दाऊद...पलायन करणा-या कासकरांच्या छोक-यावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:00 AM2017-12-03T03:00:00+5:302017-12-03T03:00:00+5:30

वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाला लुबाडून पलायन करणाºया कासकरांच्या छोकºयावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली?

Dawood ... why did the time of the 'Kasperseck' fleece 'be depressed'? | दाऊद...पलायन करणा-या कासकरांच्या छोक-यावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली?

दाऊद...पलायन करणा-या कासकरांच्या छोक-यावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली?

Next

रवींद्र राऊळ

दाऊद इब्राहिम कासकर.
डोंगरीत राहाणाºया पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर यांचा हा मुलगा.
...अंडरवर्ल्डचा डॉन होण्यापर्यंतचा त्याचा व्यक्तिगत प्रवास चक्रावून टाकणारा आहे.
डोंगरीतल्या टेमकर मोहल्ल्यातील गुंड ते माफिया डॉन आणि त्यानंतरचा जागतिक दहशतवादी घोषित होण्यापर्यंतची मजल त्याने गाठली...
आणि आता निद्रानाशाने पछाडलेल्या अवस्थेत नैराश्याने घेरला गेला आहे.
मुंबईच्या रस्त्यावर प्रतिस्पर्धी गुंडांसोबत हाणामाºया करीत त्याचे ‘‘करिअर’’ सुरू झाले. भाऊ साबीर याच्यासोबत त्याने आपली टोळी तयार केली. सडकछाप गुंड असला तरी ‘पोलीसवाल्याचा पोरगा’ म्हणून तो डोंगरी पोलीस ठाण्यातल्या अधिकाºयांच्या नजरेला नजर देऊन बोलत असे. अनेकदा पोलीस अधिकाºयांना गुंडांच्या खबºया देण्याचंही काम त्याने केलं. नूरबाग, टेमकर स्ट्रीट, जे.जे. जंक्शन हा त्याचा फिरण्याचा एरिया होता. पठाण टोळीतले गुंड त्याचे कट्टर दुश्मन होते. पठाण टोळीसोबत त्याची मांडवली करणाºया हाजी मस्तानलाही तो जुमानेसा झाला.
मुंबईच्या अधोजगताचा हा अधोनायक आपली टोळी केवळ मुंबईतच पसरवून थांबला नाही. त्याने आपल्या टोळीचं जाळं पद्धतशीरपणे मुंबईनंतर भिवंडीसारख्या लहान लहान शहरात पसरवलं. (भिवंडीचा तत्कालीन नगराध्यक्ष जयवंत सूर्यराव हाही दाऊदच्या गुंडांना आसरा देण्याच्या आरोपाखाली टाडाअंतर्गत अटकेत होता.)
ऐंशीच्या दशकापासून मुंबईतील लोकसंख्या आणखीनच अफाट वेगाने वाढत गेली आणि इथल्या जमिनींवरून हाणामाºया सुरू झाल्या. तेथूनच दारू, मटका अड्डे यात असलेल्या टोळ्यांचं लक्ष रिअल इस्टेटकडे वेधलं गेलं. बिल्डरांमधील वाद मिटवणं, जागा बळकावणं, जमिनीवरील झोपडीधारकांना पिटाळून जागा रिकाम्या करून बिल्डरच्या हवाली करणं, भूखंडांचं संरक्षण करणं हा टोळ्यांचा उत्पन्नाचा स्रोत बनला. दाऊदची टोळी सिक्युरिटी एजन्सीच्या नावाखाली अशा कारवाया करू लागली. कारण इतर किरकोळ अवैध धंद्यांपेक्षा यात अधिक कमाई होती.
नागपाडा भागातील अनेक दुकानांबाहेर भलत्याच पाट्या लावून दाऊदची माणसं आत बिल्डर, व्यापाºयांमधील स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वाद मिटवून मलिदा लाटत असत. सुरुवातीला दाऊद टोळी पोसली गेली ती रिअल इस्टेटमधल्या भानगडींवरच. जोगेश्वरीतील एका भूखंडाच्या वादातूनच दाऊदचं रमा नाईकशी बिनसलं आणि पुढचा गँगवारचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
