मातीशी नातं सांगणारं, शेतीभान !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 04:37 PM2018-01-06T16:37:16+5:302018-01-07T07:29:41+5:30

शहरातली कुटुंबं जेव्हा मातीच्या तुकड्यावर शेती पिकवतात...

Talk to the soil, farming! | मातीशी नातं सांगणारं, शेतीभान !

मातीशी नातं सांगणारं, शेतीभान !

googlenewsNext

- संजय पाठक

शहरी जीवनातल्या सुखसोयींना सरावलेले अगदी मध्यमवर्गीय लोकही आजकाल अगदी सहज म्हणून हॉटेलात जातात. आपल्या आवडीच्या पदार्थांची आॅर्डर देतात. हॉटेलवाल्यानं आपल्याला नेमकं काय खायला घातलं आहे, यातलं काहीच ठाऊक नसताना जे काय भरमसाठ बिल येईल ते बिनबोभाट चुकतं करतात, शिवाय ‘इतकी उत्तम’ सर्व्हिस दिल्याबद्दल वेटरला चांगली टीप!
भाजीबाजारात गेल्यानंतर मात्र भाव केल्याशिवाय आपण कोणताच भाजीपाला खरेदी करत नाही.
मातीशी साºयांचंच नातं असलं तरी शहरी लोकांचं नातं तसं नावापुरतंच. शेतकºयांचं मात्र मातीशी इमान असतं. तोच त्यांचा श्वास आणि तेच त्यांचं जीवन..
मातीशी शेतकºयांचं असलेलं हे नातं शहरी लोकांना कसं कळणार? त्यातले त्यांचे श्रम त्यांना कसे माहीत होणार आणि मातीत राबल्यानंतर निर्माण झालेल्या नवचेतनेचा आनंद शहरी माणूस कसा घेणार?
मातीत हात घालण्याचा जिवंत अनुभव शहरातल्या अपार्टमेंटमध्ये राहाणाºया लोकांना मिळाला तर? त्यांना स्वत:च्या हातानं मातीत भाजीपाला पिकवता आला तर?..
शहरी भागातील लोकांना शेतीभान यावं म्हणून नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या नीलूताई नावरेकर यांच्या कल्पनेतून एक अभिनव प्रयोग राबविण्यात येतोय.
ज्या शहरी कुटुंबांना शेती करण्याचा आनंद ‘जगून’ पाहायचा होता, अशा काही कुटुंबांना काही महिन्यांसाठी भाड्याने एक गुंठा जमीन देण्यात आली. त्यात त्यांनी स्वत: राबायचं आणि स्वत:च्या घरासाठी विशुद्ध भाजीपाला पिकवायचा! अनेक कुटुंबं या प्रयोगात सहभागी झाली आणि अस्सल शेतक-यासारखी शेतात राबली. आपल्या श्रमाने भाजीपाला पिकवल्याचा आनंद त्यांना जितकं समाधान देऊन गेला त्यापेक्षा अधिक शेतक-याच्या कष्टाची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली.

शेती करणं सोपं नाही, शेतकरी किती काबाडकष्ट करतो हे आता उमगलं, असं सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. आता भाजी खरेदी करताना शेतक-याशी घासाघीस करणं आम्ही सोडून दिलं असं या प्रयोगातील महिलांनी सांगणं हे शेतीविषयी, मातीविषयी निर्माण झालेलं त्याचं नवं नातं बरंच काही सांगून जातं.

शेतीतील तांत्रिक भाग बाजूला ठेवला तरी शेतक-याने पिकवलेल्या मालाची खरी किंमत किती आणि ब-याचदा त्याला इतका अत्यल्प भाव कसा, असे प्रश्न काही शहरी ग्राहकांना पडतात; परंतु या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. शहरी भागात शेतीपेक्षा कचºयाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मोठा आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, विषमुक्त भाजीपाला यांसह अनेक विषयांवर नाशिकच्या नीलूताई नार्वेकर काम करतात. ‘निर्मलग्राम केंद्र’ ही त्यांची मातृसंस्था.

