1983, 1993, 2011 आणि पुढे! - भारतीय क्रिकेटसह आणि समाजानंही ‘जिंकण्याची’ रांगडी हिंमत कमावली, त्याची गोष्ट!

By meghana.dhoke | Published: June 9, 2019 01:51 PM2019-06-09T13:51:57+5:302019-06-09T14:00:12+5:30

भारतीय क्रिकेटने उच्चवर्णीय रुबाब सोडला, गरिबी सोडली, तंत्रशुद्धतेचा आग्रह सोडला, बोटचेपा ‘डिफेन्स’ सोडला तेव्हाच देशातही काय आणि कसं बदललं? का बदललं?

1983 to 2019 via 1993 & 2011- an interesting changing journey of Indian cricket & society. | 1983, 1993, 2011 आणि पुढे! - भारतीय क्रिकेटसह आणि समाजानंही ‘जिंकण्याची’ रांगडी हिंमत कमावली, त्याची गोष्ट!

1983, 1993, 2011 आणि पुढे! - भारतीय क्रिकेटसह आणि समाजानंही ‘जिंकण्याची’ रांगडी हिंमत कमावली, त्याची गोष्ट!

Next
ठळक मुद्दे2019 - आता ही गोष्ट नव्यानं सुरु झाली आहे.

मेघना  ढोके 

जेमतेम 183 धावांत भारतीय संघ तंबूत परतला तेव्हाची ही गोष्ट. त्याकाळची. 36 वर्षापूर्वीची.

