी दिलेल्या नोटा लाकडी पेटीत टाकण्याच्या त्याच्या कामाला एकप्रकारची लय आली होती. समोर कबुतरांचं उडणं, बसणं चाललंच होतं. भक्तिभावानं त्यांना खायला घालणं आणि मग त्यांना नमस्कारही करणारे लोक. मध्येच एका जोडप्याने दाणे टिपणाºया कबुतरांमध्ये आपल्या पोराला सोडून त्याचे फोटो काढून घेतले. आजूबाजूच्या पत्र्यांवर, कौलांवर शांतिदूतांचे हे थवे बसायचे, उडायचे पुन्हा खाली यायचे. त्यांच्या उडण्याचाही पॅटर्न असावा असं वाटलं. एखादा थवा खाली आला की दाणे टिपणारा दुसरा थवा एका विशिष्ट मार्गाने वर जायचा अशा त्यांच्या बॅचेसही असाव्यात.
तिथं जवळच्याच एका घराबाहेर सुधीर मीरकर उभे होते. एका कौलारू जुन्या, साध्या बैठ्या घरात ते राहतात. त्यांच्या घराजवळ कबुतर कसं नाही म्हटल्यावर ते म्हणाले, ‘आमच्या या घरात पूर्वी सारखी कबुतरं यायची. कौलं आणि आढ्याचं लाकूड यांच्यामधल्या अर्धाएक फूट जागेत त्यांनी बिºहाडं केली होती. धूप, धूर सगळे उपाय झाल्यावर आम्ही काठ्या आपटायला सुरुवात केली; पण अगदी जवळ जाऊन काठी आपटल्याशिवाय ते उडून जायचे नाहीत. शेवटी मी आपटबार आणले. मग त्याच्या भीतीने ते उडू लागले.’ मीरकरांनी घराच्या माडीवर नेऊन आढ्याजवळची जागाही दाखवली. ते म्हणाले, जवळच्या सगळ्या घरांनी जाळ्या लावल्या आहेत. सगळ्यांना त्रास होतो; पण फारसं कोणी बोलत नाही. कबुतरांना खायला घातल्यामुळं उंदीर आणि घुशीसुद्धा वाढल्या आहेत. परळजवळ एका मोठ्ठाल्या आॅफिससमोर कबुतरांना खायला घातलं जातं. तिथे कबुतरांबरोबर उंदीर-घुशींनीही जवळपास जागा बळकावल्या आहेत. एकदा रस्त्यावरून जाताना कबुतर आणि उंदराची झटापट सुरू होती. एका घुशीनं कबुतराची मान तोंडात पकडलेली होती. त्यांच्या त्या भांडणामध्ये जाऊन एका पोराने घुशीला हुसकावलं. कबुतराला तोंडातून टाकून घूस निघून गेल्यावर त्या पोराला आणि त्याच्या मित्रांना हायसं वाटलं. खाण्यासाठी चाललेल्या भांडणात कबुतराचा जीव वाचवून आपण काहीतरी भारी काम केलं असं त्यांना वाटलं. मला मात्र अमुक जिवालाच संरक्षण देण्याची ही सिलेक्टिव्ह पुण्याई चांगलीच खटकली होती...

कबुतरं करतात रोगांचा प्रसार!
कबुतरांच्या विष्ठेतून, पिसांमधून सतत प्रथिनं बाहेर पडत असतात. ती श्वासावाटे फुप्फुसात गेल्यामुळे हायपरसेन्सेटिव्हीटी न्यूमोनायटीस हा आजार होतो. फुप्फुसावर त्याचा परिणाम होऊन फुप्फुसातील काही भागात ते कायमचे नुकसान करून ठेवतात. औषधोपचार सुरू असतानाही रुग्ण कबुतरांपासून दूर गेला नाही तर उपचार लागू पडणार नाहीत. म्हणून रुग्णाने कबुतरांपासून दूर जाणे आवश्यक आहे. या आजारात रुग्णाला सतत कोरडा खोकला, दम लागणे अशी लक्षणं दिसू लागतात. कबुतरं आहेत म्हणून घर बदलणं हे मुंबईत तरी शक्य नाही. त्यामुळे कबुतरांनाच आपल्यापासून दूर ठेवणं सोयीस्कर.
- डॉ. अजय गोडसे, पल्मोनोलॉजिस्ट, मुंबई

कबुतरांचे अतिरेकी लाड थांबवा
बदलत्या परिस्थितीनुसार स्वत:ला कसं अ‍ॅडजस्ट करायचं हे कबुतरांपेक्षा दुसºया कोणत्याही पक्ष्याला समजलेलं नसावं. माणूस आपल्याला मारत नाही किंबहुना तो आपल्याला खायला घालतो हे कबुतरांनी ओळखलं आहे. त्यामुळे हा पक्षी चांगलाच धीट झाला आहे. कबुतरांची शिकार करणारे नैसर्गिक शत्रूही कमी झाले आहेत. गरुड शहरांमध्ये नाहीत आणि घारींचा नैसर्गिक आहार आपण बदलून टाकला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये घारी शेकड्यांनी आढळतात; पण त्या सगळ्या डम्पिंग ग्राउंडजवळ एकवटल्या आहेत. एकेकाळी शिकार करून जगणाºया घारी मृतोपजिवी (स्कॅव्हेंजर) झाल्या आहेत. सापांची संख्याही घटल्यामुळे कबुतरांना कसलीच भीती राहिली नाही. कबुतरांची संख्या कमी करायची तर आधी त्यांच्यावरचं ‘अतिरेकी’ पे्रम आणि लाड संपले पाहिजेत. अनैसर्गिक पद्धतीनं एकाच पक्ष्याची बेसुमार वाढ होणं अजिबात योग्य नाही.
- लक्ष्मीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक

(लेखक ऑनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत.)

Web Title: A tour of the world of troubled tragedy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.