नेहमी वेगवेगळ्या कल्पना राबवणा-या नीलूतार्इंनी मे २०१७ मध्ये शहरातील नागरिकांना स्वकष्टातून सेंद्रिय भाजीपाला तयार करण्याचं आवाहन केलं. प्रतिसादाची साशंकता असल्यानं त्यांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून हे आवाहन काही ग्रुपमध्ये फिरवलं. काहींनी या प्रयोगात स्वारस्य दाखवलं. निर्मलग्राम केंद्र परिसरातील एकेक गुंठा जागा संबंधिताना अल्प दरात भाड्यानं देण्यात आली. कारण या प्रयोगात लागणारं बियाणं, पाणी तसंच शेतीची औजारं या सर्व गोष्टी केंद्रानंच पुरवल्या. विशेष म्हणजे, कोणी कितीही सधन असला तरी मजूर न लावता आठवड्यातून किमान तीन दिवस श्रमदान करणं बंधनकारक होतं.

शिवाय येथील छोटेखानी प्रशिक्षण केंद्रात सर्वांसाठी क्लासेसही घेण्याचं नियोजन करण्यात आलं. या उपक्रमात नऊ कुटुंबं सहभागी झाली. शाळा, बँक, वैद्यकीय व्यवसाय अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामात असणा-या कर्त्या पुरुष आणि महिलांनी सहभागी होऊन वाफे तयार करणं, पेरणीसह अनेक कामं केली. परंतु नाशिकमध्ये यंदा बेसुमार पाऊस झाला. पिकं पाण्याखाली गेली. काही भाज्यांचं नुकसान झालं. त्यामुळे त्यांना सावरता सावरता अनेकांच्या नाकीनव आलं. कधी पावसामुळे, तर कधी अन्य जबाबदाºयांमुळे काहींना आठवड्यातून दोन दिवस येणं कठीण होत असताना नीलूतार्इंच्या सूचना आणि आग्रहामुळे सारेच परत येऊ लागले आणि खरिपाचा पहिला हंगाम संपला.
स्वत:च्या कष्टानं कोणी वांगी, दोडकी, गिलकी, पालेभाज्या, चवळी, भेंडी असा अनेक प्रकारचा भाजीपाला पिकवला. दसरा-दिवाळीसाठी काही प्रमाणात झेंडूची फुलंही लावली. त्याला पिवळीधम्म फुलं आल्यानंतर संबंधिताना कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं.

नीलूतार्इंनी या सायांना सांगितलं, तुमच्या घराच्या आसपास असलेला दोन पोते पालापाचोळा आपल्या शेतीसाठी घेऊन या. काहींना ते अडचणीचं वाटलं. तरीही त्यांनी तो गोळा करून आणला हा कचरा सेंद्रिय शेतीत आच्छादन म्हणून कसा वापरला जातो त्याचा प्रयोग करण्यात आला. शिवाय कल्चर फवारणी, गांडूळ खताचा वापर, जमिनीत ओल कशी टिकवायची असे अनेक प्रयोगही संबंधिताना शिकवण्यात आले.
शेतीचं भान शहरी लोकांना यावं हा या प्रयोगाचा एक उद्देश, तो पूर्णपणे सफल झाल्याचं दिसतंय. हे भान साºया समाजाला आलं तर शेतकºयांच्या स्थितीची, त्यांच्या कष्टाची जाणीव होईल आणि नवनिर्मितीचा, सृजनाचा अनुभवही साºयांनाच घेता येईल...

 

‘हा’ घाम आणि ‘तो’ घाम
नाशिक शहराच्या हद्दीलगत असलेल्या गोवर्धन गावाजवळील जागा या उपक्रमासाठी प्रयोगशाळा ठरली. तेथे शेती करण्याच्या आठ महिन्यांच्या प्रयोगात लहान मुलेदेखील सहभागी झाली. शेतीची अनेक कामे करताना निसर्गाशी संवाद साधू लागली आणि त्यांनाही कष्टाचे मोल कळले. त्यातील आदित्य आठल्ये अवघा बारा वर्षांचा! सहा महिन्यांचा शेतीतला अनुभव सांगताना तो म्हणतो, एरवी येतो तो घाम वेगळा आणि शेतात काम करताना येतो तो घाम वेगळा.. नेहमी येणारा घाम चिकट असतो; परंतु शेतात काम करताना येणारा घाम शरीर-मनात एक वेगळाच गारवा निर्माण करतो. या प्रयोगातील सहभागी पंजाब नॅशनल बॅँकेतून निवृत्त झालेले रवींद्र अभ्यंकर, जयंत जोशी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी व वृषाली कुलकर्णी, शिक्षिका कामिनी पवार आणि वैशाली आठले, शालिनी बडवे आदि साºयांनीच शेती आणि शेतकºयांबद्दलचं आमचं भान पूर्णत: बदललं असं आवर्जुन नमूद केलं.
 

(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. sanjukpathak@gmail.com)

Web Title: Talk to the soil, farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.