प्रेम आणि विश्वास; दलाई लामांच्या भेटीतून उलगडलेलं नैतिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:00 AM2017-09-24T02:00:00+5:302017-09-24T02:00:00+5:30
‘‘माणसं आत्मकेंद्री होत चालली आहेत. असुरक्षिततेची भावना वाढते आहे. मन:शांती, अनुकंपा आणि सहिष्णुता या गोष्टी तर पार दिसेनाशा होताहेत. प्रार्थना आणि जप हा त्यावरचा उपाय कसा असणार? आपल्या आयुष्यातून हरवत चाललेल्या मूल्यांचं बोट जर आपण पुन्हा पकडलं, तर येत्या काळात हे चित्र परत बदलू शकेल..’’
- शालिनी गुप्ता
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या काही विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ धर्मगुरु दलाई लामा यांची धरमशाला येथील त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. त्या भेटीचा हा अनुभव...
दलाई लामांची भेट हा आमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण होता. सॅन दिएगो विद्यापीठातले काही विद्यार्थी आणि मुंबई, दिल्ली, बेंगळुरूवरून आलेले आमच्यासारखेच काही पर्यटक यांना तिबेटी धर्मगुरु दलाई लामांना ऐकण्याची, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. सप्टेंबर महिन्यातल्या ६ तारखेला धरमशाला इथे आमची दलाई लामांसोबत भेट झाली.
मंदिरात प्रवेश केल्यापासून लामा तेन्झिंग हे खास आमचे ‘गाइड’ बनले होते. लामा तेन्झिंग हे सॅन दिएगोहून आलेले ‘शांतिदूत’ होते. त्यांनीच काही परदेशी विद्यार्थी आणि आमच्यासाठी दलाई लामांची वेळ घेतली होती. मंदिराचा परिसर, प्रतीक्षा कक्ष तर शांत होतंच. पण एरवी कटकटीचा वाटणारा सिक्युरिटी चेकसुद्धा शांततेचा आल्हाददायक अनुभव देत होता. आमच्या अनिर्बंध आनंद आणि उत्साहाला आवर घालण्याचं काम इथल्या सुरक्षा यंत्रणांनी चोख केलं. माझी २३ महिन्यांची मुलगी या सगळ्या चमूतला सगळ्यात छोटा सदस्य. तिच्या लहरींमुळे ती माझ्या चिंतेत भर घालतच होती. पण तिची छोटी बॅग आणि इतर लहान-मोठं सामान घेऊन आत जायला सुरक्षाव्यवस्था सांभाळणाºया लोकांनी मला मदत केली. दलाई लामांची वाट पाहण्यात घालवलेल्या तासाने मला माझ्या मुलीला शांत करण्याचे वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रकार शिकवले. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण आपल्या तीन अत्यंत विश्वासू मदतनीसांसोबत दलाई लामांनी खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर वातावरणात त्यांच्याविषयीचा आदर आणि शांतताच भरून राहिली होती. मात्र मधूनच माझ्या लहानग्या मुलीला येणाऱ्या उमाळ्यांनी त्या शांततेचा भंग होत होता. शेवटी मी तिला घेऊन खोलीच्या बाहेर बसायचंच ठरवलं. कारण त्यामुळेही मला तिच्या सोबत राहूनही दलाई लामांना ऐकता आलं असतं आणि आतही शांतता राहिली असती.