सन 1983. तेव्हा भारतीय संघाला क्रिकेटच्या जगात कुणी लिंबूटिंबू म्हणूनही मोजत नव्हतं. इतर कोण कशाला, खुद्द या संघालाही चुकून वाटलं नव्हतं की, आपण साखळी फेरीपलिकडे तरी जाऊ! उलट संघातल्या अनेक खेळाडूंची तर मनोमन खातरीच होती की साखळी सामन्यातच आपण बाद होऊ,त्यांनी आपल्या सहलींचं नियोजन करुन ठेवलं होतं, कुणाला अमेरिकेला जायचं होतं, तर कुणाला हनिमूनला. मात्र झालं भलतंच. कपील देवच्या या संघानं पहिल्याच साखळी सामन्यात वेस्ट इंडिजला लोळवलं. आपण जगज्जेत्या वेस्ट इंडिज संघाला हरवलं म्हटल्यावर कप्तान कपीलदेव सह खेळाडूंचंही मनोबल काहीसं वाढलं असावं. एकेक सामना जिंकत संघ थेट अंतिम सामन्यातच पोहचला. हेच सगळ्यांनाच, अगदी खेळाडूंनाही अनपेक्षित होतं. नाही म्हणायला आनंद झाला पण आपले नियोजित सहलीचे पैसे पाण्यात गेले म्हणून काही खेळाडू काळजीत पडले. काहींनी तर चेष्टेत नुकसान भरपाई मागितली कप्तानाकडे. हे असं असलं तरी अंतिम सामन्यात खेळावं तर लागणारच होतं. समोर उभा टू टाइम चॅम्पिअन वेस्ट इंडिजचा संघ. त्यांच्या बॉलिंगचा तोफखाना दांडय़ा काय माणसांच्याही चिंधडय़ा उडवण्यात तरबेज. त्यात बॅटींगचे दादा असलेले क्लाइव्ह लॉइड आणि सर विव रिचर्ड्स सारख्यांसमोर तुटपुंज्या 183 धावांचा काय निकाल लागणार होता?
त्यामुळे सगळ्यांनाच वाटलं गेली मॅच. संपलं सगळं. तिकडं रांगडा बिंधास्त हरयाणवी कॅप्टन कपील देव मात्र संघाला सांगत होता, ‘जवानों, अपने पास विनिंग टोटल नहीं है, ना सहीं, पर लड तो सकते है, तो लडेंगे, लेट्स फाइट!
त्याच्यासाठी जे युद्ध होतं, ते इतरांसाठी कधीच संपलेलं होतं. इतर म्हणजे कोण? बहुसंख्य भारतीय प्रेक्षक, जगभरातले तमाम क्रिकेट प्रेमी आणि खुद्द कपील देवची बायको रोमी. तिलाही वाटलं की काही खरं नाही. ती ही मॅच अर्धवट सोडून सरळ हॉटेलवर निघून गेली. रोमी सांगते, ‘वेस्ट इंडिजने सामना ओढून नेलाच होता. तिकडे वीव रिचर्ड्सने चौकार मारला की अवतीभोवतीची वेस्ट इंडियन गर्दी उडय़ा मारायची. माझ्याकडे पाहून चेकाळून ओरडायची. मला ते सहन होइना, त्यापेक्षा हॉटेलवर निघून जावं असं मला वाटलं नी मी तडक निघून गेले.’ 
 विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु आहे, नवरा कॅप्टन आहे,आणि तरीही आपल्या संघाचं काही खरं नाही, आपण हरणारच असं वाटून कॅप्टनची बायको मॅच सोडून निघून जाते, हे आज सांगून तरी कुणाला खरं वाटेल का ?
मात्र त्या पहिल्यावहिल्या विश्वविजयाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई  सांगतात, माझा मित्र युजवेंद्र सिंगही त्यादिवशी आमच्यासोबत मॅच पहायला आला होता. भारतानं उपांत्य सामन्यात इंग्लंडला हरवलं होतं. ते ही अनपेक्षितच होतं. कारण इंग्लडच फायनलला जाणार याची खातरी असलेल्या ब्रिटिश पोरांनी आधीच तिकिटं घेऊन ठेवली होती, ती वाया जाण्यापेक्षा त्यांनी ती आम्हाला विकून टाकली. भारत पहिल्यांदाच वर्ल्डकप फायनलला पोहचला म्हणून आम्हीही उत्साहानं मॅच पहायला गेलो. पण संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत जेमतेम 183 धावा केल्या. ते पाहून युजवेंद्रही म्हणाला, गेलीये मॅच, हे पाहण्यापेक्षा बायकोसोबत शॉपिंगला जातो. युजवेंद्र तर एकेकाळी भारतीय संघात खेळलाही होता. पण तो ही मॅच अर्धवट टाकून निघून गेला. मात्र चमत्कार झाला. भारतीय क्रिकेटचा सुवणकाळ उदयास येताना मी प्रत्यक्ष पाहिला, असं म्हणत हा प्रसंग आपल्या ‘डेमोक्रसीज इलेव्हन’ या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी नोंदवला आहे.
25 जून 1983 ची ही गोष्ट. त्यादिवसानं भारतीय क्रिकेटची परिभाषाच कायमची बदलून टाकली. हा एकदिवशीय सामन्यातला तिसरा विश्वचषक. पहिल्या दोन स्पर्धात भारतीय संघानं फक्त एक सामना जिंकला होता. त्या विजयातही सुनील गावसकरांचा वाट मोठा. गावसकरने 60 षटकं खेळून 36 धावा केल्या होत्या. तिथं बाकीच्यांची काय पत्रास. 
विश्वचषक जिंकला खरा मात्र क्रिकेट हा धंदा होऊ शकतो, हे बीसीसीआयच्या लक्षातही आलेलं नव्हतं तो हा काळ. देशातली बाजारपेठ लहानच होती. स्पॉन्सर्स कुठून असणार?  पंजाब -काश्मीर पेटलेलं होतं. गरीबी हटावचे नारेही सुरु होते. 1982 साली देशात एशियाड झालं तेव्हा देशात रंगीत टीव्ही आला. मात्र घरोघर तो पोहचला नव्हता. फ्रीज, टीव्ही, मिक्सर, गाडी, स्वतर्‍चं घर हे सारं म्हणजे मध्यमवर्गीय माणसांच्या स्वपAांची फक्त यादी होती.  विश्वचषक जिंकून आलेल्या अनेक खेळाडूंचीही स्वतर्‍ची घरं नव्हती. त्यांना बक्षीसापोटी रकमाही फार मिळाल्या नाहीत. मॅच फी म्हणून मिळाले विस हजार रुपये, 20 पाऊण्ड धुलाई भत्ता आणि दैनंदिन भत्ता. पुढे लता मंगशकरांनी या खेळाडूंच्या सन्मानार्थ कार्यक्रम केला, त्या निधीतून उभारलेल्या पैशातून खेळाडूंना 1 लाख रुपये बक्षीस देण्यात आले. क्रिकेटनं यशाची चव पाहिली, पण गरीबी मात्र सरली नव्हती.