उद्योजक, व्यापाºयांमधील वाद मिटवण्यातही या टोळीचं प्रस्थ सर्वाधिक आहे. गुटखा कंपनीचा एक मालक तर काही वर्षांपूर्वी आपला वाद मिटवण्यासाठी थेट कराचीत जाऊन दाऊदला भेटला. तेथे दाऊदने वाद मिटवण्याच्या बदल्यात पाकिस्तानात गुटख्याची कंपनी सुरू करून देण्याची बोली केली होती, असं पोलिसांना आढळलं. या जोडीला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी होतीच.
मुंबई विमानतळावर होणाºया सोन्याच्या स्मगलिंगने तर या टोळीला सुगीचे दिवस दाखवले. विमानतळावर लोडर म्हणून दाऊदचीच माणसं कामाला लागत. छुप्या मार्गाने येणारं सोनं हे लोडर कचºयात फेकून देत आणि हा कचरा विमानतळाबाहेर गेला की त्यातून काढून घेत. पुढे इस्ट-वेस्ट एअरलाइन्स या विमान कंपनीत दाऊदचीही गुंतवणूक होती, असं म्हटलं जातं. त्यातूनच या कंपनीच्या ताकीउद्दीन वाहिद यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.
हा गुन्हेगारी कारभार त्याने कसा वाढवला याचं कुतूहल सर्वांनाच आहे. अतिशय धूर्त, चाणाक्ष, सहजासहजी विश्वास न ठेवण्याचा स्वभाव, कारवायांचा बारीक अभ्यास आणि कमाईचे नवनवे स्रोत शोधून काढण्याचं कौशल्य, हे गुण चुकीच्या ठिकाणी वापरत तो माफिया डॉनच्या गादीवर बसल्याचं म्हटलं जातं. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर पकड बसवण्यासाठी पठाण टोळीसोबत झुंजणाºया दाऊदने १९८६ साली मुंबईतून पलायन केलं आणि दुबई गाठली.
मुंबईत आपलं जाळं पसरवण्यासाठी त्याने राजकारणी आणि पोलिसांची मदत घेतली. पुढे हेच सूत्र त्याने इतर देशातही वापरलं. दुबईत बसलेला दाऊद महाराष्ट्रातल्या नेत्यांना लिलया खेळवत होता. अगदी आपल्याला अटक करण्यात येणार ही बातमीसुद्धा त्याला मंत्रालयातून समजली आणि त्याने दुबईला पळ काढल्याचं त्याचे परिचित सांगतात. मुंबईत त्याचा जनसंपर्क अधिकारी होता सतीश राजे. त्याच्यामार्फतच त्याने अनेक राजकारण्यांशी जवळीक साधली होती. सतीश राजेमुळे दाऊद शक्तिशाली होत असल्याचं ओळखूनच अरुण गवळी टोळीने पुढे राजेची भायखळा येथे हत्या केली. पोलीस खात्यातील अनेक बडे अधिकारी तर त्याच्या ‘पे रोलवर’ होते. तो दुबईत व्हाइट हाऊस बंगल्यात राहात असताना राष्ट्रपतिपदक विजेता एक अधिकारी कायम त्याच्या संपर्कात असे. आता भाई बेडरूममध्ये असेल, की ड्रॉर्इंग रूममध्ये याचा अंदाज बांधून तो तिथल्या लॅण्डलाइनवर फोन करून येथील घडामोडींची माहिती त्याला देत असे. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत त्याचं नाव येईपर्यंत अनेक पोलीस अधिकारी बिनधास्तपणे आणि उघडपणे त्याच्याशी संपर्क साधत असत. दुबईत तर तो आपण मुंबईचे व्यापारी म्हणूनच मिरवत असे. तेथील शेखना खूश करण्याचं तंत्र त्याने हेरलं होतं. म्हणूनच त्याच्याबद्दल मुंबईतून येणाºया बातम्यांकडे तेथील शेख दुर्लक्ष करीत असत. दुबईत त्याने जेमतेम सात वर्षे काढली; पण इतक्या अल्पावधीत त्याने टोळीचा कारभार अगदी भारतभरच नव्हे तर एक डझन देशांमध्ये पसरवला. आजमितीस भारताप्रमाणेच पाकिस्तान, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, मोरक्को, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया, सिंगापूर येथे पसरला असल्याचं सांगण्यात येतं.
