निमित्त- समतेचा मंत्र देणारा संत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 06:00 AM2019-02-17T06:00:00+5:302019-02-17T06:00:10+5:30
आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे...
- डॉ. राम आबणे-
आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे. अजूनही कित्येकांना घर नाही, निवारा नाही, वस्त्र नाही, पुरेसे अन्न नाही. राज्यकर्ते आपापल्याच राजकारणात गुंग आहेत. म्हणून आजच्या काळात संत रोहिदास (इ.स. १३७६ ते १५२७) यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांच्या विचारांची गरज आहे.जाती-जातींत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त..
भक्तीची ध्वजा दक्षिणेतून हाती वागवत आचार्य रामानंद उत्तरेला प्रकटले आणि भेदाभेदांनी भग्न झालेल्या भयग्रस्त समाजमनास भक्तीचा आधार लाभला. रामानंदांच्या उदार वृत्तीत सारा समाज संघटित करण्याचे सामर्थ्य होते. उच्चनीचता, कृत्रिम बंधनांना झुगारून स्वामी रामानंदाचे संत सांगाती आत्मविश्वासाने पुढे सरसावले आणि भक्तीची चळवळ सगळीकडे सुरू झाली. उच्चनीचता या बंधनांना त्यांनी झुगारले. कोष्ट्याचा कबीर दुर्दम्य आत्मबलाने बोलू लागला. कसायाघरचा सदन टाळ-मृदंगाच्या गजरात रंगून गेला. धना जाटाची ब्रह्मानंदी टाळी लागली आणि संत रोहिदास भक्तीची बानी व दोेहे आाणि सारखी गाऊ लागला. या सर्व संतांची भक्ती पाहून सारा समाज त्यांचा जयजयकार करू लागला.
शील, कर्तृत्व आणि उच्च प्रतीचा भक्तिभाव यामुळे रोहिदास संतपदाला पोहोचले. त्यांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला. संत कबीर आणि गुरू नानकजी हे गुरू रोहिदासांचे समकालीन होते. गुरू रोहिदासांना कबीर गुरू व मोठे बंधू मानावयाचे गुरू गोरखनाथ व गुरू नानक हे रोहिदासांची कीर्ती ऐकून स्वत: त्याच्या भेटीस आले होते. नानक स्वत: संत रोहिदासांची गीते, भजने म्हणत असत. शीखांचा पवित्र ग्रंथ गुरुसाहिबमध्ये संत रोहिदासांची चाळीस पदे असून, त्यांच्या विचारधारेला या ग्रंथात आदराचे स्थान दिले आहे. सद्गुरू रोहिदासांची वाणी ही ब्रह्मज्ञानाचे विशाल असे भांडार आहे, की जे भारतीय समाजाला प्रकाश देणाºया गोळ्याचे कार्य करते.
रोहिदासांचा काळ हा धर्मग्लानीचा होता. बहुतेक हिंदू राज्ये परधर्मीय आक्रमकांनी खालसा झाली होती. यज्ञयाग, व्रतवैकल्ये, जपजाप्य एवढ्यापुरतेच धर्मभावनेचे क्षेत्र आकुंचित बनले होते. कर्मठपणाचे अवास्तव बंड माजल्यामुळे नैतिक मूल्यांची चहाड राहिली नव्हती. उच्चवर्गीय सुखासीनतेची व भोगविलासाची प्रवृत्ती वाढली होती. अशा वेळी रोहिदासांना वाईट वाटले. जनतेच्या दु:खाला आपल्या शांत वाणीने सुखी करण्याचा आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणतात,
ऐसा चाहौ राज मैंै, जहां मिलैै सब कौ अन्न।
छोटे बडे सभ सम बसैै, रोहिदास रहैै प्रसन्न।।
मला या देशात अशी व्यवस्था, असे राज्य हवे आहे, जेथे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे. लहान-मोठे सगळे एकाच पंक्तीत बसायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हाच मला प्रसन्नता लाभेल, असा समाजवादाचा सिद्घांतच त्यांनी दिला. सद्गुरू रोहिदास यांची महत्ता अशी, की त्यांनी सर्वप्रथम नारीजातीला समान हक्क दिले आणि मानवतेच्या विरुद्घ विचारांना विरोध केला. नारीला भक्ती करण्याचा अधिकार नाही, असा समज त्या वेळेस होता. स्त्री-पुरुष समानता नव्हती. संत रोहिदासांच्या तत्कालीन अनेक राजघराण्यांतील राण्या त्यांच्या शिष्या बनल्या होत्या. यामध्ये मीराबाई, राणी झाला आदींचा समावेश होता. मीराबाईस सती जाण्यापासून परावृत्त करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. थोडक्यात, त्यांचा सतीप्रथेस विरोध होता. संत रोहिदास हिंदू-मुसलमान या दोन्ही धर्मांना समान मानत होते. ते म्हणत-
मंदिर मसजिद दोऊ एकं हैै,
इन मंह अंतर नाही।
रोहिदास राम रहमान का,
झगडड कोड नाहि।।
संत रोहिदासांच्या विचारधारेवर प्रभावित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संत रोहिदास यांचा अतिशय भक्तिपूर्ण असा पोवाडा लिहिला आहे. अशा वंदनीय संत रोहिदासांच्या सामाजिक विचारांना पुढे नेण्याची गरज आहे.
(लेखक संतसाहित्याचे अभ्यासक असून, त्यांनी देशात सर्वप्रथम संत रोहिदासांवर पीएच. डी. मिळवली आहे.)