पुणेरी कट्टा - जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 06:00 AM2018-10-14T06:00:00+5:302018-10-14T06:00:00+5:30
तांबडी जोगेश्वरी भवानीमातेचे दर्शन घेणे हे तर महिलांना फार अप्रूप असे. २-२ तास रांगेत उभे राहून दर्शन घेणं, ही रांग कधी कधी लक्ष्मी रस्ता, तर तिकडे भवानीमातेच्या दर्शनासाठी रांग नेहरू रस्त्यावर येत असे.
- अंकुश काकडे-
तांबडी जोगेश्वरी भवानीमातेचे दर्शन घेणे हे तर महिलांना फार अप्रूप असे. २-२ तास रांगेत उभे राहून दर्शन घेणं, ही रांग कधी कधी लक्ष्मी रस्ता, तर तिकडे भवानीमातेच्या दर्शनासाठी रांग नेहरू रस्त्यावर येत असे. आजही तीच स्थिती आपण पाहतो. याशिवाय कसब्यातील त्वष्टा कासार देवी, कालिकामाता, दत्तमंदिराजवळील काळी जोगेश्वरी, बोलाईमाता येथील देवींनादेखील भाविक महिला मोठ्या संख्येने येताना आपण पाहतो. नवरात्रात भोंडला, महिलांचे कार्यक्रम, अष्टमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम, हे अनेक ठिकाणी होत. आता ती संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीय, त्याची जागा आता गरबा, दांडिया यांनी घेतलीय. पण त्यात पूर्वीसारखा धार्मिकपणा राहिला नाही, काही ठिकाणांवर तर त्याचा आता इव्हेंट होऊ लागला आहे. १०-१२ वर्षांपूर्वी गरबा-दांडिया मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मोठमोठी हॉटेल्स, लॉन्समध्ये दांडिया सुरू झाला. तेथे कुणीतरी सेलिब्रेटी आणणे, तेथे भरमसाठ प्रवेश फी सर्वसामान्यांना ते न परवडणारे, शिवाय तेथे येणारी मुलं-मुलीदेखील उच्चभ्रू वर्गातील पण आता तेही बंद होऊ पाहत आहे. आबा बागूल यांनी सहकारनगर येथे स्थापन केलेली श्री महालक्ष्मीमाता, सुंदर हेमाडपंथी मंदिर, मंदिरात दररोज पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम याबरोबरच १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे उत्सवाचं वैशिष्ट्य आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे. गेली २४ वर्षे सातत्याने अतिशय उच्च दर्जाचे, नामवंत कलावंतांचे नृत्य, संगीत आता जयश्री बागूल महिलांचे कार्यक्रम, पाककला, महिलांच्या स्पर्धादेखील त्यांनी सुरू केल्या आहेत. देशातील अनेक दिग्गज कलावंत आणि त्यांचे मोफत कार्यक्रम पाहण्याची दुर्मिळ संधी, त्यामुळे गर्दी अलोट. पूर्वी हे कार्यक्रम तेथेच होत, आता गेली १४ वर्षे हे सर्व गणेश कला, क्रीडा मंच येथे होतात. अनेक सर्व राजकीय पक्षनेत्यांचीही उपस्थिती या उत्सवाला दरवर्षी लाभते.
सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात होणारी देवीची पूजा, मंदिराची विद्युत रोषणाई तसेच पहाटे अभिषेक अगदी धार्मिक वातावारणात होतात. पण गेल्या १०-१५ वर्षांत चौका-चौकात मांडवात देवीची स्थापना होऊ लागली. आयता गणपती उत्सवाचा मांडव आणि मग त्यात देवीची स्थापना, अनेक ठिकाणी देवीचं पावित्र्यदेखील पाळलं जात नाही. केवळ तरुणांनी एकत्र यावं, नाच-गाणी एवढंच त्याचं स्वरूप. त्यात भर पडली ती देवीच्या तोरणांची. तोरणांच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून मोठमोठे डीजे लावणे, सिनेमांची गाणी आणि त्यावर अचकट विचकट नाच, देवीचा उत्सव आणि गाणं मात्र मुंगळा मुंगळा, शांताबाई. तसेच वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे हा कसला उत्सव असं म्हणण्याची वेळ आली होती; पण तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ही तोरण मिरवणूक पूर्णपणे बंद केली, तरी अजूनही काही महविद्यालयांतील तरुण भरदुपारी अशी तोरण मिरवणूक काढतात. पण यावेळी उच्च न्यायालयाच्या बंदीमुळे काय होतं ते पाहूया! पण याशिवाय अनेक खासगी ठिकाणी देवीचे उत्सव होतात. तेथे धार्मिकपणा सांभाळला जातो, पावित्र्य राखले जाते. काही सार्वजनिक संस्था या निमित्ताने महिलांचे कार्यक्रम आयोजित करतात. पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भोंडला, घागरी फुंकण्याचा कार्यक्रम, दररोज देवीचा साडीचा रंग त्याप्रमाणे पोषाख करणे महिलांना अपेक्षित असते. आता तर वर्तमानपत्रात त्या रंगाच्या पोषाखाचे फोटो छापून येऊ लागलेत. त्यामुळे त्यासाठी त्या-त्या रंगाचे कपडे घालण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आता पुणे हे पुणे राहिले नाही तर ते ‘Global Pune’झालंय. त्यामुळे या उत्सवातील पारंपरिक मजा लोप पावली आहे, याला काही इलाज नाही.
(उत्तरार्ध)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-
सामाजिक कार्यकर्ते आहेत.)-