लहानलहान नद्या जशा समुद्राला येऊन मिळतात तशा अनेक लहानमोठ्या टोळ्या त्याने आपल्या टोळीशी जोडल्या. मुंबईत भांडूपची थापा गँग, गरमखाड्याची बाबा गुडे गँग, मंचेकर गँग त्याच्या इशाºयावर काम करीत होत्या तर उत्तर भारतातील बब्लू श्रीवास्तव टोळीपासून नदार गँगपर्यंत जवळजवळ सगळ्याच टोळ्या त्याच्यासाठी राबत होत्या. गवळी चाळिशी पंगा घेण्याआधी तर रमा नाईक गँग आणि त्यानंतरही छोटा राजनची गँगही त्याच्या कारवायांमध्ये सहभागी होत होतीच की. गवळी टोळीचा नंबर एकचा शत्रू असलेला दाऊद कधीकाळी दगडी चाळीत आपल्या साथीदारांना भेटायला आला की न चुकता चाळीतील मावशीची ख्यालीखुशाली विचारायचा, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही.
गुन्हेगारी कारवाया करणाºया आपल्या टोळीला त्याने एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणे स्वरूप दिलं. सगळ्या जबाबदाºया त्याने वाटून दिल्या. कुणाला खंडणी उकळण्याचं, कुणाला सुपारी घेऊन हत्या करण्याचं, कुणाला अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट चालवायचं तर कुणाला प्रॉपर्टी डिस्पुट सोडवण्याचं.. अशी कामं त्यानं निरनिराळ्या लोकांवर सोपवली आणि स्वत: केवळ मॉनिटरिंग करायचं काम केलं. त्याची ही पद्धतच त्याच्या टोळीचा डोलारा पसरवू शकली, असं अंडरवर्ल्डमध्ये मानलं जातं. म्हणूनच त्याच्या सरदारांच्या यादीत छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन, फिलू खान, इक्बाल मिर्ची, मुन्ना झिंगाडा, फिरोज कोकणी, शरद शेट्टी, सुनील सावत्या, माया डोळस, दिलीपबुवा कोहक अशा एकापेक्षा एक नामचिन गुंडांचा समावेश होता. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात दाऊदने शिरकाव केला की, पोलीस सोडाच, कस्टम, सेल्स टॅक्स, एक्साइज, इन्कम टॅक्स येथपासून सीबीआयपर्यंतच्या सगळ्या विभागांच्या फायलींमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दाऊदचा संबंध येतोच. मुंबईत अमली पदार्थांच्या स्मगलिंग आणि विक्रीत दाऊद टोळीचाच वरचष्मा आहे. या टोळीचा हा धंदा सांभाळणारा फिलू खान याची सिंगापूरमध्ये निर्घृणपणे हत्या झाली. त्या प्रकरणाचा वेध घेताना पोलिसांना अमली पदार्थांच्या धंद्यात ही टोळी किती मुरलीय याचा अंदाज आला. मुंबईत येणारे अंमली पदार्थ याच टोळीच्या छत्रछायेखाली येतात आणि विकलेही जातात. १९९३ मध्ये दाऊदने आयएसआय या पाकिस्तानी हेर संघटनेशी हातमिळवणी करीत मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले आणि त्याचा प्रवास माफिया डॉनपासून दहशतवादी म्हणून सुरू झाला. त्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जण मृत्युमुखी पडले, तर ७१७ जण जखमी झाले.
ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्याने दुबईतून पाकिस्तानात धाव घेतली आणि त्याचे भारतातील परतीचे मार्ग बंद झाले. दाऊदला फरफटत भारतात आणू, असे राज्यकर्ते केवळ म्हणत राहिले आणि भारताला वाकुल्या दाखवत दाऊद पाकिस्तानात सेटल झाला.
राजकारणी आणि प्रशासनातील बड्या अधिकाºयांना हाताशी धरलं की सारं काही सुरळीत होतं, याबाबत त्याचं मत अधिकाधिक दृढ होत गेलं असावं. कारण मुंबईतला हा फंडा त्याने जसा दुबईत वापरला तसा तो अधिक प्रभावीपणे पाकिस्तानातही वापरल्याचं दिसतं. किंबहुना पाकिस्तानात ते त्याला अधिकच सोप गेलं असावं. कारण एकीकडे पाक हेर संघटना त्याला आश्रय आणि संरक्षण देत असताना दुसरीकडे दाऊद तेथील राजकारण्यांना आणि सरकारी अधिकाºयांना खेळवत आहे.

