काय एवढी घाई आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:00 AM2019-01-13T06:00:00+5:302019-01-13T06:00:07+5:30

मोठय़ांना नसेल; पण मुलांना आहे ना !

Are you able to face to energy in your kids? | काय एवढी घाई आहे?

काय एवढी घाई आहे?

Next

-गौरी पटवर्धन 

सहावीतल्या ओमचं धाकट्या काकांशी भांडण होण्याची ही दिवाळीपासूनची तिसरी वेळ होती. सुरुवात झाली ती ऐन दिवाळीत. ओमने दिवाळीत डिक्लेअर केलं की मी यावर्षी फटाके उडवणार नाही.

आता सहावीतल्या मुलाने फटाके उडवायला आपणहून नकार दिल्यावर घरातल्यांना आश्चर्य वाटलं. त्यावर आईबाबा त्याला नीट कारण विचारत होते, तेवढय़ात त्याचा धाकटा काका आला आणि म्हणाला,

‘‘कारण काय असणार वहिनी? भीती वाटली असेल, दुसरं काय???’
आपण फटाक्यांना घाबरतो असं काका म्हटल्यावर ओम कशाला ऐकून घेईल? तो काकांवर चिडला. मग रागात काहीतरी बोलला. मग काय झालं भांडण! 

बाबाने काकाला गप्प बसायला सांगितलं खरं; पण आई मात्र  ओमला नंतर म्हणाली, ‘एवढं चिडायला काय होतं तुला?’ आणि ओमला त्याचा सगळ्यात जास्त राग आला होता. कारण त्याने पर्यावरणाच्या दृष्टीने, प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न उडण्याचा निर्णय घेतला होता आणि तरीही घरात त्याची बाजू कोणीच घेतली नव्हती. 

मग झालं ते नाताळच्या सुटीत. तेव्हा तर भांडण व्हायचं काही कारणच नव्हतं.
 घरातले सगळे जण नाताळच्या सुटीत गाडी करून फिरायला गेले होते. त्यावेळी ओमच्या काकाने रिकामं वेफर्सचं पाकीट चालता चालता रस्त्यात खाली टाकलं. मग अर्थातच ओमने त्याला सांगितलं की, ‘प्लॅस्टिक असं रस्त्यात टाकायचं नसतं. त्याचं विघटन व्हायला हजारो वर्षं लागतात. तोवर ते असंच पडून राहील. एखाद्या गायीने ते चुकून खाल्लं तर ती मरेल. आम्हाला शाळेत शिकवलं आहे.’ वगैरे वगैरे.
काकाला त्याचं म्हणणं काही विशेष पटलेलं नव्हतं. पण भांडण नको म्हणून तो म्हणाला, ‘पुढच्या वेळी नाही टाकणार.’

पण ओम हट्ट धरून बसला की, ‘पुढच्या वेळी नाही, त्याने आत्ताच ते उचलून कचर्‍याच्या डब्यात टाकलं पाहिजे.’

ते काका ऐकेना. त्याचं म्हणणं होतं, की एखाद्या प्लॅस्टिकच्या पाकिटाने एवढं काय होणार आहे? ओम म्हणत होता की असंच एक-एक पाकीट करून सगळी पृथ्वी घाण होऊन गेली आहे. शेवटी ओमच्या बाबाने ते रिकामं पाकीट उचलून कचर्‍याच्या डब्यात टाकलं आणि तेवढय़ापुरतं भांडण सोडवलं खरं; पण त्याहीवेळी ओमचं म्हणणं बरोबर असूनही सगळे नंतर त्यालाच उगीच हटवादीपणा केल्याबद्दल रागवले होते.

आणि आता तर हद्द झाली होती. ओमच्या काकाने बंदी असूनही संक्रातीसाठी नायलॉनचा मांजा आणला होता. तो आणला तेव्हाच ओमला त्याचा सॉलिड राग आला होता. कारण त्याच्या मित्राच्या गच्चीत नायलॉनच्या मांज्यात अडकून खूप जखमी झालेलं कबुतर त्याने नुकतंच बघितलं होतं. पण आता त्याला हे कळलं होतं, की आपण काकाला काही सांगायला गेलो तर तो ऐकणार नाही आणि सगळे आपल्यालाच रागवतील. आणि म्हणूनच त्याने घरातले सगळे जण झोपल्यावर गपचूप तो सगळा मांजा कात्रीने कापून ठेवला होता. आणि त्याच्याच वरून त्यांच्या घरात तिसरं महायुद्ध सुरू झालं होतं. कारण हा उद्योग कोणी केला असेल ते सगळ्यांना समजलं होतं. आणि यावेळी सगळेजण फक्त ओमला रागवत होते. ओम त्याच्या परीने त्याची बाजू मांडत होता; पण यावेळी ती बाजू कोणी ऐकूनसुद्धा घेतली नव्हती.

आणि या तीनही वेळी ओमला त्याची काय चूक आहे ते कळलंच नव्हतं. तो शाळेत शिकवलेल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन चांगल्या मुलासारखा वागत होता आणि तरीही त्यालाच बोलणी खायला लागली होती. त्याने चिडून हे सगळं त्याच्या मित्राला, इरफानला सांगितलं तेव्हा तो मात्र शांतपणे म्हणाला,

‘पण काहीही असलं तरी आपल्यालाच बोलणार मोठे लोक. आपण लहान आहोत ना ! ते सगळे मिळून असंच करतात. आमच्या घरीपण असंच करतात. मी काही सांगायला गेलो तर ऐकतच नाहीत.’

‘अरे पण मी तर शाळेत शिकवलेलंच सांगत होतो ना!’ ओम अजूनपण घरातल्या मोठय़ा माणसांवर चिडलेलाच होता.

‘त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. सगळी मोठी माणसं एकमेकांचीच बाजू घेतात.’
आणि हाच त्या दोघांचा आणि अधल्या मधल्या वयातल्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. ते बिचारे त्यांच्या परीने काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात. त्यांना एखादी गोष्ट पटली, की ते लगेच स्वत:त बदल करू शकतात. त्यांना सतत काहीतरी नवीन आयडिया सुचत असतात. त्या त्यांना लगेच करून बघाव्याश्या वाटत असतात. आणि  त्यांच्यातल्या या एनर्जीला मोठी माणसं कधीच पुरी पडू शकत नाहीत. आणि मग या अधल्या मधल्या वयातल्या मुलांना सारखं काय ऐकायला लागतं? तर,
‘थांब गं जरा’
‘तुला प्रत्येक गोष्टीची घाई कशी असते?’
‘असं आज म्हटलं आणि उद्या बदललं अशा गोष्टी बदलत नाहीत’.
पण खरी परिस्थिती अशी असते, की आज म्हटलं आणि उद्या बदललं असं करण्याची पूर्ण क्षमता मुलांमध्ये असते. आणि मुलं तशी बदलतातच!

 

lpf.internal@gmail.com

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे)

 

---------------------------------


ही आहे 
थोड्या ‘सटक’ वयातल्या मुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी  
‘स्पेस’

- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं?- याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या  ‘स्पेस’मध्येच मिळेल.
थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली.. कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणार्‍या आई-बाबांची मिळून एक  ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !
तर भेटूया, येत्या रविवारी !
अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, 
तर एका गरमागरम, ताज्याताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा : www.littleplanetfoundation.org

 

Web Title: Are you able to face to energy in your kids?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.