जो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:02 AM2018-12-09T06:02:00+5:302018-12-09T06:05:06+5:30

सवंग लोकप्रियतेसाठी गावोगाव शेतकऱ्यांचे कैवारी निर्माण झाले आहेत. दुध ओता, साखर सांडा, भाजी फेकून द्या, असे अल्पजीवी आणि परिणामशून्य मार्ग चोखाळले जात आहेत, त्याने काहीही होणार नाही. क्षमतेपेक्षा जास्त, जमिनीच्या कुवतीपेक्षा आणि उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक लागवड हे शेतीतील अपयशाच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे.

Smart agriculture can make you rich, satisfy.. | जो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय !

जो स्वयेची कष्टला.. शेतीदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय !

Next
ठळक मुद्दे शेती आपल्या वाट्याला आलेला किंंवा स्वीकारलेला व्यवसाय आहे, तो आपल्यावर कुणीही लादला नाही याची जाणीव असू द्या.

- विनायक पाटील

तू बळीराजा आहेस, जगाचा पोशिंंदा आहेस, काळ्या आईचा सेवक आहेस, तुझ्याशिवाय सृष्टीचे पानही हालत नाही हे शेतकरी रंजनाचे एक टोक. तू रंजलेला आहेस, गांजलेला आहेस, तुला छळायला सगळं जग टपलेलं आहे, तू आणि तुझी शेती संकटात आहे, यातून तुझी सुटका फक्त मी, माझा पक्ष किंवा माझी संघटनाच करु शकते, बाकी सगळे झूट, तू माझ्या पाठीशी उभा रहा, मी तुला पोटाशी धरतो हे प्रचारी थाटाचे दुसरे टोक.
सत्य हे आहे की शेती हा इतर व्यवसायांसारखा व्यवसाय आहे. त्यात सतत फायदा किंवा तोटा संभवत नाही. जगाच्या पाठीवर असा एकही व्यवसाय नाही, जो सतत फायद्यात राहील.
शेती करणाºयांचे तीन प्रकार आहेत. पहिला, परंपरेने शेती वाट्याला आलेला. दुसरा, मला शेती व्यवसायातच आनंद वाटतो म्हणून शेती करणारा. तिसरा, मला शेती करण्यात आनंद नाही, पण इतर काही जमत नाही म्हणून शेती करणारा. संधी मिळाली तेव्हा शेतकºयांनी इतर व्यवसाय निवडले. ज्यांना नोकरीइतपत शिक्षण मिळाले त्यांनीही शेती सोडली. शेतीत उरले ते परंपरा म्हणून, मनस्वी आवड म्हणून किंवा अगतिकता म्हणून.
खरेतर शेतीचा संबंध सरळ निसर्गाशी येतो. निसर्ग प्रसन्न तर पिके प्रसन्न आणि पिके प्रसन्न तर शेतकरी प्रसन्न. हा झाला या व्यवसायातील एक टप्पा.
दुसरा संबंध येतो आर्थिक बाजूचा. ही बाजू सर्वस्वी बाजारपेठेवर अवलंबून असते. मागणी आणि पुरवठा याचे सरळ गणित आहे. जागतिकीकरणानंतर या व्यवसायाच्या बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे मिळणाºया भावाचा अंदाज करणे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. पूर्वी ‘मी भला, माझी जवळपासची बाजारपेठ भली’, असे धोरण होते. त्यामुळे खपाचे अंदाज बांधता येत असत. आता बाजार समित्या सुसज्ज आणि काटेकोर झाल्या आहेत. दळणवळणाची साधने अधिक कार्यक्षम झाली आहेत. पॅकिंग, स्टोअरेज आणि फॉरवर्डिंग याचा दर्जा अमुलाग्र सुधारला आहे. ग्राहकाची रुची, उत्पादनाची शुद्धता, दर्जा, व्यवस्थित पॅक केलेला, ताजा आणि घरपोच माल याच्याशी निगडीत आहे. शेतकºयांची नवीन पिढी शिक्षित आहे, उच्चशिक्षित आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध उत्पादन आणि जागतिक परिस्थितीचा त्याला अंदाज आहे. जगभर तो फिरतो. मन लावून शेती करतो. त्याला व्यापार समजू लागला आहे.
जगातील उत्तम शेती करणारा देश म्हणून भारत आज गणला जातो. आपण आता शेती उत्पादनात तुटवडा असलेल्या राष्ट्रापैकी एक नसून देशाच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन काढणारे राष्ट्र म्हणून गणले जातो. सरकारला इतकी वर्षे ‘डेफिशिएट मॅनेजमेंट’ची सवय होती. आता सुदैवाने ‘सरप्लस मॅनेजमेंट’ची वेळ आली आहे. डेफिशिएट मॅनेजमेंट पेक्षा सरप्लस मॅनेजमेंट अधिक अवघड असते. ही संक्रमण अवस्था आहे. त्यामुळे सरकार भांबावून जाणे स्वाभाविक आहे. या भांबावलेपणाचा परिणाम कृषी विषयक सरकारी धोरणांवर होत असतो. धोरणांचा परिणाम स्वाभाविकच शेतीच्या आर्थिक स्थितीवर होत असतो.
शरद जोशींचे संघटन कौशल्य, शेतकºयांना एकत्र आणण्याची क्षमता हा अपवाद सोडला तर बहुतांश शेतकºयांच्या कैवारी संघटनांचा विचार शेती व्यवसाय समजून घेण्यापेक्षा शेतकºयात संभ्रम निर्माण करणारा ठरला आहे. आता तर सवंग लोकप्रियतेसाठी गावोगांव शेतकºयांचे कैवारी निर्माण झाले आहेत. दुध ओता, साखर सांडा, भाजी भिरकाऊन द्या, शहरांची रसद तोडा असे अल्पजीवी आणि परिणामशून्य मार्ग चोखाळले जात आहेत. या मार्गांना सर्व शेतकºयांचा पाठिंंबा आहे असा आभास निर्माण केला जात आहे. त्यामुळे शेतीमाल निर्माण करणारा आणि उपभोक्ता यात दरी निर्माण केली जात आहे. शहरी आणि ग्रामीण असा भेद वाढत जात आहे. याला बºयाच अंशी प्रसिद्धी माध्यमेही कारणीभूत आहेत.
भले सरकारने मदत करु नये, परंतु किमान अडथळे तरी आणू नयेत ही शेतकºयांची रास्त आणि माफक अपेक्षा आहे. शेतीविषयक सरकारी धोरणे लांब पल्ल्याची असावीत म्हणजे शेतकºयाला काय पिकवायचे आणि किती पिकवायचे हे ठरवता येईल. उदा. पुढील पाच वर्षांकरिता कांदा निर्यात करु दिला जाईल किंंवा नाही, दुधाची भुकटी आयात केली जाईल की नाही, कृषी पुरक औषधे, खते, यंत्रसामुग्री यांच्यावरील कराचे प्रमाण काय राहील?.. हे शेतकºयांना आधीच माहीत असायला हवं.
निवडणुकांमधील विजयासाठी, ‘आम्ही तुमचे सगळे उत्पादन हमी भावाने खरेदी करु’, कृषी क्षेत्रासाठी चोवीस तास वीजपुरवठा करु, वीज फुकट देऊ’ ही सध्या अशक्य असलेली आश्वासने देऊ नयेत. बहुसंख्य शेतकºयांना फुकट आणि चोवीस तासाची अपेक्षा नाही. त्याला हवी आहे निश्चित वेळ आणि निश्चित वेळा मिळणारी दर्जेदार वीज, किफायतशीर व्याजाचे दर आणि कर्ज मिळण्यातील सुलभता.
हे सगळे असले तरी शेतीत बागायत आणि जिरायत असे भेद आहेत. बागायतीला शाश्वत पाणी आहे, त्यामुळे तेथील पीक पद्धती वेगळी आहे. जिरायतापेक्षा अधिक उत्पन्न देणारी आहे. महाराष्टÑात पाण्याचा थेंब अन थेंब अडवला तरी ३६% पेक्षा अधिक क्षेत्र बागायत होणार नाही. म्हणजे ६४% जमीन जिरायत राहाणार. बागायत, जिरायत ही तफावत उत्पादनाच्या बाबतीत प्रचंड मोठी आहे. ती मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित आहे.
तुर्तास समर्थ रामदासस्वामींचे एक वचन लक्षात ठेवावे..
‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेचि कष्टला तोचि भला॥’
चला कामाला लागूया...

