Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:33 PM2019-02-07T16:33:08+5:302019-02-07T16:40:38+5:30

जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेले ‘लोकमत’समूह कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणार आहे.

Vote for Lokmat Maharashtrian of the Year 2019 : Nominations in Politics Category | Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

Vote for LMOTY 2019: राजकीय क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' सहा जणांपैकी तुमचं मत कुणाला?

Next

मुंबई- जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेले ‘लोकमत’समूह कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राजकीय क्षेत्रातही या पुरस्कारासाठी एकापेक्षा एक प्रबळ दावेदार असल्याने कुणाच्या कार्याचा सन्मान होणार असून, याची उत्कंठा क्षणाक्षणाला शिगेला पोहोचवणारा हा सोहळा एनएससीआयच्या भव्यदिव्य डोममध्ये जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी जनमताच्या चाचणीवरून राजकारणातल्या सहा वरिष्ठ आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या नावांची शिफारस करण्यात आलेली आहे.  

  • आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस, अहमदनगर

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबात वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या रूपाने सहकाराचा वारसा होता. दिवंगत भाऊसाहेब हे सक्रिय राजकारणापेक्षा सहकारात रमणारे होते. त्यांच्यामुळे साम्यवाद व काँग्रेसच्या विचारांचे धडे बाळासाहेबांना घरातच मिळाले. पुण्याच्या विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेताना बाळासाहेबांनी विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक व राजकीय जीवनाचा तो श्रीगणेशा होता. कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर संगमनेर हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र ठरविले. 1978मध्ये जोर्वे या आपल्या गावी त्यांनी अमृतवाहिनी सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेची स्थापना केली. विडी कामगारांचा ऐतिहासिक लढा ते लढले. त्यासाठी कारावासही पत्करला. त्याच काळात मराठवाडा विद्यापीठाची नामांतर चळवळ, संगमनेर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी लढा, कायद्याच्या पातळीवरील सर्वसामान्यांच्या संघर्षाला साथ देण्याचे कामही या उमेदीच्या काळात त्यांनी केले. लोकाग्रहास्तव 1985मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून बाळासाहेब तत्कालीन विधिमंडळात सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून ते दाखल झाले. 

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी शेतमजुरी केली, भाड्याच्या घरात राहून जीवनाचा गाडा पुढे रेटला. एका आंदोलनाने त्यांच्यातील नेतृत्वगुण पुढे आले आणि पाहता-पाहता ऑटोचालक ते जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार ते थेट कॅबिनेट मंत्री अशी मजल त्यांनी मारली. अशा या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. कामठी विधानसभा मतदारसंघातून पहिली हॅट्ट्रिक मारणारे बावनकुळे आता राज्याच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मूळगाव खसाळा (ता. कामठी) हे असून त्यांची शेती कोराडी वीज प्रकल्पात गेली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवू लागले. प्रकल्पग्रस्तांना एका छताखाली आणून लढा उभारण्याच्या हेतूने 1990मध्ये ‘छत्रपती सेना’ स्थापन केली. 1994पर्यंत या संघटनेच्या माध्यमातून बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला. एका आंदोलनादरम्यान नितीन गडकरी यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात ते प्रवेशकर्ते झाले़ भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 1997मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक कोराडी क्षेत्रातून लढविली, त्यात ते विजयी झाले. अशातच 2004मध्ये भाजपाने कामठी विधानसभेसाठी त्यांचे नाव निश्चित केले. त्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांचा पराभव केला. 2009मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाले. लाखावर मते घेण्यासोबतच कामठी विधानसभा मतदारसंघातून पहिली हॅट्ट्रिक मारण्याचा विक्रमही बावनकुळे यांनी नोंदविला. 2014मध्ये राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर बावनकुळे यांचा राज्यमंत्रीमंडळात समावेश झाला. त्यांच्याकडे ऊर्जा व उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली. ऊर्जा विभागात त्यांनी केलेल्या सुधारणा आणि कामाच्या धडाक्यामुळे ऊर्जावान ऊर्जामंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. 

  • आ. चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी मंत्री (कोल्हापूर)

मुंबईतील कापड गिरण्यांतील चाय किटलीवाल्याचा मुलगा ते राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री अशी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावी अशीच चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द आहे. ‘गुजरातचा चायवाला’ देशाचा पंतप्रधान झाला. आता मुंबईतील चायवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन नंबरचा मंत्री झाला आहे व भविष्यात तो कदाचित मुख्यमंत्रीही होऊ शकेल. ही सगळी किमया भाजप या पक्षाची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाची आहे. तसे पाटील यांचे वडील मूळचे शेतकरी. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळ त्यांचे खानापूर म्हणून सुमारे तीन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव. परंतु गावात पोट भरत नाही म्हणून आमदार पाटील यांचे वडील बच्चू पाटील हे मुंबईत गेले. मफतलाल नंबर 2 या मिलमध्ये ते नोकरीस होते. मिलच्या कँटीनमध्ये किटलीबॉय अशी त्यांची नोकरी होती. त्यामुळे आमदार पाटील यांचा जन्म, बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. कॉलेजला असतानाच त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. संघटनेचे 1980 ते 93 अशी 13 वर्षे ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून फिरत होते. आमदार पाटील यांच्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. त्यांची जडणघडणही त्याच मुशीतून झाली आहे. संघाचे ते 1995 ते 99पर्यंत कोल्हापूर विभागाचे (कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचा समावेश) सहकार्यवाह होते. 2008ला पुणे पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातून 2014ला झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार झाले. विधान परिषदेत ते पक्षाचे प्रतोद होते, आता ते सभागृह नेते असल्यामुळेच त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान दोन नंबरचे आहे. 