1993
पहिलावहिला विश्वचषक जिंकून 10 वर्षे झाली. दरम्यान गावसकर नंतर कोण हा प्रश्न सार्‍या देशाला पडला. मात्र 18 डिसेंबर 1989 ला पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करत सचिन तेंडुलकर नावाचा एक तारा देशाच्या क्षीतीजावर तळपला. मात्र तोवर क्रिकेट पांढर्‍या कपडय़ातलं कसोटीचंच होतं. त्या तार्‍याचं तळपणं देशानं पाहिलं, पण अनुभवलं नव्हतं. मात्र 1991-92 मध्ये देशानं कूस बदलली. त्यावेळचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था खुली करत जागतिकीकरणाची कवाडं खुली केली. नवीन जागतिक वारं बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हात धरुन भारतात आलं. त्या नव्या वार्‍यावर स्वार झालं क्रिकेट.  पांढर्‍या कपडय़ातलं क्रिकेट नव्या तरुण प्रेक्षकासाठी रंगीत होऊ लागलं. 50 ओव्हरचा एक दिवसाचा खेळ, त्याकडे तरुण वळू लागले.  पाच पाच दिवसाचा खेळ पाहत बसण्याचा ना वेळ या तारुण्याकडे होता , ना संयम. त्यात त्यांना झटकेपट निर्णय हवे होते. त्यांचा हिरो झाला धडाकेबाज बॅटिंग करणारा, कुणालाही न डरणारा, भिरकावून देणारा बारकुडा मध्यमवर्गीय मुलगा. तो जुनं सगळं तोडूनमोडून, नवीन काही घडवत होता. त्याचवेळी देशातही काहीतरी नवीन घडत होतं, बहुराष्ट्रीय कंपन्यांना इथं मोठी बाजारपेठ दिसत होती. भारतात केबल टीव्ही आणि खासगी सॅटेलाइट चॅनलचा बोलबाला सुरु झाला. घरोघर एव्हाना 12-15 हप्त्यावर का होइना लहान-मोठे रंगीत टीव्ही लाकडी शोकेसमध्ये येऊन पोहचले. हप्त्यानं वस्तू घेणं, दुचाकी घेणं सुरु झालं. स्वयंपाक घरातली जेवणं टीव्हीसमोर ‘हॉल’मध्ये बसून करणं शहरी मध्यमवर्गीयाच्या अंगवळणी पडायला लागलं. त्या टीव्हीवर अनेकांनी पहिल्यांदा वनडे सामन्यांचा लाइव्ह थरार प्रत्यक्ष पाहिला. ते निमित्त हिरो कपचं. सचिन तेंडुलकरच्या बॉलिंगवर जिंकलेला शेवटच्या ओव्हरवरचा उपांत्य सामन्यातला थरार मनाशी घेऊनच त्याकाळी शाळकरी नी कॉलेजात असलेली  पिढी ‘जवान’ झाली. 
या मालिकेचं प्रसारण पहिल्यांदा खासगी वाहिनीवर झालं. दुरदर्शनने न्यायालयात धाव घेतली. मात्र प्रसारण लहरींवर जनतेचा हक्क आहे दुरदर्शन किंवा सरकारचा नाही असं म्हणत न्यायालयाने त्या लहरी खुल्या करत खासगी वाहिन्यांनाही प्रसारण हक्क देऊ केले. या निर्णयानंतर देशात प्रत्येक मॅच लाइव्ह दाखवणं सुरु झालं. मालिकांना आणि खेळाडूंना मोठे स्पॉन्सर्स मिळू लागले. पेप्सी-कोकाकोलाचे युद्ध नथिंग ऑफिशियल अबाऊट इट म्हणत सुरु झालं.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आणि मध्यमवर्गीय स्वपAांचंही क्रिकेट वाहन बनलं. 