संपत्तीचा हव्यास असलेल्या दाऊदने पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी आणि बºयाच प्रमाणावर विविध उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचं तपास यंत्रणांना आढळलं आहे. कराचीतील क्लिफ्टन भागात राहाणाºया दाऊदने मुलगा मोईन याच्या नावाने मोईन पॅलेस ही इमारत बांधली आहे. खवयाबाने शमशीर एरिया आणि कराचीतील हायवेवर शाह राहे फैजल येथे त्याच्या इमारती आहेत. याव्यतिरिक्त लाहोरमधील मदिना मार्केट आणि पेशावर जवळील ओर्काझाई येथेही घरे आहेत. पाकमधल्या सेहगल ग्रुपमध्येही त्याची मोठी गुंतवणूक आहे. भाताच्या गिरण्याही त्याने सुरू केल्या आहेत. दाऊदबद्दल पसरलेल्या अनेक कहाण्या कितपत खºया आहेत हे उघडकीस येणं कठीण आहे. पण तपास यंत्रणा माग काढत असताना दाऊद आता केवळ माफिया डॉन राहिलेला नसून तो दहशतवादी झाल्याचं आढळतं. पाकिस्तानात आसरा घेण्यासाठी त्याने आण्विक क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी लागणारे सुटे भाग आणण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ केली होती. त्या बदल्यात त्याला आर्थिक नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी अटकळ आहे.
दाऊद पाकिस्तानात असल्याचा इन्कार करताना पाकने आपलं भांडं फुटू नये यासाठी त्याला काही काळ कराचीतून हलवून पाक आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळील वझिरिस्तान येथे ठेवलं होतं. याच काळात त्याचा दहशतवाद्यांशी संबंध वाढला असावा आणि त्यांच्याशी त्याने हातमिळवणी केली असावी, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. अमेरिकेने अधिकृतपणे दिलेल्या एका निवेदनानुसार दाऊद इब्राहिमच्या सिंडिकेटचा स्मगलिंगचा मार्ग दक्षिण आशिया, मध्यपूर्व व आफ्रिका येथून निघतो. त्यात अल कयदाचाही सहभाग आहे. दाऊद स्मगलिंगसाठी दहशतवाद्यांच्या मार्गाची मदत घेतो आणि त्यांना कमिशनही देतो. गुजरातमध्ये लष्कर-ए-तैयबाकडून हल्ले चढवण्यासाठी दाऊदने त्यांना आर्थिक मदत केल्याचं आढळलं आहे.
शस्त्रास्त्रं विक्रीतही दाऊद गुंतल्याचं सांगण्यात येतं. भारताला खिळखिळं करण्यासाठी दहशतवादी आणि दाऊद एकत्र आले. स्मगलिंगसारख्या आपल्या कारवायांना दहशतवाद्यांचं संरक्षण मिळालं तर ते दाऊदला हवंच असतं. त्यासाठीच त्याने दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचं निदर्शनास आल्यानेच अखेर अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्या म्हणण्यानुसार दाऊदने पाकिस्तानात गेल्यावर तेथील राजकारणी, दहशतवादी संघटना आणि सरकारी अधिकाºयांचा अभ्यास केला. त्यांना पैसे पुरवून मिंधे केलं आणि त्याचा फायदा घेत आपले व्यवसाय फोफावत नेले.
व्हिडिओ पायरसीमधून त्याने प्रचंड पैसे कमावले. लाहोरच्या मदिना मार्केटमध्ये तो बनावट सीडी तयार करायचा. आणि त्यांची विक्री करायचा. किंग्ज व्हिडिओ या त्याच्या कंपनीचा हा काळा धंदा इतका वाढला की त्याचा परिणाम बॉलिवूडवर व्हायला लागला. कारण पाकिस्तानी प्रेक्षक भारतीय चित्रपटांचे शौकीन आहेत. काहीही करून आपली टोळी, आपला धंदा वाढला पाहिजे हे दाऊदचं सूत्र आहे आणि तो ते कसोशीने पाळतो. मग कुणाशीही हातमिळवणी करावी लागू दे अथवा वैर पत्करावं लागू दे.
अब्जावधी रुपयांचं काळं साम्राज्य उभारणाºया माफिया डॉन आणि दहशतवादी दाऊदला पकडून देणाºयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस आहे. आधीच निद्रानाशाचा विकार जडलेल्या दाऊदला आता मुलगा मोईनच्या मौलवी होण्याच्या निर्णयाने नैराश्य आलं तर त्यात नवल नाही.