छगन भुजबळ म्हणजे धडाडणारी मुलुखमैदान तोफ आहे. राजकारणाचा श्रीगणेशा शिवसेनेतून करणारे भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जातात. ओबीसींचा नेता अशीही त्यांची ओळख. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल हा प्रवास प्रेरणादायी आहे. आई लहानपणीच देवाघरी गेल्यानंतर आजीने शेतीव्यवसाय करून वाढविलेले छगन भुजबळ यांचा जन्म जुन्या नाशिकमध्ये झाला. बाजारात फुलं आणि भाजीपाला विकून शिक्षण पूर्ण करणा-या भुजबळ यांनी मुंबईच्या महात्मा फुले मार्केटमध्ये शेतीवर आधारित व्यवसाय सुरू करतानाच व्हीजेटीआयमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी धारण केली आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रभावित होऊन सेनेत व पर्यायाने राजकारणात प्रवेश केला. 1973मध्ये पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेता, 1985व 1991मध्ये मुंबईचे महापौरपद भूषविले. याच काळात 1985व 1990 अशा दोनवेळा मुंबईच्या माझगाव विधानसभेवर निवडून आले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून भुजबळ यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. सेनेचा त्याग करून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1991मध्ये राज्याचे महसूलमंत्री म्हणून धुरा सांभाळली. याच काळात भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व एकवटण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. 1995च्या सत्तांतरात राज्यात युतीची सत्ता येताच, भुजबळ यांनी 1996मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी पार पाडली. 1999मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेश अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. 

कोकणातील वजनदार नेते म्हणून रामदास गंगाराम कदम यांनी शेतकऱ्याचा मुलगा ते पर्यावरण मंत्री ही आपली ओळख अत्यंत कष्टाने उभी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले रामदास कदम सध्या विधान परिषद सदस्य आहेत आणि महाराष्ट्राचे पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. खेड तालुक्यातील जामगे हे रामदास कदम यांचे गाव. वडील मुंबईत पोलीस होते. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. शिवसैनिक असलेल्या रामदास कदमांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यावेळेच्या मातब्बर काँग्रेसला त्यांनी जोरदार धक्का दिला. हा धक्का इतका जबर होता की अजूनही तेथील काँग्रेस त्यातून सावरलेली नाही. 1990मध्ये प्रथम आमदार झालेल्या भाईंनी मग 1995, 1999 आणि 2004 या पुढच्या तीनही निवडणुका आरामात जिंकल्या. कोकणात दबदबा निर्माण करणाऱ्या भाईंना 1995मध्ये शिवसेना-भाजपच्या सत्ता काळात गृह आणि अन्न व नागरी पुरवठा या महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले. भाईंनी गृह राज्यमंत्री असताना उशिरापर्यंत चालणाऱ्या डान्सबारवर केलेली कारवाई त्यावेळी खूप गाजली होती. वेश पालटून डान्सबारमध्ये गेलेला आणि कारवाई करणारा गृह राज्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला.

  • संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, मुंबई

पत्रकार ते राजकारणी या प्रवासातील यशस्वी नेत्यांपकी अलीकडचे मोठे नाव म्हणजे संजय निरूपम. बिहारमधील रोहतस या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर निरूपम यांनी पाटणा येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. राज्यशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर पत्रकारितेसाठी त्यांनी 1986मध्ये राजधानी दिल्ली गाठली. 1988 साली ‘जनसत्ता’मधील नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत आले आणि मुंबईकर बनून गेले. पत्रकारितेच्या या प्रवासात 1993 साली शिवसेनेचे हिंदी मुखपत्र असणाऱ्या ‘दोपहर का सामना’मध्ये निरूपम यांची कार्यकारी संपादकपदी झालेली नियुक्ती त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात करणारी ठरली आहे. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षात म्हणजे 1996मध्ये शिवसेनेकडून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. मराठी बाण्याच्या शिवसेनेने एका अमराठी, उत्तर भारतीय माणसाला राज्यसभेवर पाठविण्याची ती पहिलीच वेळ होती. राज्यसभेत आणि पयार्याने राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेची भूमिका खंबीरपणे मांडण्याचे काम त्यांनी चोख बजावले. अल्पावधीत त्यांनी आपला ठसा उमटवल्याने 2001 साली दुसऱ्यांदा ते राज्यसभेत पोहोचले. 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडत निरूपम यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशी पदे सांभाळतानाच गोवा, गुजरात आणि नागालँड मध्ये काँग्रेस निरीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दरम्यान 2008 साली प्रथमच बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ते स्पर्धक म्हणून उतरले.

Web Title: Vote for Lokmat Maharashtrian of the Year 2019 : Nominations in Politics Category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.