शेतकऱ्यांसाठी थोडेसे...
१ शेतीला आर्थिक स्थैर्य तुमच्या कष्टातूनच येणार आहे. कोणी मसीहा येईल आणि जादूची कांडी फिरवेल ही अपेक्षा करू नका.
२ आपले अंथरुण पाहूनच हातपाय पसरा. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त, जमिनीच्या कुवतीपेक्षा अधिक आणि उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक लागवड करु नका. शेतीतील अपयशाच्या अनेक कारणांपैकी क्षमतेपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षा हे महत्वाचे कारण आहे.
३ सतत पिके बदलू नका. एका पिकावर हात बसल्यानंतर त्याच पिकात रमणे अधिक श्रेयस्कर. दहा वर्षातील नफ्यातोट्याचा विचार केल्यास पिकावरील प्रभुत्वच आपल्या पाठीशी उभे राहते. उदा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड या दुष्काळी तालुक्यातील शेतकरी जमिनीत वर्षातून एकदाच कांदा पीक घेतात. जमीन कितीही असली तरी पाणी पुरेल एवढीच कांद्याची लागवड करतात. योग्य खते आणि भरपूर कष्ट करून कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतात. वर्षानुवर्ष कांदाच पिकवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती ऊसवाल्यांपेक्षा भक्कम आहे.
४ जिरायतवाल्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीची तुलना बागायतवाल्यांशी करु नये. केवळ पावसाच्या पाण्यावर किंवा आठमाही पाण्यावर परंपरेने विकसित झालेल्या पीक पद्धतीचा स्वीकार करा. शेवटी निसर्गाशी जमवून घेऊनच शेती करावी लागणार आहे.
५ स्वयंघोषित शेतकरी नेते, संघटना आणि पक्ष यांच्या कृतीमुळे शेती व्यवसाय आणि शेतकºयांची प्रतिमा डागाळत असेल तर त्याविरुद्ध मत मांडायचे धाडस करा. या लोकांनी शेतकरी असहिष्णु आहे, आक्रस्ताळा आहे, सतत मागत फिरणारा भिक्षुक आहे अशी प्रतिमा तयार केली आहे.
६ शेती आपल्या वाट्याला आलेला किंंवा स्वीकारलेला व्यवसाय आहे, तो आपल्यावर कुणीही लादला नाही याची जाणीव असू द्या.
७ स्वत: शेतीतील कामे करण्याची सवय मोडू नका. विक्रीसाठी बाजारात, रस्त्यावर माल विकण्याचा संकोच बाळगू नका.

(लेखक शेती अभ्यासक, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: Smart agriculture can make you rich, satisfy..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.