‘बंधू आणि भगिनींनो’ असं संबोधून त्यांनी बोलायला सुरु वात केली. त्यांच्या शांत, धीरगंभीर आवाजानं ती खोली भारून गेली. त्यांनी भिंतीवर लावलेल्या नालंदाच्या १७ शिक्षकांच्या चित्रांकडे निर्देश केला. तिबेटमधला बौद्ध धर्माच्या शिक्षणाला आकार देणारे महत्त्वाचे प्रबंध त्यांनी लिहिले होते. सांस्कृतिकदृष्ट्या चीन जवळचा असला तरी, तिबेटच्या धर्मगुरुंनीही बौद्ध संस्कृती आणि धर्माचं मूळ म्हणून नेहमी भारताकडेच पाहिलं असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
‘‘भारतातच या धर्माचा, त्यासंबंधीच्या ज्ञानाचा उगम झाल्याने आम्ही भारताकडे आमचं आध्यात्मिक आश्रयस्थान, निवारा म्हणूनच पाहतो. म्हणूनच या भूमीतल्या प्राचीन ज्ञानाचं पुनरुज्जीवन करणं ही माझी बांधिलकी मानतो. तिबेटमधल्या बौद्ध विहारांमध्ये दहा हजार भिक्खू आणि भिक्खुणी आहेत. नालंदा विद्यापीठामध्ये लिहिले गेलेले प्रबंध समजून घेणं, त्यांचा अन्वयार्थ लावणं हे त्यांचं मुख्य काम आहे.’’ भारतातल्या प्राचीन ज्ञानपरंपरेबद्दल बोलतानाच दलाई लामांनी भारताशी आपलं त्यापलीकडेही जाऊन असलेलं नातं स्पष्ट केलं. दलाई लामांनी १९५९ मध्ये हिमाचल प्रदेशमधल्या धरमशालामध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळेच मी इथल्या दाल, रोटी आणि सब्जीनेच तृप्त झाल्याचं मिस्कीलपणे सांगून आपण स्वत:ला ‘भारताचा पुत्र’ मानत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या या विधानात कोणताही राजकीय संदर्भ नाही. त्यातून केवळ भारताशी असलेलं भावनिक नातं सांगण्याचा प्रयत्न आपण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भारताशी असलेल्या या भावबंधामुळेच त्यांनी प्राचीन भारतीय परंपरांबद्दलचा आपला आदर, बांधिलकी व्यक्त केली. त्यातही नालंदा विद्यापीठातल्या शिक्षणपद्धतीतल्या अनेक गोष्टींची आपल्याला आजही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘नालंदातल्या शिक्षणात भावनांना कसं हाताळायचं, त्यावर कसं नियंत्रण मिळवायचं हेदेखील शिकवायचे. आज समाजात दहशतवाद, हिंसाचार यांसारख्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांचं कारणच भावनांना योग्य प्रकारे हाताळता न येणं हे आहे. माणसं स्वकेंद्रित होत चालली आहेत आणि त्यामुळं त्यांच्यातली असुरक्षिततेची भावनाही वाढत आहे. मन:शांती, अनुकंपा आणि सहिष्णुता लोकांच्या आयुष्यातून गायब होतीये. केवळ प्रार्थना आणि जप करून या गोष्टींवर उपाय सापडणार नाही. त्यासाठी आपल्याला अजून सक्रि य होऊन प्रयत्न केले पाहिजेत. प्रेमातून एकमेकांबद्दल येणारा विश्वास आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दलची कळकळ ही वाढत्या असुरक्षिततेला उत्तर आहे’, असं त्यांचं म्हणणं होतं. रचनात्मक भावना वाढीस लागल्या की त्याच्या विरोधी भावना कमी होतात. म्हणजे प्रेम वाढीस लागलं की राग कमी होतो. अनुकंपा वाढीस लागली की द्वेष कमी होतो. म्हणूनच सकारात्मक भावना वाढीस लावणं गरजेचं आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
लोकांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागण्यामधली धर्म आणि धार्मिक संस्थांची भूमिका यांविषयीही दलाई लामा मोकळेपणाने बोलले. खरा धर्म हा धार्मिक संस्थांकडून सांगितल्या जाणाºया धर्मापेक्षा वेगळाच असतो. त्यामुळेच धर्म विरु द्ध धर्मसंस्था असा संघर्ष निर्माण होतो. हरयाणामध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा रामरहीम यांच्या अटकेनंतर जो हिंसाचार उफाळला त्याचं उदाहरणही दलाई लामांनी आपल्या सांगण्याला पुष्टी देण्यासाठी दिलं. इथे धर्माचा वापर स्वार्थासाठी