बॉलिवूड
१. बॉलिवूडचं तर दाऊदला कमालीचं आकर्षण. बिग बजेट चित्रपट तयार करणाºया निर्मात्यांना त्याने मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला आणि त्यांच्याकडून दामदुप्पट वसुलीही केली.
२. आपल्याला न जुमानणाºया निर्मात्यांना धमकावून त्याने मोठी खंडणीही उकळली. चित्रपट निर्माता राजीव राय याने तर त्याच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याला घाबरून देशच सोडला.
३. चित्रपट निर्मात्यांकडून खंडणी वसूल करण्याच्या कारवायांमध्ये तर त्याने अब्जावधी रुपये कमावले.
४. काही निर्मात्यांकडून खंडणीऐवजी चित्रपटाचे ओव्हरसिज राइट्स घेण्याचा नवाच मार्ग त्याने शोधून काढला.
५. अबू सालेम याच्या मार्फत निर्माता मुकेश दुग्गल आणि कॅसेटकिंग गुलशन कुमार यांची हत्या केली. या सगळ्यात किती निर्मात्यांना धमक्या दिल्या आणि हल्ले केले त्याची गणतीच नाही.

हवाला
१. हवाला हाही एक दाऊद टोळीचा प्रमुख सोर्स. अगदी या धंद्यावर त्याचा सुरुवातीपासूनच डोळा होता. कारण त्याने दरोड्याचा पहिला गुन्हा केला होता तो अंगडिया नेत असलेल्या हवाल्याची रक्कम लुटण्यासाठीच.
२. देश-विदेशांमध्ये पसरलेलं आपल्या टोळीचं जाळं त्याला या धंद्यासाठी पोषक ठरलं. या धंद्यातून तो खोºयाने पैसे कमवत असल्याचं म्हटलं जातं.
३. दाऊद टोळीच्या हवाली रक्कम केली की जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात तिथल्या चलनानुसार हव्या त्या व्यक्तीच्या हाती पोहोचते. फक्त भरभक्कम कमिशन दिलं की झालं. शिवाय कुठेही त्याची नोंद नसते.
४. या मार्गाने इतकी मोठी उलाढाल होते की अधिकृतपणे चालणाºया मनी ट्रान्स्फरपेक्षा हा व्यवहार कैक पटींमध्ये होतो.

दाऊदची ‘लाइफ-लाइन’

१९७४ - अंगडियाची टॅक्सी अडवून शस्त्रांच्या धाकाने पावणेपाच लाख रुपये लुटले. यलोगेट पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल.
१९८६ - मुंबईतून दुबईला पलायन
१९८८ - प्रतिस्पर्धी टोळीतील रमा नाईक याचा पोलीस एन्काउण्टर घडवून आणल्याचा आरोप. तेथूनच दाऊद आणि गवळी गँगमध्ये रक्तरंजित गँगवार सुरू झाले.
१९९३ - मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचून त्याची अंमलबजावणी.
२00३ - भारत आणि अमेरिका सरकारकडून जागतिक दहशतवादी घोषित.
२00५ - मुलगी मेहरूख हिचा निकाह पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा मुलगा जुनेद याच्याशी लावला.
२00९ - फोर्ब्स मासिकाकडून जगातील पहिल्या ५0 सामर्थ्यवान माणसांच्या यादीत दाऊद इब्राहिमचा १९व्या क्रमांकावर समावेश. उद्योगपती मुकेश अंबानी त्या यादीत ३५व्या क्रमांकावर, तर उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे ४७ व्या क्रमांकावर होते.
२0११ - मुलगी मेहरीन हिचा पाकिस्तानी अमेरिकन व्यापाºयासोबत, तर मुलगा मोईन याचा लंडन येथील व्यावसायिकाची मुलगी सानियासोबत विवाह.
२0१७ - कराची येथे हृदयविकाराचा धक्का बसल्याचे वृत्त. मात्र छोटा शकीलकडून इन्कार.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य बातमीदार आहेत.)

Web Title: Dawood ... why did the time of the 'Kasperseck' fleece 'be depressed'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.