2011


काळाचा वेग इतका वाढला की, पन्नास षटकांचं क्रिकेट 20 षटकांत सीमित होऊन अधिक मसालेदार, चटपटीत बनलं. भारतीय बाजारपेठेचा आवाका आवाढव्य वाढला. भारतीय क्रिकेट आणि भारतीय बाजारपेठ भल्याभल्यांची आर्थिक समीकरणं बदलू लागली. 2003 मध्ये भारतीय संघानं फायनल र्पयत मजल मारली मात्र अखेरच्या सामन्यात दडपणाच्या डोंगराखाली यश गाडलं गेलं. क्षमता असून आपण जागतिक स्तरावर कोसळतो हा घाव समाजाच्याही वर्मी बसलाच. मात्र त्याची कसर भरुन काढत नवख्या तरुण मुलांनी 2007 साली पहिलावहिला टी 20 वर्ल्डकप पाकिस्तानला हरवत जिंकून दाखवला.  त्या संघाचं नेतृत्व करत होता महेंद्र सिंग धोनी. झारखंड, रांची हे नेमकं कुठं आहे हे तरी तोवर जगात कुणाला माहिती होतं? तोवर उच्चवर्णीय, उच्चशिक्षित, मेट्रो शहरातलं क्रिकेट इंडियाचं बोट सोडून अचानक भारताकडे निघालं. पॉवर ऑफ स्मॉल टाऊन इंडिया म्हणून नवंच क्रिकेट आकार घेऊ लागलं. ते डिफेन्सिव नव्हतं, तंत्रबिंत्र मानत नव्हतं, मार उचलून, दे फटके एवढंच त्याला माहिती होतं. टी 20 चा थरार आणि लोकप्रियता कॅश करण्याइतपत ‘धंदा’ बीसीसीआयला कळू लागला होता. ललीत मोदींनी 2008 साली आयपीएल आणलं आणि क्रिकेटची परीभाषाच जम्पींग झपॅक म्हणत बदलत गेली.
मध्यमवर्गीय तेंडुलकरला देव मानणारी एकेकाळची शाळकरी पिढी तोवर शहरी कार्पोरेटचा भाग होत, आपल्या ‘गावठी’ व्यवहार ज्ञानाच्या जोरावर इंडियाच्या सक्सेस स्टोरीला नवा भारतीय आयाम देत होती.गाडी, घरं, आयटी जॉब, विदेश प्रवास, हायफाय लाइफस्टाइल हे सारं या तारुण्याला हवंच होतं. क्रिकेटनं गरीबी सोडलीच होती, अ‍ॅस्पिरेशनल तारुण्यालाही सोडायचीच होती.
आणि मग उजाडलं 2011
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विश्वचषक जिंकून दाखवला. त्यादिवशी क्रिकेटचं दैवत खांद्यावर घेऊन तरुण मुलं मिरवली.
मात्र ते मध्यमवर्गीय दैवत मागे पडून रांगडा धोनी आणि कमालीचा आक्रमक ( काहींना उद्धट वाटणारा) विराट कोहली हे नेतृत्व पुढे आलं.
देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षितीजावरही नेमस्त जगणं मागे पडून आक्रमक जहाल मांडणी वेगाने पुढे येत अच्छे दिन आणण्याचा दावा करु लागली.
आणि..


2019
आता ही गोष्ट नव्यानं सुरु झाली आहे.
ती कुठं आणि कशी जाईल? जातेय?
त्याविषयी पुढच्या अंकात.

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: 1983 to 2019 via 1993 & 2011- an interesting changing journey of Indian cricket & society.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.