आणि शोषणासाठी झाल्याचं त्यांनी म्हटलं. पण कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही. प्रेम आणि सहानुभूती शिकवतो. म्हणूनच खरा धर्म काय आहे हे जाणून घेतलं, तर आयुष्यातली नकारात्मकता कमी व्हायला मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दलाई लामांनी साधलेल्या संवादानंतर विद्यार्थ्यांनीही मोकळेपणानं दलाई लामांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना हवामान बदलापासून धर्मनिरपेक्षता, मूल्यशिक्षण, धार्मिक श्रद्धा अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले. हवामान बदलासारख्या विषयावर बोलताना त्यांनी आपल्यालाही पर्यावरणाचं संवर्धन व्हावं असं वाटतं; पण आपण त्यातले तज्ज्ञ नसल्याचं प्रांजळपणानं सांगितलं. पण तरीही पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी आपण छोट्या-छोट्या गोष्टींचं पालन आवर्जून करतो. मी बाथ टबमध्ये कधीच आंघोळ करत नाही. मला वाटतं की पाणी वाचवण्याचा माझ्याकडून तेवढाच छोटासा प्रयत्न... त्यांनी मोकळेपणानं आपला छोटासा प्रयत्न सर्वांसोबत शेअर केला. दलाई लामांनी आपल्या भाषणात धर्म, त्याचा बºयाचदा चुकीच्या पद्धतीनं लावला जाणारा अन्वयार्थ याबद्दल भाष्य केलं होतं. त्या मुद्द्याला धरूनच त्यांना धर्मनिरपेक्ष शिक्षणाविषयीचं त्यांचं मत विचारलं. उच्च शिक्षणामध्ये धर्मनिरपेक्ष मूल्यं शिकवणाºया कार्यक्र मांचा समावेश करणं हे खरोखरच उत्तम आहे. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या अशाप्रकारच्या अभ्यासक्र माचाही यासंदर्भात उल्लेख केला. इमोरी विद्यापीठातही सेक्युलर एथिक्सचा अभ्यासक्र म विकसित करणं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
धर्मनिरपेक्ष मूल्यांसोबतच शिक्षणामध्ये नैतिक मूल्यांचा समावेश करणंही गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पूर्वीच्या काळी लोकांसाठी धर्म हा मूल्यांचा मूलभूत स्रोत होता. पण आजच्या काळात आयुष्यातलं धर्माचं महत्त्व कमी होत चाललं आहे. वैज्ञानिक तथ्यांऐवजी मानवी अनुभव आणि सहज जाणिवांवर आधारित मूल्य शिक्षणाचा प्रसार करणं ही आजच्या काळाची गरज आहे. या मूल्यांचा शिक्षणपद्धतीत समावेश केला तर अवघ्या वीस वर्षांत लोकं अधिक सहिष्णू आणि अनुकंपायुक्त होतील, असा दावाही दलाई लामांनी केला. विसाव्या शतकात या जगाने खूप हिंसाचार आणि राष्ट्रवादाचा उन्माद अनुभवला. पण मूल्यांचं शिक्षण एकविसाव्या शतकात शांतता घेऊन येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या काळात धार्मिक तेढ वाढत असताना इतर धर्मांबाबतची सहिष्णुता कशी वाढीस लागेल, या प्रश्नावर याचं उत्तर अतिशय सोपं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या परंपरांचं जतन करणं आणि दुसºयांच्या परंपरांमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं यातूनच आपण आपल्या आणि इतरांच्या धर्माचाही आदर करायला लागतो. आनंदाचा मुख्य स्रोत प्रेम आणि सहानुभूती आहे. या दोन गुणांनी आपण दुसऱ्यांच्या श्रद्धांचाही सन्मान करतो, असं त्यांनी सांगितलं. जवळपास पाच तास चाललेल्या या संवादाचा याच मुद्द्यावर समारोप झाला. दलाई लामांच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारून गेलो होतो. त्यांच्याशी झालेली ही भेट आणि त्यांनी आमच्याशी साधलेल्या संवादाने आम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेमाच्या उबदार वातावरणाचा एक अनुभव होता, जो आमच्यापैकी कोणीही, कधीही विसरू शकणार नाही.
(लेखिका लोकमतमध्ये व्हाईस प्रेसिडेंट, ब्रॅण्ड अॅण्ड कम्युनिकेशन, या पदावर कार्यरत आहेत.)